नको देवराया अंत असा पाहू .... !!!

very old indian couple in sadness के लिए चित्र परिणाम

      आज ऑफिस मध्ये निवृत्त झालेल्या एक सफाईकामगार रुक्मिणी मावशी आल्या होत्या, माझ्या टेबल जवळ येऊन उभ्या राहिल्या , मी कामात होते त्यामुळे माझं त्यांच्याकडे लक्षच नव्हते , पण मला जाणवले कुणीतरी माझ्या टेबल जवळ उभे आहे, मी मान वर केली तर रुक्मिणी मावशी ... ! मी हसून विचारले काय मावशी कश्या आहात ? झाले ना सर्व पेन्शनची , ग्रॅज्युइटीची कामं .... हो गं लेकी  तुज्यामुळं सगळं यवस्थित मिळालं पैसं ... ! मलाही ऐकून बरे वाटले , आता या वयात त्यांना जास्त फे-या माराव्या लागू नयेत म्हणून खूप कमी दिवसात कागदोपत्री सा-या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून त्यांची पेंशन चालू केली होती . ऑफीसचा लंच टाइम झालाच होता , मावशी जेवणार नां आमच्या सोबत , चला जुन्या आठवणी जरा ताज्या करू ... मावशींना माझ्या सोबत घेऊन मैत्रिणींच्या टेबलाकडे निघाली तर मावशी थबकल्या , म्हणाल्या नको मॅडम , तुमी जावा , तुमी येवतर  मी हतच बसते ...! मला वाटले मावशी उगीचच  इकडे आलेल्या नाहीत . 

     रुक्मिणी मावशी रिटायर्ड होऊन दोन वर्षांनी आज ऑफिसला आल्या होत्या .... का बरं आल्या असतील...?  मी लंच आटपून आले तोवर मावशी माझ्या टेबलपाशी बसल्या होत्या,  मावशी चहा मागवते थांबा ... नका नका मॅडम सुरेशनी आताच दिला , सुरेश आमच्या ऑफिसचा प्रेमळ पिऊन , मग मीही हसले , हं बोला मावशी सगळं ठीक आहे नं ...? मालक कसा आहे तुमचां ....?  रुक्मिणी मावशींनी डोळ्याला पदर लावलां .... न्हाही वो ,मालक माजा मागल्या वर्षीच आजारानं गेला .... ! अरे बापरे ... काय सांगता मावशी ..? मी . हो नं ... त्याच्या जागंवर मोठया लेकाला लावलाय ,  तुम्हाला दोन मुलगे आणि एक मुलगी नां ? मी मध्येच विचारले . हो  लहान्याला माज्या  जागंवर लावलाया आणि लेकीचं लगींन आगुदरच झालया !  आता मी तिच्याकडंच असतुया ...! का तिच्याकडे का रहाता ? इथं असतानाच तुम्ही नवं  घर बांधलं होतं नां ? हो पन तिथं थोरला ल्योक आनि त्याची बायकापोरं राहत्यात आनि धाकालाबी येगळीकडं ऱ्हातोया .  पण मग तुम्ही का नाही राहत तिथे ? मी .  माजं त्यांच्या बायकांशी पटत न्हाय म्हून पोरांनी बायेर काढल्यान मला . , बापाची पेंशन थोरला घेतोया आनि माजी पेंशनितलं पाच हजार लेकिला देती , तिला कशाला ...? तिच्याकडं  राहती नव्हं मी ...!अर्ध्या पेंशनीत भागवते   हे ऐकून माझ्या काळजाला पीळ बसला ....! आयुष्यभर ज्या माउलींनी पोरांसाठी घाणी घुणीत कामं केली , स्वतःची काही हौस केली नाही ती माउली आज तीन मुलं असून बेघर आणि अशी लाचार होऊन जगते आहे ....! मुलांच्या सा-या हौशी , शिक्षण आणि लग्न करून दिली त्याचा मोबदला काय तर हे असे बेघर आयुष्य ...?
स्वतःच्या कष्टाचंही तिला खायला देत नव्हते ... एक भार म्हणून तिला तिच्याच पैशाने पोसत होते. लेकीनं तरी पैसे घेऊन तिला आसरा दिला ती कमावती नव्हती पण मुलांनी असं वागावं...? मी हे सारं ऐकून सुन्न झाले होते  ...! माझ्याकडून काही मदत पाहिजे का  मावशी  ..... ? मी विचारले !  पोरी मला कुटं काम मिळल का। ..?  काम   ...? मी  प्रश्नार्थक नजरेनं तिच्याकडे पाहीले  .  काम म्हंजी  धूनी भांडी कचरा लादी काय पन करीन  .....!  मावशीकडे  मला पहावत नव्हते  ...!  हाडाची काड करून पोरांना वाढवलं आणि आज एवढे कष्टांनंतरही तिच्या वाटयाला कष्टच  होते ...!!

          आमच्या शेजारी एक वयोवृद्ध जोडपे रहाते  ! दोघेही पेंशनर  ...!  मूली लग्न होऊन  सासरी गेल्या आणि मुलगा सून  नोकरी निमित्त बाहेर  गावी  ...!  मूली जावई तरी अधूनमधून आईवडिलांना भेटायला विचापूस करायला येतात , राहतात पण मुलाने जणू त्यांचे श्राद्धच घातल्या सारखे नाव गांव टाकले आहे  ...!  ह्या आईवडिलांना आर्थिक गरज नाही पण एकुलता एक मुलगा पण  त्याच्या भावनिक आधाराची त्यांना गरज असतांना मात्र तो मुलगा कुठेच नाही  ...!  इकडून आईवडिलांनी फ़ोन केला तर उचलत सुद्धा नाही   ...! अश्यावेळी ह्या आईवडिलांच्या मनाची अवस्था काय होत असेल...?  आज आहेत तर उदया   नाहीत अश्या अवस्थेत डोळ्यामध्ये सतत मुलाला  पाहण्याची आस दाटुन असते  ....! त्यांच्याकडे पाहिले की डोळ्यांच्या जागी अश्रुंचा समुद्र दिसतो  .... भरतीला आलेला  ..... पण  ओसंडून वहायला  त्यांच्याकडे किनाराच नाही....!!


           मी  आजूबाजूला असेही  वयोवृद्ध पाहिलेत की मुंबईची घरे वन रूम किचन अथवा टू रूम किचन  मग त्या वाढत्या पीढ़ी मध्ये सर्वात वयो वृद्ध माणसांची अडचण होउ लागते  ...!  एक सम्पूर्ण रूम त्यानी अडवल्या सारखीच  ..... मग त्यांची रवानगी बिनदिक्कत चांगल्या सेवेच्या नावाखाली वृद्धाश्रमात केली जाते  .....!!


         असे  हे दुःख  आणि अशी ही माणसे पाहिली की वाटते हीच माणसे कधी काळी  डेरेदार वृक्ष होती   ...!   कष्टाने आपल्या लहान वेली फुलांना जपले मोठे केले सावली दिली   ...!  आज  त्यांना सावलीची आधाराची गरज पण ती  उघडयावर पडली होतीं   ....!! मृत्यु येत नाही म्हणून जगत राहायचे आणि हताश होता होता पुनः पुनः स्वतःला सावरायचे  हा जीवनाचा खेळ त्यांनाही नकोसा असतो   .....! आम्हाला हे आयुष्याचे दान नको  ... मृत्यु आला तर बरे असे  डोळ्यातले आधीच सुकलेले पाणी ओघळत कोरडे निश्वास सोडत नको देवराया अंत असा पाहू  .... असे विधात्याला विनवत असतात  ....!!  आणि हेच हात आपण त्यांना नमस्कार करायला वाकल्यावर   "शतायुषी"   हो  असा आशीर्वाद देताना   थरथरत  असतील का    ....?   त्यांचे मला ठावूक नाही पण असा आशीर्वाद मला कुणी दिला तर माझे मन मात्र  थरथरते   ....!!



                                                                                                                 *** समिधा 


        


         




प्रिय ......... काल रात्रभर जागीच होते....

 


प्रिय .........
काल रात्रभर जागीच होते....
तुला भेटून आल्यापासून काहीच
सुचत नव्हते....
आईनेही विचारले पण काहीच सांगता आले नाही....
किती कोवळी हळवी पहिली भेट पण ....मनावर मोरपीस फिरवत संपली....!!
देवळाच्या चौथ-यावर हातानं
रांगोळी काढत काढत किती अनं
काय बोलले ,ऐकलं काही आठवतंच नाही....!
तुझ्या विशाल अथांग डोळ्यात पहातांना मी त्यांत कधी हरवले
कळलंच नाही....!
ह्रदयाची धडधड आणि अंगाची
थरथर त्यामुळे मुखातून शब्दही
फुटत नव्हते...!!
आणि जेव्हा तू हातात हात घेतलास .....शरिरात अशी
वीज थरारली की अंगअंग तापून गेले
म्हणूनच कदाचीत कालपासून ताप भरलाय....!!
कुठेसे वाचले होते यालाच प्रेमज्वर म्हणतात म्हणे 😚
तुझ्या प्रेमाला होकार द्यावा की नाही तोच विचार करते आहे...!

