नको देवराया अंत असा पाहू .... !!!

very old indian couple in sadness के लिए चित्र परिणाम

      आज ऑफिस मध्ये निवृत्त झालेल्या एक सफाईकामगार रुक्मिणी मावशी आल्या होत्या, माझ्या टेबल जवळ येऊन उभ्या राहिल्या , मी कामात होते त्यामुळे माझं त्यांच्याकडे लक्षच नव्हते , पण मला जाणवले कुणीतरी माझ्या टेबल जवळ उभे आहे, मी मान वर केली तर रुक्मिणी मावशी ... ! मी हसून विचारले काय मावशी कश्या आहात ? झाले ना सर्व पेन्शनची , ग्रॅज्युइटीची कामं .... हो गं लेकी  तुज्यामुळं सगळं यवस्थित मिळालं पैसं ... ! मलाही ऐकून बरे वाटले , आता या वयात त्यांना जास्त फे-या माराव्या लागू नयेत म्हणून खूप कमी दिवसात कागदोपत्री सा-या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून त्यांची पेंशन चालू केली होती . ऑफीसचा लंच टाइम झालाच होता , मावशी जेवणार नां आमच्या सोबत , चला जुन्या आठवणी जरा ताज्या करू ... मावशींना माझ्या सोबत घेऊन मैत्रिणींच्या टेबलाकडे निघाली तर मावशी थबकल्या , म्हणाल्या नको मॅडम , तुमी जावा , तुमी येवतर  मी हतच बसते ...! मला वाटले मावशी उगीचच  इकडे आलेल्या नाहीत . 

     रुक्मिणी मावशी रिटायर्ड होऊन दोन वर्षांनी आज ऑफिसला आल्या होत्या .... का बरं आल्या असतील...?  मी लंच आटपून आले तोवर मावशी माझ्या टेबलपाशी बसल्या होत्या,  मावशी चहा मागवते थांबा ... नका नका मॅडम सुरेशनी आताच दिला , सुरेश आमच्या ऑफिसचा प्रेमळ पिऊन , मग मीही हसले , हं बोला मावशी सगळं ठीक आहे नं ...? मालक कसा आहे तुमचां ....?  रुक्मिणी मावशींनी डोळ्याला पदर लावलां .... न्हाही वो ,मालक माजा मागल्या वर्षीच आजारानं गेला .... ! अरे बापरे ... काय सांगता मावशी ..? मी . हो नं ... त्याच्या जागंवर मोठया लेकाला लावलाय ,  तुम्हाला दोन मुलगे आणि एक मुलगी नां ? मी मध्येच विचारले . हो  लहान्याला माज्या  जागंवर लावलाया आणि लेकीचं लगींन आगुदरच झालया !  आता मी तिच्याकडंच असतुया ...! का तिच्याकडे का रहाता ? इथं असतानाच तुम्ही नवं  घर बांधलं होतं नां ? हो पन तिथं थोरला ल्योक आनि त्याची बायकापोरं राहत्यात आनि धाकालाबी येगळीकडं ऱ्हातोया .  पण मग तुम्ही का नाही राहत तिथे ? मी .  माजं त्यांच्या बायकांशी पटत न्हाय म्हून पोरांनी बायेर काढल्यान मला . , बापाची पेंशन थोरला घेतोया आनि माजी पेंशनितलं पाच हजार लेकिला देती , तिला कशाला ...? तिच्याकडं  राहती नव्हं मी ...!अर्ध्या पेंशनीत भागवते   हे ऐकून माझ्या काळजाला पीळ बसला ....! आयुष्यभर ज्या माउलींनी पोरांसाठी घाणी घुणीत कामं केली , स्वतःची काही हौस केली नाही ती माउली आज तीन मुलं असून बेघर आणि अशी लाचार होऊन जगते आहे ....! मुलांच्या सा-या हौशी , शिक्षण आणि लग्न करून दिली त्याचा मोबदला काय तर हे असे बेघर आयुष्य ...?
स्वतःच्या कष्टाचंही तिला खायला देत नव्हते ... एक भार म्हणून तिला तिच्याच पैशाने पोसत होते. लेकीनं तरी पैसे घेऊन तिला आसरा दिला ती कमावती नव्हती पण मुलांनी असं वागावं...? मी हे सारं ऐकून सुन्न झाले होते  ...! माझ्याकडून काही मदत पाहिजे का  मावशी  ..... ? मी विचारले !  पोरी मला कुटं काम मिळल का। ..?  काम   ...? मी  प्रश्नार्थक नजरेनं तिच्याकडे पाहीले  .  काम म्हंजी  धूनी भांडी कचरा लादी काय पन करीन  .....!  मावशीकडे  मला पहावत नव्हते  ...!  हाडाची काड करून पोरांना वाढवलं आणि आज एवढे कष्टांनंतरही तिच्या वाटयाला कष्टच  होते ...!!