प्रेम सोपे नसते .....हेच ऐकत आले आहे....पण मन मात्र नाही नाही म्हणता तुझ्याकडेच धाव घेतेय...!!
पण मला भिती वाटते...हा प्रेमसागर मी पार करू शकेन...?
प्रेमाचे नाते जुळायला प्रथम मनं एकत्र यावी लागतात .....मनाकडून मनाकडे जाणारी ओढ हीच खरी नात्याची गरज आहे......!!
शरीर हे माध्यम असते पण तेच जर नाते टिकवण्यासाठी साधन
म्हणून वापरले गेले तर तो केवळ बाजार असेल! लग्न हा समाज संमत शरीर सुखाचा मार्ग असला तरी त्या नात्यातही शरीरापेक्षा मनाचा विचारच आधी करावा मन हे सर्व सुखाचा सांगाती असतो मनातून फुललेले नाते कायम टिकते .....!!
प्रेमाला वासनेचा शाप असतो,पण जेव्हा त्या क्षणीक मोहाला लांघून जेव्हा तुम्ही फक्त प्रेम निवडता तेव्हा
ते खरं आत्म्याचं आत्म्याशी मिलन असतं...ते नातं शारीर नात्याला मागे टाकून आत्मीक नाते प्रस्थापीत
करते आणि नातं फुलत जातं अव्यक्तपणे अविरत आणि अनंतकाळासाठी.....!!
मग तिथे देह गळून पडतात अनं उरतात
फक्त आंतरीक संवेदना तीच मग
दोन जीवांना बांधून ठेवते...!
मग काय फरक पडतो
तू तिथे अनं मी इथे
अशी अवस्था होऊन जाते!!!
तू मला वेडी म्हणशील पण मी तर प्रेमाची अशीच मोहक सुगम कल्पना केली आहे ...!!
असं सात्वीक प्रेम अपुर्ण राहीले तरी त्याची गोडी मात्र निरंतर अवीट रहाते...!!
असं निर्मळ तरल प्रेम आयुष्याला
प्रत्येक वळणावर दिलासा देत रहातं...!
आयुष्यात आलेले खरं प्रेम हे अमृता सारखे असते ...जीवनात
कायम चैतन्य भरून ठेवते...!
मला त्याच चैतन्याचा ध्यास आहे!
प्रेमातून प्रेमाकडे जाणारा मार्ग म्हणजे सर्जनशीलता ...आणि जीवनात आनंदही सर्जनशिलताच निर्माण करते...! प्रेमानुभव घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीला एक आत्मीक
सुखाची अनुभूती अनुभवता येते
प्रेम हे शाश्वत आहे ....! प्रेम सर्व सुखशांतीसंयमाचा सांगाती आहे
प्रेम म्हणजे शक्ती
या सर्व अनुभूतींचा आनंद मला देशील ...??

कदाचीत उद्या माझे उत्तर नाही असेल पण तरीही माझे तुझ्यावरील प्रेम कमी होत नाही आणि हो असेल तर संपणारही नाही....! पण....
उत्तर काहीही असो प्रेमानुभवाची जाणीव संवेदना आपल्यात निर्माण होणे हे सुद्धा
एक स्वर्गीय सुख आहे ते मला मिळाले , निमीत्त तू आहेस हे खरे असले तरी त्या जाणीवेतून
मिळालेला निर्गूण निराकार आनंद माझा फक्त माझा आहे!!
तुझ्याबरोबरचे ते काही क्षण हिंदोळ्यावर झोके घेत
पुन्हा पुन्हा जगते आहे.....अखंड अविरत निरंतर !!😄😄😄

*** तूझीच ..... 😚


                                                           
                                                             "समिधा "

                                                 

" दि डायरी ऑफ अँन फ्रँक "

     


     दि डायरी ऑफ अँन फ्रँक" हे पुस्तक हातात आले आणि पुस्तकाच्या प्रस्तावनेवरूनच हे पुस्तक अतिशय सुंदर वाचनीय ठरणार याबाबत खात्रीचे पटली!हे पुस्तक जसजसे वाचत जावे तसतसे ते आपल्या भाव भावनांचा ताबा घ्यायला सुरूवात करते!! कित्येक ठिकाणी तर आपल्याच जीवनातील परिचीत रंग अनुभवाला येतात!१९४२ मध्ये दुस-या महायुद्धात जर्मनानी ज्यु लोकांचा जो अनन्वीत छळ मांडला होता त्या छळाला टाळण्यासाठी अँन व तिचे आई वडील व बहीण मार्गारेट एका डच कुटूंबाच्या मदतीने अज्ञातवासात रहात होते . या अज्ञातवासात त्यांच्याबरोबर श्री व सौ व्हेडँन व त्यांचा मुलगा पिटर हे कुटूंब व डसेल हा दंतवैद्य होता . 

      १९४२ जुलै ते १ऑगस्ट १९४४ पर्यतचा त्यांचा अज्ञातवासातील जीवनपट अँन ने ह्या तिच्या डायरीतून दिसतो. केवळ १४-१५ वर्षाची अँन पण ह्या तीन वर्षांत अँनच्या मनस्थीतीत होणारी स्थित्यंतरे वाचतांना जीवनाबद्दलची आसक्ती माणसाला जगायला शिकवते याचा प्रत्यय येत रहातो . प्रत्येक क्षणाला जर्मन गेस्टोपांच्या धाडीची टांगती तलवार घेऊन या माणसांचे जगणे म्हणजे मृत्यू जवळ होता पण तो दिसत नव्हता ... पण त्याची जाणीव सतत होती..यात दिलासा हाच सर्व आपली माणसे जवळ होती!

      या डायरीत अँनच्या मनातील वैचारीक आंदोलनाचे हेलकावे आपल्याही मनात नकळत येत रहातात..."किटी" नांव तीने आपल्या डायरीला दिले होते , किटीला ती आपल्या मनातलं सर्व सांगायची.या अज्ञातवासात कुटूंबातील ठरावीक चेह-याशिवाय तिला कुणी पहाताच येत नव्हते , अँन एक स्वप्नाळू निसर्गवेडी मुलगी पण बाहेरचा साधा प्रकाश ही दिला अनुभवता येत नव्हता . या तीन वर्षांत अँनमध्ये होत गेलेले बदल म्हणजे एक हट्टी मुली पासून एका समजुतदार, भावूक मुलगी हा तिच्या स्वभावातील बदल वाचण्यासारखा आहे ! आधी कुणाशीच पटवून न घेणारी पण नंतर मात्र बाहेरील ज्युंचे छळवणूकीचे दु:ख ऐकले की तिला आपण आपण खुप सुखी आहोत असं वाटण्याऐवजी जास्त दु:ख होई!

      याच दरम्यानच्या काळात पिटर सोबत तिचे जुळलेले नाजूक भावबंध अतिशय संयतपणे यात तिने मांडले आहेत , हे वाचणे खरंच खुप छान अनुभव आहे! 

     अँनचे कुटूंब पकडले जाते.... आणि त्यानंतरची त्यांचा छळछावणीतील अनुभव वाचल्यावर अँनचा असा अंत होणे आपल्याही डोळ्यांत पाणी आणते. तरीही एकदा हे पुस्तक वाचलेच पाहिजे, माणूस आणि त्याची स्वप्न या दरम्यान नियती/ परिस्थिती असते आणि तेव्हा होणारा संघर्ष म्हणजे जीवन! मग कुणाची त्यात आहुती पडते तर कुणी राखेतुनही पुन्हा नव्याने उभारी घेते!!! याचा अनुभव देणारे हे पुस्तक आहे....... !!

                                      

                                                                             "समिधा"
(त.टिप या पुस्तकाची मराठी आवृत्तीही उपलब्ध आहे) 

"नामाचा महिमा....!"

 

मी आई होणार हे जेव्हापासून कळलं तेव्हापासूनच
होणारं बाळ मुलगा असेल तर .... हे नाव ठेवायचं आणि मुलगी असेल तर .... हेच नांव ठेवायचं पक्क केलं पण
पण जेव्हा नेमकी वेळ आली आणि बाळाचं माझ्या लेकीचं काय नांव ठेवावं हा मोठा गहन प्रश्न झाला, मी सुचवलेली नावं एकदमच आउटडेटेड आहेत असं सर्वॉचं म्हणनं पडलं... मग काय आत्या, काकी, मावश्या , ताई माई आई सा-यांची शोध मोहीम आणि
एक एक नांव सुचवणं सुरू झालं....शेवटी बाळाचं नांव ठेवायचा अलिखीत अधिकार आत्याचा असतो आणि माझ्या बाळाच्या आत्यानं तो अगदी आनंदाने बजावला! नांव ठेवलं शर्वरी .....! आणि योगायोगाने ते
आमच्या नवदुर्गा देवीचंही नांव असल्याचे कळल्याने शर्वरी नाव ठेवल्याचं सार्थक झाल्यासाखे वाटले...
बाळ आता ब-यापैकी मोठं झालं... नावांत काय आहे... ? या शेक्सपियरला पडलेल्या प्रश्नाची उकल मला हळू हळू होऊ लागली ....एक दिवस लेक म्हणते आई माझं नांव छानच आहे , पण अजून एखादं जरा मॉडर्न नांव का गं नाही ठेवलं....? आलिया, प्रिटी वगैरे ... !
" का तुझं नाव आवडत नाही का?" मी
आवडतं पण वर्गातल्या ब-याच मुलींची नावं शिना , रिया, किया अशी एकदम हटके आहेत ...! " शर्वरी
" त्यांना त्यांच्या नावाच्या मागील अर्थ माहित आहेत का गं ?" मी
" हं काय माहीत...!" शर्वरी
पण तुझ्या नावांत देवींचं नाव आहे आणि इंग्रजीत ट्वीलाईट म्हणतात... म्हणजे संधी प्रकाश जिथे निसर्गपिसारा त्याच्याकडच्या सा-या रंगांची उधळऩ करून प्रत्येकाच्या मनाला एक हूरहूर लावतो
किती सुंदर आणि पवित्र नांव आहे तुझं
यावर तिचं समाधान झाल्यासारखं वाटत तरी होतं..
पण या निमीत्ताने मला एक प्रसंग आठवला आमचे एक मराठीचे प्रोफेसर होते ,. त्यांच्या
घरी पण बाळ झालं आणि त्यांनी काहीतरी
खास नांव ठेवावं म्हणून आपल्या मुलीचं नांव "श्लेश्मा"
ठेवलं , वर्गात बर्फी वाटून सर्वांना कौतूकाने नांव सांगत होते, तेवढ्यात आमच्या प्रिन्सीपल मैडम पण आल्या,
सरांनी त्यांनाही बर्फी दिली... मैडम म्हणाल्या अभिनंदन ... मुलीचं नाव काय ठेवलंस, तु काय मराठी चा हुशार प्रोफेसर नाव अगदी छान ठेवलं असशीलच,
सरांनीही अगदी छाती फुलवून कौतूकाने "श्लेश्मा" असं
सांगितलं....ते नांव ऐकताच प्रिन्सीपल मैडम चा चेहरा
कसुनसा झाला, काय रे प्रमोद हे कसलं नांव ठेवलंस,
सरांचा चेहरा एकदम पडला , " का मैडम काय झालं ?
आधी तू तुझ्या मुलीचं नांव बदल ... तुला या नावाचा या शब्दाचा अर्थ तरी माहीत आहे का? त्यांच्या चेह-यावर चं हसू लपत नव्हते... आम्हीही सगळे कान टवकारून ऐकत होतो,. सरांनी आमच्याकडे चोरट्या नजरेनं पाहिलं न पाहिल्या सारखं केलं,
" अरे तू मराठीचा प्रोफेसर नां मग श्लेश्मा या शब्दाचा अर्थ तुला माहीत नसावा ?
सर आता आणखीणच गोंधळून त्यांच्याकडे पहात होते.... आणि आम्ही मुलं उत्सुकतेने....
आणि मग नावाचा अर्थ ऐकून आम्ही सगळ्यांनीच वर्षभराचा हसण्याचा कोटा संपवला...
सरांचं काय झालं ते सरच जाणोत...अर्थ होता....
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
शेवटी मैडम नी "श्लेश्मा " नावाच्या अर्थाचा भोपळा फोडला ................
.
.
.
.
.
.
.
.

.
.
.
.
"शेंबूड"....!!!!!


                                               



                                                                  "समिधा"

" घर खरंच निर्जीव असते का ..?"

   
     
                                                            (माझे सासरचे  गोव्याचे घर)



      आपली मनं  जिवंत सजीव असतील तर निर्जीवतेतही चैतन्य येते  …!! निर्जीव वस्तुत आपल्या भावना गुंतने म्हणजे काय याचा प्रत्येकाने अनुभव घेतला असेलच !

     मध्ये एका स्रीचा  अनुभव वाचनात आला होता. जुने घर विकून ती नवीन घरात रहायला जाण्याचा त्यांच्या कुटुंबाचा निर्णय पक्का झाला होता !  त्याच आनंदात ती नवीन घर कसे सजवायचे त्याला रंग कोणता द्यायचा फर्नीचर कसे  घ्यायचे ?  अनेक गोष्टींचा विचार सतत तिच्या मनात असायचा !  कुठे बाजारात गेली तरी नविन घरी आपण हे घ्यायचे का ते घ्यायचे का स्वतशीच तिची सल्ले घेणे देणे चालू असायचे , कुणा मैत्रीणीकडे गेली तरी तिच्या न घेतलेल्या नवीन घराबद्दलच बोलत रहायची। ..!  जुन्या राहत्या घराला ती  जणू विसरुनच गेली होती   ....!

     एक दिवस तिची एक मैत्रीण खुप दिवसांनी तिच्या  घरी आली  .   तिने घरात प्रवेश करताच म्हणाली "काय ग काय हा अवतार केला आहेस  ...?"  हिने लगेच आपल्या केसांवरुन हात फिरवत साडी वगैरे नीट केली  .  तर मैत्रीण हसून म्हणाली " अगं  तुझा नाही   .... तुझ्या घराचा म्हणते  मी  ."   ती स्री चपापलीच तिने आपल्याच घरातून सभोवर नजर फिरवली  ...  घरात वर कितीतरी ठिकाणी जाळी लोंबत होती , भिंतींचे पोपडे निघाले होते , रंग फीका पडला होता , कोप-या कोप-यात वस्तूंचा नुसता खच मांडून ठेवला होता ! आज ना उद्या हे घर बदलायचेच आहे या विचाराने तीने या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केले होते ! मैत्रीण निघून गेली पण त्या स्रीच्या तिच्याच नजरेत एक लाजिरवाणी जाणीव ठेवून गेली !

     तिने लगेचच रंग काम करना-याला सांगून घराला रंग काम करुन घेतले , नको त्या  वस्तूंना भंगारात काढले ,  पडदे स्वच्छ धुउन खिडक्या दरवाज्याना लावले ,  घरचा एकदम काया पालट झाला जुंनेच घर पण पुन्हा एकदा जिवंत नवा श्वास घेऊन तरतरीत झाले !  तिचे तिलाच कितीतरी समाधान मिळाले ! मग सांगा घर खरंच निर्जीव असते का ..?

      माझ्या बाबांची नोकरी निमित्त बदली होत असे  . पण आम्हा मुलांच्या शिक्षणा साठी त्यांनी स्वत: प्रवास केला पण रहाते घर सोडले नाही !  पण काही वर्षांनी आम्हाला आमचे दहा वर्षे ज्या घरात राहिलो ते घर सोडणे आवश्यक होते !  नविन जागी, नवीन घरात , नविन माणसांत जाण्याची उत्सुकता मनात होतीच पण त्या पेक्षा जुने  घर आणि त्या भोवतीचं आमचे बालपण सारे इथेच राहणार होते !  घर आणि त्या भोवतीचं मोठ्ठ अंगण , अंगनातली झाडे  आणि झाडाला बांधलेला  झोपाळा  सारे कायमचे मागे पडणार होते , मनात एक अनामिक अस्वस्थता दाटून आली होती , आज खुप काळ पुढे आलो आहोत पण ते बालपणीचे घर मनात कायमचे घर करुन राहिले आहे ! मग सांगा घर खरंच निर्जीव असते का ..?

   माझ्या लग्नानंतर मला माझ्या जाऊबाईनी सांगितले आमचे घर पुनर्बांधणी साठी काढायचे ठरले तेंव्हा आमच्या  आदरणीय कै  . आई (सासुबाई  हा शब्द त्यांच्या साठी उच्चारणेही शक्य नाही )   त्यांनी अतिशय प्रेमाने पण निग्रहाने मुलांना सांगितले की , " तुम्हाला घराचा  बंगला करायचा करा  … महाल बांधायचा बांधा  … पण  या घराची एकही भींत तोडायची नाही ! या भिंतींची एक न एक विट तुमच्या स्वर्गवासी बाबांनी घमेल्याने स्वत:च्या डोक्यावर वाहीली आहे  … !!  त्यांच्या भावनेचा मुलांनी  सर्वानी आदर राखूनच घर बांधले …! मग सांगा घर खरंच निर्जीव असते का ..?

निर्जीव वस्तुत आपल्या चैतन्यमयी भावना गुंततात तेंव्हा  निर्जीव वस्तुला आपोआप जिवंत करतात  !!


(टिप : सदर लेख मा. श्री अविनाश दुधे यांच्या " घर खरंच निर्जीव असते का ..?"  या लेखामुळे प्रेरित आहे ! )


                                                                                                       " समिधा "

वडापाव...!

 
 

       एक म्हातारे तरतरीत आजोबा रोजच छान स्वच्छ पांढरा धोतर सदरा घालून ठाणे रेल्वे प्लैटफॉर्मवर असतात. ट्रेन येते प्रवासी चढतात...ट्रेन सुटायला काही अवधी असतो. तेवढ्यात ते आजोबा खिडकीजवळ येतात...हात पुढे  करून माय वो एक वडापाव वडापाव, एक  वडापाव वडापाव करीत याचना करतात..
समोरच एक फास्टफुडचे कैन्टीन असते मला त्यांची दया आली.. मी एक वडापाव १२रू. मिळतो तेवढे पैसे खिडकीतूनच  त्यांच्या हातावर ठेवले. माझ्या मनात आले भिकारी असूनही
किती टापटीप स्वच्छ आहेत. असं कसं? की घरी दुर्लक्षीत म्हातारं माणूस असेल?म्हणून
घरच्यांच्या नकळत इथे येऊन अशी भीक मागत असतील...? पण खायला न देण्याईतके
हाल करीत असतील? मला त्यांची अजूनच  दया आली! मी अगदी काकुळती नजरेने
त्यांच्याकडे पहात होते .... एवढ्यात मला  माझी मैत्रीण दिसली मी तिच्याकडे गेले
तिच्या शेजारी बसून बोलत असतांना .....माय वो वडापाव वडापाव ... वडापाव वडापाव...
मी खिडकीकडे पाहिले ..…... तेच आजोबा परत  दुस-या खिडकीजवळ येऊन तितक्याच आजर्वाने भीक मागत होते.... मी स्तब्धच!  माझी मैत्रीणीने लगेच पर्समध्ये हात घातला.
मी तिला थांबवलं ! काय आजोबा एकावेळी  किती वडे खाता पोट बिघडेल तुमचे ! आजोबांनी माझ्याकडे न कळून पाहिले ! आणि लगेचच पुढच्या खिडकीत तेच पुन्हा वडापाव वडापाव ......!!

      संध्याकाळी घरी परतांना बदलापूर  स्टेशनच्या जीन्यावर एक कळकट म्हातारी आजी....
माय वो तोंडाकडे हात नेऊन भुक लागली करत समोर हात पसरले...! मी दुर्लक्ष करीत
खाली उतरले समोरच वडापावची गाडी एक प्लेट वडापाव घेतले आणि पुन्हा जीना चढत
असतांना विचार आला ती आजी तिथे असू दे नाहीतर हे वडापाव मलाच खावे लागतील...
ती आजी तिथेच होती, तिच्या हातात वडापाव  दिला तीने दिलेले तोंडभरून आशिर्वाद घेऊन
जीना उतरले मागे वळून पाहिले ती पुन्हा तोंडाकडे हात नेऊन भुक लागली करत
हात पसरत होती ...! 

माणसाला नेमकी भुक कशाची असते अन्नाची  की पैशाची ....?

* समिधा

" देव आणि देवपण.......!"


 
' देव ही एक केवळ संकल्पना आहे
आणि ' देवपण ' हे त्या संकल्पनेचे
मूर्त स्वरुप आहे   ...!
देवपण म्हणजे चमत्कार नव्हे   ....!
देवपण म्हणजे ईष्ट अनिष्टाची जाण आहे   ...!
देवपण म्हणजे शांत निरामय
क्षमाशीलतेचा भाव आहे  ...!
देवपण म्हणजे सदैव प्रेम माया लळा
यांचा अविरत वाहणारा स्रोत आहे   ....!
देवपण म्हणजे कर्तव्या प्रति भक्ति
आणि लोकांप्रति सहयोगाची आसक्ति
या आणि अश्या सा-या भावभावनांनी
युक्त असा आपली कर्म करतो  तो
देवपणाला पोहचतोच  .....!
मग ' देव '  आहे की नाही ....?
हा प्रश्न नगण्य ठरतो   .....!
म्हणूनच देव माहित होण्या साठी ,
प्रथम ' देवपण ' समजून घेणे  जास्त महत्वाचे आहे   ....!!

                  श्रीकृष्णार्पणमस्तु    ......!!


                                                                         ' समिधा '

" तुझसे नाराज नहीं ..... मगर हैरान हूँ ...!!"



Image result for AAMIR KHAN IN LAGAAN

 

   "आमिर खान" पर्फेक्टनिस्ट  ! माझा अगदी कॉलेज पासून रोल मॉडेल आहे.  आणि माझा रोल मॉडेल किती परफेक्ट होता हे जसजसा काळ पुढे जात होता तस तसे सिद्धही होत होते. दिवसेंदिवस त्याच्याबद्दलचे प्रेम आणि आदर वाढत होते   ...! त्याचे एका पेक्षा एक सुंदर अर्थगर्भ आणि मनाचा वेध घेणारे सिनेमा येत होते.  खरं तर जस जसा तो वयाने वाढत होता तस तशी त्याच्यातील संवेदनशीलता अधिका अधिक व्यापक होतानाचा प्रवास थक्क करणारा होता   ....! अगदी "कयामतसे क़यामत तक"  ते "पीके " पर्यन्त त्याने 
 स्वत :च्या अभिनय क्षमतेवर आणि समाजमनावरील विशिष्ट संस्कारांवरही अतिशय प्रभावी असे प्रयोग करण्याचा प्रयत्न केला   ....!  कधी तो या प्रयोगात "तारें जमीं पर " "थ्री ईडियट्स" या सारख्या चित्रपटातील भाष्यातून कमालीचा यशस्वी होतानाही पाहिले तर कधी "पीके" सारख्या चित्रपटातून थोड़ा अयशस्वी, गोंधळलेलाही दिसला ! "सत्यमेव जयते "  या कार्यक्रमातून त्याने भारतातील  राजकीय, सामाजिक, कौटुंबिक एकूण सर्वच स्तरावरील प्रश्नांना वाचा फोडून भारतीय जनते समोर अनेक गोष्टी उघड केल्या , त्यावर चर्चा घडवून आणल्या आणि जनतेच्या सक्रीय सहभागातून अनेक प्रश्नांची उत्तरे   मिळवण्याचा प्रयत्नही केला  ...! त्यावेळी तर मला आमिर खान बद्दलचा अभिमान अधिकच वाढला ! प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळी मला  एक गोष्ट मनाला समाधान देऊन जायची  की , हा माणूस केवळ एक्टर नाही , हा हौस  म्हणून सिनेमा करीत नाही  किंवा केवळ पैसा कमावणे हाच याचा उद्देश नाही तर एक भारतीय म्हणून , एक जबाबदार नागरिक म्हणून.,
एक सजग संवेदनशील माणूस म्हणून समाजप्रती आपली जबाबदारी स्वीकारुन या माध्यमातून तो देशसेवा करीत आहे   ..! समाजप्रबोधन करण्याचा प्रयत्न करीत आहे !   आपल्या देशवासियांना प्रतिकूल परिस्थितिशी 
लढण्यासाठी स्वत:सोबत समाजातील सर्वच घटकांना प्रेरणा देऊन त्यांच्यातील एकीची शक्ति जागृत करून  हा "सेक्युलर" भारताला बळकट करण्याचे किती महत्वाचे कार्य अगदी विचारपूर्वक करीत आहे  ...! 

     आणि एका क्षणी मला " महात्मा गांधींचे " आभार मानावेसे वाटले   ...  हिन्दुस्थान  / पाकिस्तान  फाळणीच्या वेळी ज्या मुस्लिम बांधवांना  हिंदुस्थानच  आपली मातृभूमि आहे असे वाटते ते हिंदुस्थानात राहतील असे घोषित केले आणि म्हणून आज " आमिर खान " आपला आहे ! आमचा  " हिंदुस्थानी " आहे ! 

     पण  परवाच्या त्याच्या वक्तव्याने मात्र  मी चकित झाले   ....!! भारतात असहिष्णुता वाढत आहे ! माझ्या पत्नीला आमच्या मुलाच्या भविष्या बद्दल चिंता वाटते ! तिने मला देश सोडण्याबाबतचा विचारही  बोलून दाखवला ! हे आमिर खान बोलू शकतो ह्या वर विश्वास ठेवणे माझ्यासाठी कठीण  होते ! कारण मिडिया ध चा मा करण्यात पेशवेकालीन आनंदीबाईंचा सीक्वेल आहे   !! 

     भारतातील असहिष्णुता वाढत आहे   ... म्हणजे भाजप सरकार हे हिंदू प्रणीत सरकार आल्याने मुस्लिम बांधवांमध्ये असुरक्षितता निर्माण झाली आहे असे म्हणायचे आहे का ?  मग कांग्रेस सरकारच्या काळातील मुंबईतील केवळ मुस्लिम समुदयाने केलेली दंगल आणि महिला पोलिसांचा केलेला विनयभंग  , केवळ  मुस्लिम मतपेटीवर डोळा ठेवुन कांग्रेसने अनेकदा मुस्लिमेतर समाजाची केलेली पिळवणूक , त्यावेळी सहिष्णुता कुणी दाखवली?  पण त्यावेळी तू काही असहिष्णुते बद्दल बोललेले मी ऐकले नाही!  मला वाटले , बरेच आहे तुझ्या सारख्या विवेकी माणसाने अश्या समाजाचा एक व्यक्ति म्हणून स्वत:ला का " पेश " करावे ?
तू  " न्यूट्रल " राहून आपले कार्य करतो आहे , किती महान !!

     तुझ्या पत्नीला तुमच्या मुलाच्या भविष्या बद्दल चिंता वाटते   ...  म्हणजे ? हिंदुस्थानात इतर मुले नाहीच का ? त्यांच्या भविष्याचा विचार तू करणार नाहीस ?  मग तारें जमींपर  सोडून देणार तू ? इतका आत्मकेंद्रित कधीपासून झालास ? ज्या हिंदुस्तान मध्ये तुझे भविष्य घडले जे आज सर्व जग पाहत आहे त्या हिन्दुस्ताना बद्दल तू असा कसा बोलू शकतोस ?  पाकिस्तानातील  मुलांचे भविष्य तुला माहित आहे ? नोबेल विजेति " मलाला" आज  पाकिस्तान सोडून अमेरिकेत आहे !  का ? ती  तर तिच्याच मातृभुमित पाकिस्तानात नकोशी आहे ! का ? एका  मुस्लिम राष्ट्रात एक सुधारणावादी , पुरोगामी विचारांची मुस्लिम शाळकरी मुलगी नको  आहे ! का ? आणि तू म्हणतोस तुझ्या मुलाचे भविष्य धोक्यात आहे !!

     आणि सगळ्यात कहर म्हणजे तू पत्नीच्या खांद्यावर बंदूक ठेवून म्हणतोस तुझा देश सोडण्याचा विचार आहे!  तो तूच आहेस ना ? जो अतुल्य भारत म्हणत , सत्यमेव जयतेचा घोष करीत देशाच्या एकतेसाठी आणि एकूणच देशाच्या प्रतिमेला अधिका अधिक उज्वल प्रकाशमान करण्याची ग्वाही देतोस ! आणि आज तू सगळ्या समस्यांपासून पळ कसा काढतोस ? तुझा तुझ्यावरील विश्वास उडाला आहे की तुझ्या मातृभूमीवरील ? तुझ्या अश्या विधानांमुळे तू आपल्या मातृभूमीचा , आम्हा सर्व भारतीयांचा अपमान केला आहेस !

     तुला जर खरच असे असुरक्षित वाटत होते तर आपल्या भारतीय बांधवांशी मोठ्या विश्वासाने संवाद साधू का नाही शकलास ? तू संवाद साधलास पण चुकीचा,संशयास्पद सर्व भारतीयांना गृहीत धरून आणि अतिशय बेजबाबदारपणे !तिथे  " सरफ़रोश " मधील ACP अजयसिंघ राठोड  कुठेच दिसला नाही ! " लगान " मधला भुवनला तू कसा विसरलास ? आम्ही तर त्याला आमच्यात जगवण्याचा प्रयत्न करीत आहोत   ...! आणि तूच आता अश्या आपल्याच शिलालेखांना  उध्वस्त करीत चालला आहेस ?  तुझा प्रवास प्रकाशाकडून अंधाराकडे होत आहे !!

      प्रिय आमिर " तुझसे नाराज नहीं  ..... मगर हैरान हूँ   ...!!"



                                                                                         " समिधा "




     

" घन दूर अंधाराचे …!! "


 
 मन मनास सांगे 
नको आकारु 
रूप दुर्दैवाचे   .......

     मन मनास सांगे 
     शोध आधार 
     रूप सौजन्याचे  ……  

मन मनास सांगे 
नको घाबरु 
जग लढणा-यांचे   ……

     मन मनास सांगे 
     कर प्रकाश 
     घन दूर अंधाराचे   …!!
     घन दूर अंधाराचे   …!!
 
माझ्या सर्व सुहृदय मित्र मैत्रिणींना  दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !!
दीपावलीच्या नव  तेजाने सर्वांची आतंरिक मनं उजळून जाउ देत  ....!
नव प्रकाशाने आत्मरंगी नवचेतना  उमलू दे  ....!!

                                                                                       " समिधा "


" हतबल …!"


 
     तो तिला बोलत होता    …  तो बोलत नव्हता तर तिला अनुकूचीदार , धारदार शब्दांनी सोलत होता ! तिच्या असण्या नसण्याची लक्तरे सर्वांसमोर फेडत होता   …! तिच्या शरीरावर  घाव असतीलच पण आता ते मला आणि माझ्या सारख्या इतरांना दिसत नव्हते    !  पण आता तिच्या मनावरचे घाव मला तरी  बसत होते ! तिच्या भावनांच्या या उड़ना-या चिंधड्या आणि त्यामधून तिची आर्त वेदना  आणि आक्रोश माझ्या आणि माझ्या सारख्या तिथे हज़र सर्वच जणींच्या मनापर्यंत पोहचत असलेच   …!!!

     ती स्त्री दिवसभर लोकल ट्रैन मध्ये भेळ विकून आपल्या तोड़मोड़क्या संसाराला हातभार लावणारी व  कष्ट करून आपल्या एकुलत्या एक मुलीच्या शिक्षणा साठी तिच्या भविष्या साठी धडपडणारी मायमाउली होती! आणि तो पुरूष तिचा मालक/नवरा होता (परंपरेने  नव-याला मालक बोलविले जाणे म्हणजे नवरा बायको यांच्यातील  स्तर इथेच नोकर मालक  म्हणून अधोरेखित केला जातो ) दिवसभर कष्ट करणा-या आपल्या हक्काच्या बायकोकडे दारु पार्टी साठी तो पैसे मागत होता आणि ती ते द्यायला तयार नव्हती ! त्याला नकार  म्हणजे  … नव-याला नकार मग मालकाच्या आवेशात तिला भर लोकांमध्ये शिव्यांची लाखोली वाहत होता !
(घरातील  शाररिक आणि मानसिक त्रास याची कल्पनाच नको )

"अगं  ये x x x x x ने  मला पैसे दे !
मारुन टाक तुझ्या पोरीला   ....!
कायला तिला उरावर घेऊन राहलियस … ?
रांडेचे तुझ्या x x x x x "
असं आणि बरच काही    ....!

      त्याला नाही पण तिला आजूबाजूचं भान होतं  . तो जेवढ्या रागाने आणि त्वेषाने तिच्या कानाजवळ ओरडत खेकसत शिव्या देत होता तितक्याच संयमाने आणि शांतपणे ती त्याला थोपविण्याचा निष्फळ प्रयत्न करीत होती !  आणि मी , आजूबाजूचे आम्ही काय करत होतो ?

     मला त्याचा भयंकर राग आला होता !  अश्या परिस्थितीत स्त्रियांना मदत करणारी कोणतीच यंत्रणा नाही का   …? अश्यावेळी पोलिस ख़ास करून लेडीज पोलिस आसपास असणे किती गरजेचे आहे याची जाणीव प्रकर्षाने झाली ! दूसरे काही नाही पण त्याला शाब्दिक दम देऊन तत्पुरता तिचा होणारा मानसिक छळ तरी थांबवता आला असता ! म्हणून मी पूर्ण प्लॅटफॉर्मवर एक फेरी मारून आले पण मला साधे  रेल्वे  पोलिसही दिसले नाहीत ! हा मी सभ्यपणे  कायद्यात राहून केलेला एक "निष्फळ" प्रयत्न !

    मला त्याचा भयंकर राग आला होता ! अश्या परिस्थितीत वाटत होते त्याच्या कॉलरला पकडून चांगले लाथाबुक्क्यानी , कानाखाली दोन चार लगावून बदडून काढावे !  हा मी केलेला  असभ्यपणे कायदा मोडून तिला मदत करण्याचा "निष्क्रिय" प्रयत्न !

     मला त्याचा भयंकर राग आला होता !  मी माझ्या आजूबाजूच्या बायका पोरींना विचारले आपणच जरा त्याला "समजवावे"  का ?  पण कोणी "तो दारुड्या आहे आपल्यालाही काहीतरी बोलायचा , त्यांच्या भांडणात पडणे नकोच! बरे दिसेल का? उगीच लोकांना शोभा !  त्यांना कसली आली आहे अब्रू आपल्याला ते शोभत नाही ! त्यांचे ते पाहुन घेतील ! आणि मग हळूहळू एक एक जण तिथून काढता पाय घेऊ लागल्या !

     आता मला भयंकर राग आला होता !  माझा, माझ्या आजूबाजूच्या सुसंस्कृत म्हणवणा-या लोकांचा, आमच्या असंवेदनशील  संस्कारांचा , आमच्या सोकोल्ड सभ्यपणाचा  आणि यातून येणा-या वांझोटया भितीचा आणि  "बृहन्नडा"  हतबलतेचा   ……!!!

                            " समिधा "





      



एखाद्याचं आपल्यातून अवेळी जाणं ……!

 

     किती किती अवघड असते समजून घेणे  एखाद्याचे आपल्यातून अवेळी जाणं    ....!!  अगदी अनपेक्षित असते  आपल्या साठी   …!  काळाने गनिमिकाव्याने हल्ला करावा आणि जीत्या जागत्याला आपल्यापासून दूर दूर न्यावे   …!  जिथे त्याला आपली हाक ऐकू येत नाही   … आपला आक्रोश  … आपले आक्रंदन  दिसत नाही   ! या सा-याच्या पलीकडे तो निघून जातो   …!  मागे उरतात आपले कोंडलेले श्वास आणि अधीर मन आणि मनाचा न दिसणारा कोंडमारा  !  गेलेल्याचे दुःख असते  की त्या सोबत उरलेल्या आनंदाच्या  ठेव्याचे आता काय करायचे याचा शोक असतो  …!!  असा "तो" आपला मित्र असतो आप्त असतो  आणि कधी कधी कुणीच नसतो   … पण काही क्षण जरी आपण "त्या" व्यक्ति सोबत घालवले असतील तरी पुढच्याच काही काळात तो आपल्यातून गेला तरी हृदयात खोल खोल खड्डा पडतो ....! अदॄश्य दुःखाची कळ छातीत येतेच  येते ....!!


           अगदी अलीकडेच आमच्या कॉलनीत  एक ड्रेस मटेरियल चे दुकान उघडलेले होते ! गेला आठवडा मी
ते पाहत होते ! दुकानाबाहेर लावलेले ड्रेसेस रोज पाहत होते,  आणि एकदिवस शेवटी त्या दुकानात प्रवेश केलाच   ....  तिथे एक २४/२५ वर्षाची लग्न झालेली मुलगी होती , तीचेच ते कलेक्शन होते! मोठ्या आवडीने तिने मला खुप सारे ड्रेसेस दाखविले, एक दोन मी  घेतलेही पण घरी येऊन पाहिले तर एक छोटा तर एक मोठा होत  होता  . पुन्हा मी  तिच्या दुकानात गेले  , तीनेही न वैतागता न रागवता अगदी हसत मला पुन्हा ड्रेसेस हसतमुखाने आणि तेव्हढ्याच उत्साहाने दाखवले   … पुन्हा घरी येऊन तेच छोटा मोठा  ! आता जर मी  तिच्या कड़े पुन्हा ड्रेसेस बदलायला गेले तर ती  नक्कीच वैतागणार म्हणून मी जरा कचरतच तिच्या दुकानात गेले पण तिच्या चेह-यावरचे तेच हसमुख भाव ! मग मात्र मला तिच्या बद्दल अतीव प्रेमच वाटले !

       थोड्या आस्थेनेच तिच्या दुकानाची तिची माहिती विचारली   … आज तिच्या दुकानात तिचा नवरा आणि तिची दीड वर्षाची छोटुली मुलगी पण होती  !  तिने सांगितले तिचे वडील लहानपणीच वारल्याने आईसोबत लहानपणापासूनच काहिनाकाही कष्ट करायची आवड होती ! लग्न झाल्यावरही हा उत्साह कमी नाही  झाला।    दुकानात तिने ड्रेसेस सोबत इमिटेशन ज्वेलरी पण विकायला ठेवली होती.   घर मुलगी संसार  सारे सारे सांभाळून ती स्वतः सर्व खरेदी करण्यासाठी दादर मुंबई ठाणे इथे प्रवास करायची   …! ताई मला अजुन खुप वाढवायचे आहे माझे दूकान   । ही तर अजुन सुरवात आहे ! मीहि तिच्या मेहनीति स्वभावावर खुश झाले , तिचा तो उत्साह पाहुन तिचे कौतुक वाटले। . आणि नको असताना अजुन दोन अधिकचे ड्रेसेस तिच्याकडून खरेदी केले ! आणि माझ्या मैत्रीनींनाही तिच्या दुकानाची माहिती देईन हाँ असं तिला सांगितले तर तीला आनंदही झाला ! हसत हसत मी तिचा निरोप घेतला  !

       नंतर मी एकदोन  दिवस येता जाता तिला कधी लहानग्या मूली सोबत गि-हांइकाना हसतमुखाने ड्रेसेस दाखवताना पाहत होते   …!  पण एक दिवस  दूकान बंद दिसले मला वाटले आज सोमवार म्हणून दूकान बंद असेल ,  पण नंतर दोन दिवस दूकान बंदच होते !  माझे मलाच वाटले गेली असेल गावी, किंवा नव-या बरोबर मुलीसोबत फिरायला  … ! पण सलग एक आठवडा दूकान बंदच होते , खरंतर मला असंच दुकानातून ज्वेलरी पहायची होती  .   पण दूकान बंदच ! तिला भेटून एक आठवडा उलटला होता  .

      त्या दिवशी रोजच्या प्रमाणे सकाळी लेकिला शाळेच्या बसवर सोडायला मी घराच्या गेटपाशी उभी होते
माझ्या सोबत अजुन एक दोन जणी आपल्या मुलांना घेऊन उभ्या असतात  .  बस आली मुले गेली की आम्ही काही मिनिटे बोलत असू  … आणि बोलता बोलता माझी मैत्रीण दीपिका बोलली  अगं आमच्या बिल्डिंग मधली एकजण गेली ना अचानक   … ! मी विचारलं कोण गं ?  अगं तीच जिचे ते नवीनच कोप-यावरचे ड्रेसचे
दूकान होते !  ती अशी बोलली आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली ! डोळ्यापुढे अक्षरशा अंधेरी आली ! कसेतरी तोंडातून शब्द आले , अगं काय सांगतेस काय ? गेल्या आठवडयात तर मी तिच्याकडून चार ड्रेसेस घेतले ! किती गोड हसमुख मेहनती होती  गं  ती !  काय  झालं काय गं तिला !  हार्ट अटॅक  आला असं कळलं ! काय ? एवढ्या लहान वयात ? खरच माणसाचं काही काही खरं नाही  !

       मला प्रचंड मोठा धक्का होता तो !  तसे काही नाते नव्हते तिच्याशी पण तरीही तिच्या सोबत घालवलेल्या त्या क्षणांसोबत नकळत  तिच्या स्वप्नांशी माझे नाते जोडले गेले होते !  तिच्या हसमुख मेहनती स्वप्नाळु कष्टांसोबत मनाचे भावबंध जोडून बसले होते !  तिच्या त्या छोटुल्या लेकिसोबतच्या तिच्यानंतर तिचं कसं होणार ह्या काळजीसोबत मीही काळजीत पडले होते !  किती किती नात्यांनी मी जोडले गेले !  तिची स्वप्न इथेच ठेवून गेली ती माझ्या जवळ   … त्यांचांच आक्रोश माझ्या मनात उमटत होता पण तो तिच्या पर्यन्त कसा जावा  … ?

        जे अवेळी जातात त्यांच्या स्वप्नांचे काय करावे ?  त्यांनी योजून ठेवलेल्या प्लॅन्सचे  काय करावे? त्यांनी त्यांच्या जीवन डायरीची काही पाने आगाऊच लिहिली असतील त्या पानांचे काय करावे?  चटका बसतो जिव्हारी अश्या "अवेळी" गेलेल्यांच्या सरणावरील ज्वाळांचा   .... आपण कितीही दुरुन त्यांना पहात असलो तरी ! मग त्यांच्या सोबतच्या  अद्वैतांचे काय होते  ?  ते जळतात आयुष्यभर काळ  कितीही लोटला तरी   … मध्ये मध्ये आठवत राहते त्यांची सोबत  … ! कितीही हळुवार असली तरी चटका देणारीच   ....!

      किती किती अवघड असते समजून घेणे  एखाद्याचे आपल्यातून अवेळी जाणं    ....!!



                                                                                         "  समिधा "

     



         

" सारं सारं जपून ठेवलय .... !! "


 

प्रिय  ....,

     तू लिहिलेल्या  "त्या " ओळींवरून प्रेमळ नजर फिरवली  .... अलगद हात  फिरवून त्यांना स्पर्श केला तेंव्हा  खुप दिवसांपासूनची तुझी अक्षरं मायेच्या , प्रेमाच्या स्पर्शाला आसुसलेली वाटली   ....  माझ्यासारखीच   …!! 

     तू दिलेले घडयाळ जपून ठेवलय ....! त्या वेळेसारखंच जेंव्हा तू अनं मी वेळेचे भान विसरून बोलत असू  …
ते शब्द आणि त्या मागील अर्थ जे तेंव्हा समजले  अनं  काहींचे अर्थ जे अजूनही वेगवेगळ्या संदर्भात शोधून लावत असते  .... तुला पुन्हा पुन्हा नव्याने भेटत असते  … पारखत असते  .... शोधत असते  ....!! 

     तू दिलेले पेन जपून ठेवलय  … !   पेनातली शाई कधीच संपलीय  … पण त्या शाईने तू गिरवलेले माझे नांव अजूनही तसेच ताजे  … टवटवीत आहे , त्या  कवितेच्या ओळी सारखेच  … " गोडी अपूर्णतेची लावील वेड जीवा "

     तू दिलेल्या  गज-याला जपून ठेवलय  .... !  फुलं , पाकळ्या गळून गेलेत …  पण फुलं गुंफलेली गुंफण अजुन तशीच आहे … फक्त फुलांच्या  जागी  तुझ्यात अडकलेल्या प्रत्येक क्षणांच्या स्मृतीं गुंफल्या आहेत …! 

     काळ  पुढे सरकलाय पण तुझ्यासोबतचे क्षण काळासोबत माझ्याजवळच घुटमळत आहेत  …! त्या क्षणांना मुक्ती मिळावी असं मलाही वाटत नाही  … !! कारण जेंव्हा जेंव्हा जगण्याच्या मुळाशी ते क्षण मी  शिंपडते जगणे ताजे ,  टवटवीत  होते …! 

     हो मी  हे  सारं  सारं  जपून ठेवलय  निर्मळ , निरागस ,  उत्फुल्ल जगण्यासाठी   …!!


                                                                                          " समिधा "

    


    

" प्रिय पाऊसा ......!



प्रिय  …,
    खरं  तर ' सात जून ' हा दिवस पावसाच्या आगमनाचा  संकेत असतो   ....  मागच्या वर्षी मात्र पहिला पाऊस  कधी  पडला माहीत नाही   ....  पण यावर्षी  'पहिला पाऊस ' सात जूनलाच आला  ..... पहिल्या पावसाची पहिली  सर म्हणजे मातीच्या गंधाचा दरवळ  आणि आतापर्यंत तापलेल्या जमिनीला शीतलतेचा स्पर्श   ....  यावेळी सर्वांच्याच चित्तवृत्ति उमलुन येत असतात   … एक विलक्षण नवचैतन्याची लहर सा-या वातावरणात वहायला सुरुवात होते   .... त्यामुळे प्रत्येकाच्या मनात उत्साहाची हिरवळ फुलत असेलच  ....!! 

     हा अनुभव मला नविन नाही   ....  पण प्रत्येक वर्षी मनाला तो नविन भासतो   …!! म्हणूनच पहिल्या पावसाने दिलेला अनुभव एव्हढया आत्मीयतेने सांगावासा वाटतो   ....!! 

     ज्या दिवशी पहिला पाऊस आला त्या दिवशी माझी मनस्थिती थोड़ी बैचेन होती   … पण पाऊस आला आणि मनाची बैचेनी , मरगळ पार विरुन गेली   …!! मातीच्या  चित्तवृत्ति उल्हासित झाल्या   … आनंदी आवेगाने तो मृण्मयसुगंध साठवत  होते   … पण माला अजूनही न सुटलेले कोडं त्या दिवशीही पुन्हा कोडयात टाकून गेले     ....!!!

      पहिल्या पावसाचे आणि माझे काही  अनामिक बंध आहेत  ....?  की त्याच्या येण्याने माझ्या हृदयात अगदी एक अनामिक हुरहुर तो लावून जातो  ....  कशाची असते ती   …? जुन्या स्मृती अश्यावेली मातीच्या गंधासोबत आपलाही दरवळ मांगे सोडून जातात   …!!!

     माझ्याभोवतीचा हां अनुभव घेऊन मी पहिल्या पावसाला  एक फ्लाईंगकिस देऊन निरोप दिला   …! तोही  विरघळला  हळुवार थंडगार हवेत   …ओलेत्या पानांवरून घरंगळणा-या थेंबात   …!! मी  पाहिलं  तो शहारला  … माझ्यासारखाच   .... एका अनामिक स्पर्शाने   ....!!!


                                                                                       " समिधा "

    

'कन्फेशन बॉक्स' ….!

 सॉरी  शोना  .... परत असे नाही होणार   … !  आणि असं मी म्हणताच माझी लेक माझ्यावर काही वेळापूर्वी रागवलेली असते ती मला एका क्षणात प्रेमाने बिलगते   ....! 
       खरच आहे आपण कित्येकदा आपल्या पिलांवर केवळ  आपल्याला आवडले नाही म्हणून त्यांनी त्यांच्या आनंदासाठी केलेल्या कित्येक गोष्टीसाठी  आपण रागावलेलो असतो  …… ! फटकावलेले असते …!  पण  ती  मात्र आपल्याला किती सहजपणे माफ करतात …! ( खरच माफ करतात की आपला तो "सॉरी"   म्हणतानाचा  बापूडवाना चेहरा पाहून त्यांना त्यावेळी दया येते…?)  पण   जसजसे ते बुद्धीने आणि वयाने मोठी होतात त्यांच्यातील मानापमानच्या  जाणिवा जाग्या होतात ……!  त्यांच्यातील बालसुलभता हळुहळू कमी होऊन  मोठ्यांमधला व्यवहार त्यांच्या ठायी येतो तेंव्हा मात्र आपण अस्वस्थ होतो  …!  ह्या  स्वभावातील आवर्तनातून आपण मोठेही गेलेलो असतो   … … तरीही त्यांच्या वागण्याने आपल्याला धक्का बसतो. 

        खरे तर आपल्या मुलांना समजून घेणे आणि समजावून सांगणे एका पातळीवर फारच कठिण असते  .   त्यावेळी आपल्या संयमाची खरी कसोटी लागते   .... !  मुलांमुळे संयम आणि सहनशीलता आणि अतीव  माया हे  स्वभावतील स्थित्यंरण  आपले पूर्ण व्यक्तिमत्त्व बदलू शकते   !   आई /बाबा  होण्यापूर्वीचा आपला हटटीपणा , संताप तुलनेने कमी झालेला असतो  … हृदयातील माया , कणव  जास्तच वाढलेली असते  … !  एक नवा आयाम संपूर्ण  जगण्याला आणि वागण्याला मिळत जातो  .... ! 

        मी माझ्या लेकीची  अत्यंत आभारी आहे  … !  तिच्यामुळे आज माफ़  करण्यातला सहजपणा मला कळला  … !  माफ करण्यातला आनंद कळला  ....! संयम, सहनशीलता, प्रेम याची नेमकी ओळख करून दिली   .... !!   
थैंक्यू शोना  .....!! 

पुष्पांजली कर्वे


                                                                                                                                              समिधा                                    

"सहवाचन"


आज जागतिक ग्रंथ दिन...
वाचाल तर वाचाल हे आपण सर्वच जाणतो . वाचन संस्कृती जपली पाहिजे , वाढली पाहिजे .
परंतु आजकालची आपली पिढी जास्तीतजास्त फेसबुकवर च्याटिंग करताना दिसते.
वाचनाचे महत्व माझ्या कट्ट्यावरच्या मित्र मैत्रीणीना कळावे म्हणून हा प्रपंच.
"या ग्रंथाचे देणे , कल्पतरुहुन उणे
परीसापरीस अगाध देणे ,चिंतामणी ठेंगणा "
अर्थात -वाचनाने मिळणारे ज्ञान आणि आनंद यांचे मोल आपण कधीच करू शकत नाही..
तिथे चिंतामणीहि ठेंगणा आहे. दर्जेदार वाचनाने आपली प्रतिभा अधिक प्रगल्भ आणि
अधिक सकस होते.
निवडक ग्रंथांची आपकमाई गाठीशी असणारा माणूस आयुष्यातील व्यथा वेदनांची गाठोडी
काहीकाळ तरी मानगुटीवरून उतरवून ठेवून स्वत:च्या त्या आनंद गुफेत प्रवेश करून आनंदविभोर
होऊ शकतो. वाचन, मग ते स्वान्तसुखाय एकांती -मुकवाचन , स्वतः शी मोठ्याने केलेले मुखवाचन
असो अथवा प्रीयजनांबरोबर केलेले सह वाचन असो . वाचनाने मिळणारे आंतरिक सुख इंटरनेट
वरील सर्फिंगने नाही मिळत. पुस्तकातील प्रत्येक वाक्यागणिक प्रेत्येकजण आपापल्या मनात
स्वत;ची कल्पना चितारतो .... तो आनंद काही वेगळाच असतो. (मिलिंद बोकील यांचे "शाळा"
पुस्तक वाचले असेल तर याचा अनुभव नक्की घ्याल किंवा डायरी ऑफ ऑन फ्रंक हे पुस्तक
वाचले तर तिचे नाझी छळ छावणीतील भोगलेल्या दुखा:चा जिवंत अनुभव मिळतो. )
यामध्ये सहवाचन हा वाचनाचा सर्वात उत्कृष्ट वाचन प्रकार आहे.कारण सहजीवनाच्या
आंतरिक प्रेरणेचाच एक अविष्कार पुस्तकांच्या सहवाचनात प्रकटतो .
" तुका म्हणे सर्व सुख त्या संगती , घडले पण ते संतांचिया " सहवाचन हि अशीच एक
सुखाची पंगत आहे. सहवाचन म्हणजे सर्वांचे संगतीत केलेले ग्रंथ वाचन . कथा, पोथी -पुराणे
वाचन हे सहवाचनाचे प्रकार आहेत. सर्वाना बरोबर घेऊन घेतलेला वाचनाचा आनंद म्हणजे
काव्यसंमेलन. आणि काव्यसंमेलनातील आनंद म्हणजे परम सुखाची अनुभूति। …!

                                                                              "समिधा "

कोंडलेल्या या जीवांच्या .....!!


 birds in pinjara साठी प्रतिमा परिणाम


कोंडलेल्या या जीवांच्या
यातना समजून घ्या  !
जागवा संवेदना
वेदना जाणून घ्या   !

चिड़िया घर पाहताना पर्यटकांना आनंद देण्यासाठी कितीतरी जातिप्रजातीच्या सुंदर मोहक रंगांच्या , अावाजाच्या त्या रंगबिरंगी पक्ष्यांना त्यांच्या मूळ स्थानांपासून इथवर लांब आणून पिंज-यांमध्ये बंद केले होते. 

     प्रत्येक पिंज-यापुढे उभे राहून मोठा वैश्विक आनंद प्रत्येक पर्यटक घेत होता  .  आणि आतले पक्षी कावरे बावरे झालेले   …!  भेदरलेले , घाबरलेले  दिसत होते   . (निदान मला तरी तसेच दिसत होते ) .  जंगलात 
झाडांवर स्वैरपणे उड़ने , हुंदडने … आनंदाने ओरडणे  … मना प्रमाणे आकाशाचा वेध घेणे  । मर्जी प्रमाणे फुलांचा मकरंद , फळांचा रसास्वाद घेणे , बिया दाने टिपणे हा स्वत:चा स्वत: उपभोगलेला आनंद त्यांना या 
पिंज-यात, कृत्रिम फांद्यांवर आणि अडकवलेल्या धान्य आणि पाण्याच्या भांड्यांतून  मिळणार कसा  ??  (फिश टैंक मधले मासे पाहुनही मनाची अशीच घालमेल होते )  . 
किती क्रूर आहे माणूस ! त्यालाही असे अडकवले पिंज-यात तर त्याची प्रतिक्रिया काय असेल  ? 


                                                                                                      "समिधा"


" एक शायराना चिमटा …!!


    तिला माझ्याशी काय खुन्नस होती कोण जाणे ? ऑफिसात आम्ही सा-याजाणी लंच टाईम मध्ये एकाच टेबलवर  एकत्रच जेवायला बसायचो  !  तिच्याकडे रोज एक नवा मेनू , ती  स्वैपाकात सुग्रण होती , ( तर मी बा-याचदा फोडणीचा भातच टिफिनला आणायची फक्त कधी तो पिवळा कधी लाल एवढीच काय ती  व्हारायटी ) तिची रोज एक नवी साडी ( माझी आठवड्यातून एक साडी दोनदा रिपीट व्हायची ), प्रत्येक सणाला तिचा नवरा तिला एकतरी नवा दागिना तिला गिफ्ट द्यायचा  …! ( मी जुनेच पॉलिश करून घालायचे )  तिच्याकडे चपला , सैंडल , सपाता , शूज नुसता खच ( मी  खचलेल्या तुटलेल्या चपला जुळवून शिवून वापरायची ), तिच्या नव-याचं तिच्यावर खुप प्रेम आहे असं सतत सांगायची ( माझे माझ्या नव-यावर खुप प्रेम आहे असं कधी नव-याला पण सांगितले नाही) तिला एक छान उमदा मित्र होता . ( मी नव-यातच तो शोधत होते ) तिला छान मेकअप सेन्स होता , ( माझ्या कड़े मेकअप सेन्स म्हणजे मीना  पाउडरच माझ्या साठी कॉम्पेक्ट होता ) खरं तर आम्हाला तिचा हेवा  वाटावा असे , ती जगत होती  ....! मलाही तिचे कौतुक होते  !  पण तरीही तिला माझ्याशी खुन्नस काय  होती  … कोण जाणे  …?? 

     एक दिवस जेवणाच्या टेबलवार तिने जेवण झाल्यावर " प्लीज अटेंशन प्लीज़ म्हणत  सर्वांचेच लक्ष आपल्याकडे वेधून घेतले , मी आज एक शेर ऐकवते !  माझ्याकडे बोट दाखवून हं,  तू ऐक  हं  this is specialy for u   …!  आणि तिने शेर ऐकवला   .... 

                     
                                          " अगर तुझमें है हिरेकी सिबत 
                                             तो उजालेमें चमक कें दिखा  …!
                                             अंधेरेमें तो शिशेभी चमकतें हैं   …!!


     माझ्यासह सर्वांनीच या शेरवर टाळ्या वाजवल्या  … तिही खुश झाली   …!! पण मी  मात्र आतून फारच दुखावले   …!  मी  कधी कुठे पुढे पुढे करायला जात नाही   .... !  फक्त मी वाचन करते, गाणं छान  गाते , सूत्रसंचालन करते   ,  थोड़े फार लेख लिहीते ,  माझ्या आनंदासाठी कविता करते   …! कधीतरी एखाद्या मासिकातून छापून आलेली कविता कौतुकाने मैत्रिणींना वाचून दाखवते   …!  या पलीकडे माझ्याकडे कौतुक करण्यासारखे काय होते  …?  पण तरीही तिला माझ्याशी खुन्नस काय  होती कोण जाणे   …?

     मी खुप अस्वस्थ झाले होते  . तो शेर फ़क्त माझ्यासाठी का होता ? हे मला तिला विचारावेसे वाटत होते  …!
पण असे सरळ भाषेत प्रश्न विचारण्यापेक्षा तिच्या " शेर " ला " सव्वाशेर " नेच उत्तर द्यावे असे ठरविले   . एका कागदावर मी त्यांच्या शेर वर प्रतिशेर लिहिला   …!!  शिपायाला बोलवून सांगितले , मैडम जिथे कुठे असतील तिथे त्याना हा घडीचा कागद दे   …!! 

     थोड्याच वेळात मला उपायुक्तांच्या केबिन मध्ये बोलावल्याचा निरोप घेऊन शिपाई आला  … !! बाई साहेबांकडे गेली की काय माझा कागद घेऊन ? मनात विचार करतच मी  आत केबिन मध्ये गेले  .  साहेबांच्या समोरच ती  वरिष्ठ मैडम बसली होती  . आणि मघाशी मी  शिपयाकडे पाठवलेला कागद उपायुक्तांच्या हातात होता  .…!  " हे तुम्ही लिहिले आहे ? मी चाचरतच हो  म्हणाले   … !  " छान लिहिले आहे ! मी खालची नजर वर  केली  .  साहेब आणि ती  छान हसत होते  ! मैडम सांगत होत्या तुम्ही कविता करता ! keep it up ! आधीचा वृत्तांत मैडमनी स्पष्ट केलेला दिसत होते   …!  

     मी त्या कागदावर लिहिले होते   .... 
     (तिला चश्मा होता )

                                                   " तेरी आँखे हैं चश्मेबद्दूर  … 
                                                   पर हाय  ! उसमें ना  हो अगर वों नूर 
                                                  जो हिरे को हिरा नहीं , शीशेकोभीं पत्थर समझें  …!! "


                                                                                       
                                                                                                                 "समिधा "


                                                  

 

माझा आनंदाचा ठेवा …!


     खुप महिन्यांपासून मी ऑफिसच्या वाटेवर असलेल्या त्या फुटपाथ वरुन जात येत आहे  . फुटपाथवर चने शेंगदाने वाला,  फळवाला , पेपरवाला ते अगदी चप्पल दुरुस्त करणारा यांची रोजचीच जागा ठरलेली होती  ! कधीतरी मी वर्तमानपत्र विकत घेत असे तर कधी शेंगदाणे , फळ तर कधी माझी तुटलेली सैंडल शिवून घेतली आहे ! पण एक दिवस सकाळी तिथून जाताना  त्यांच्याच रांगेत फुटपाथ लगत असलेल्या ग्रील बसवलेल्या कठड्यावर आता  एक मोठा अल्युमिनियमचा पेटारा ठेवलेला दिसला ! पण त्याच्या आसपास कुणीही बसलेले अथवा उभे नव्हते   माझे कुतुहल चाळवले ,  मी मुद्दाम त्याच्या जवळून गेले , पेटारा मोठ्या दोरानी गच्च बांधून व्यवस्थित ठेवला होता  . आणि त्यावर एक कागद चिटकवला होता  . त्यावर मराठीत लिहिले होते , येथे जुनी नवी पुस्तके विकत मिळतील तसेच अल्प डिपॉज़िट मध्ये पुस्तके घरी वाचण्यासाठीही मिळतील . वां  !!! मनातल्या मनात मी माझा आनंद व्यक्त केला ! मी इकडे तिकडे पाहिले पण कोणीच त्या पेटा-याचा मालक दिसला नाही  मी जवळच्या मोचिला  विचारले इसका मालिक किधर है  ? त्याने नुस्तीच नकारार्थी मान हलवली , मलाही ऑफिसला जायला उशीर होत होता , मी तो नाद सोडून ऑफिसला निघून आले  . 

     संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर त्याच फुटपाथवरून जात असतांना सहज नजर पुढे गेली , तर तो पेटारा आता उघडलेला दिसत  होता आणि ग्रिलवर पुस्तकेच पुस्तके मांडलेली दिसत होती  .  माझी चाल नकळत वेगात आली आणि तिथे पोहचले, एक व्यक्ति ( पेटा-याचा मालक ) त्या ग्रिलवरील पुस्तके व्यवस्थित लावत होता। . भराभर डोळ्यात भरतील अशी पुस्तकांवर नजर फिरवली ,घड्याळात पाहिले गाडीला काही मिनिटेच उरली होती , थांबून पुस्तके चाळण्याचा मोह आवरला उद्या ऑफिस मधून जरा लवकर निघावे ऐसा विचार करून गाड़ी पकडायला धावले  .  जुनी , जुन्या लेखकांची प्रथम आवृतीतील पुस्तके मिळण्याचे हमखास ठिकाणम्हणजे फुटपाथ , असे मी अनेक मोठ्या लेखकांच्या लेखनातून वाचलेले होते , त्यामुळे मलाही एक दिवस हा खजिना मिळेल अशी आशा पल्लवित झाली .  तो विक्रेता संध्याकाळीच उन्हें उतरल्यावर आपले पुस्तकांचे दुकान इथे थाटत असे त्यामुळे मला गाड़ी पकडण्याच्या घाइगड़बड़ित मनसोक्त पुस्तके पाहताच येत नव्हती  . 

     दुस-या दिवशी ऑफिस मधून लवकर निघणे झालेच नाही।   आठवडा असाच निघून गेला , एक दिवस अगदी ठरवून लवकर निघाले , पण तो पुस्तक विक्रेता तिथे नव्हताच फ़क्त तो पिटारा त्या दिवसा सारखाच दोरान  गच्च बांधलेला  . हिरमुसुन गेले मी , पण पुढे दोन तीन दिवस असेच गेले  . मात्र त्या दिवशी तो पिटारा ही होता आणि तो  विक्रेता ही आज नेहमीची गाडी घालविण्याचे ठरवून त्या पुस्तकांजवळ थांबले , पुस्तके मनसोक्त पहिली, थोड़ी थोडक्यात वाचून  नजर फिरवली , पण एकहि घ्यावेसे असे पुस्तक मात्र वाटले नाही  . 

    त्यानंतर मी फ़क्त येता  जाताच त्या पुस्तकांवर नजर फिरवित असे , आणि पुस्तक विक्रेता आशेने माझ्याकडे पाहत असे।   पण एक दिवस मात्र थांबून त्याला विचारले जुनी चरित्र, काव्यसंग्रह नाहीत का  ? हो आहेत ना उद्या मी आणून ठेवतो , मी पण खुश झाले  . दुस-या दिवशी थोड़ी लवकर निघाले पण मला काही त्याने आणलेले पुस्तक पटले नाही  .  पुन्हा दोन तीन आठवडे असेच गेले . त्या पुस्तक विक्रेत्यानेही माझ्याकडे आशेने पहायचे सोडून दिले. 
                                                              V.H.Kulkarni 2
                                                              प्रा. वि. ह. कुळकर्णी   
     पण एक दिवस मात्र माझी मीच तिथे थबकले , एका पुस्तकावर माझी नजर गेली।  ते चरित्र होते, मधल्या काळातील, जुने वाटत होते , पुस्तक हातात घेऊन थोड़े चाऴले , पुस्तकाचे नाव होते "अच्युत बळवंत कोल्हटकर , चरित्र आणि वाङमय" आणि लेखक होते वि  . ह  . कुळकर्णी पुस्तक तसे जुने असले तरी चांगल्या स्थितीत होते , मुळातच मला चरित्र, आत्मचरित्र वाचायला खुप आवडतात, त्यामुळे अच्युत बलवंत कोल्हटकर यांच्या बद्दल मी  यापूर्वी कधीच वाचले किंवा ऐकलेही नव्हते पण तरीही त्यांचे चरित्र थोड़े चाळल्यावर आपल्याला ते नक्की आवडेल म्हणून ते मी  घेतले।   लेखक वि. ह. कुळकर्णी यांचेबद्दलही मला विशेष माहिती नव्हती पण त्यांचे नाव ऐकून होते  . पुस्तक विक्रेत्याने १०० रु. सांगितले मी  घासघिस करून व एक  "वसंतवीणा " हा  अतिशय जुना  काव्यसंग्रह रु. १० /- स घेऊन ते चरित्र रु. ६० /- घेऊनएकूण  ७०/ रुपयात   सौदा करून ते पुस्तक घरी आणले   .

     घरी येताच नेहमी प्रमाणे पुस्तकाची कितवी आवृत्ति पासून पाहायला सुरुवात केली ती पुस्तकाची १९७९ ची प्रथम आवृत्ति होती आणि सर्वात महत्वाचे आणि माझ्यासाठी सुखद  आश्चर्यकारक धक्का म्हणजे त्यावर या पुस्तकाचे लेखक  उत्तम ज्येष्ठ समीक्षक, लेखक प्रा. वि. ह. कुळकर्णी   (१४ एप्रिल १९०२ – ९ डिसेंबर १९८२) यांची स्वाक्षरी होती   . त्या प्रतिवर " श्री बापूराव नाईक  यांस  स्नेहपूर्वक भेट " असे  स्वहस्ताक्षरात लिहून त्या खाली त्यानी स्वाक्षरी केली होती ,  व दिनांक होती २९ नोव्हेंबर , ८०  .  त्यांच्या ओरिजिनल स्वाक्षरीची ही आवृत्ति माझ्यासाठी अमूल्य आहे  !   थोरा मोठ्यांची स्वाक्षरी आम्हा पुस्तक वेडयांसाठी अमूल्य ठेवा असतो  . प्रख्यात बॉलीवुड सीने नट नटयांचे ऑटोग्राफ मिळाल्यावर जेव्हढा आनंद आजच्या कॉलेज तरुण  तरुणींना होतो अगदी तसाच किंबहुना त्यापेक्षा जास्त आम्हा साहित्य प्रेमींना होतो ! आमच्या साठी  तो खजिना असतो आनंदाचा ठेवा असतो   तेंव्हा मनातून उगीचच स्वतःला आम्ही  विशेष भासतो  !     
       

  
   
      वेब नेट मुळे सारेच जग अगदी आपल्या कवेत आले आहे त्यामुळे  फेसबुक सारख्या सोशल नेटवर्क मुळे चांगले लेखक , कवी आपल्या संपर्कात येतात तेंव्हा त्यांच्याबद्दलचा आदर प्रत्यक्ष भेटीपेक्षा इथे अधिक वाढतो कारण एवढे थोर , श्रेष्ठ असूनही समान्य वाचक साहित्य प्रेमींशी ते थेट संपर्क ठेवतात. यात त्यांचा व्यावसायिक स्वार्थ असेल नसेल पण तरीही त्यांची आपल्या भिंतीवरची दखलही अशीच त्यांच्या औटोग्राफ मिळाल्यावार होणा-या आनंदासारखी असते   .!! आणि तो आमच्या भींतीवरचा "मास्टरपीस " असतो !



                                 
                                                                                                             "समिधा "


     







     

" मन वढाय वढाय ...........!!

                                              
                            
                                                    " मन वढाय वढाय
                                                     उभ्या पिकातलं ढोर
                                                     किती हाकला  हाकला
                                                     फिरी येतं पिकांवर   …!!"

     एखादी गोष्ट हानिकारक आहे कळतय  पण मन काही ऐकत नाही    ....!!  नको  वागू तसं , नको करू तसं 
तरी हेकट  (हलकट) मन जातंच त्या वळणावर    …!!  नुसतं जात नाही चांगलं फिरून येतं मनसोक्त   ....!! किती हाकलांवं तिथून पण जरा वेळ हलेल तिथून आणि पुन्हा वाटा शोधत तिथेच पोहचेल   …!!

     मनाचा मनाला दम देऊन पाहिला…, शेवटी आपल्यालांच भोगावे लागेल , असं मनाला समजावून पाहिले !
शेवटी याची , त्याची जवळच्यांच्या  शपथा घेऊन संपल्या   …!! पण मनाला आवर नाही   …!! 
मनाने मनाचं ऐकलं नाही तर फार फार वेदना होतात  …… पश्च्चातापाच्या !!!

     शेवटी जग्गनीयतां निर्मिकालाच धरते धारेवर   .... आता तू तरी सांभाळ  …! तुझ्या शिवाय कोण तारील मला ??  तुझी शपथ पुन्हा असं करणार नाही  …!!

     पण तोहि हरतो काही दिवसात …!  आणि मनही …!!  जाते त्याच वाटेवर … पुन्हा पुन्हा सर्वदूर    …!!!


                                                      "मन भुकेला भुकेला 
                                                       नाही त्याला समाधान
                                                       कसा  आवरावा त्याला ??
                                                       मन चंचल ,  बैचेन  "
                                                      

                                     
                                                                                                    "समिधा "

                                                                                                         

                                                        

                                     





  

लोकप्रिय ..........

एखाद्याचं आपल्यातून अवेळी जाणं ……!

       किती किती अवघड असते समजून घेणे  एखाद्याचे आपल्यातून अवेळी जाणं    ....!!  अगदी अनपेक्षित असते  आपल्या साठी   …!  काळाने गनिमिका...

हे तुम्हाला नक्की आवडेल......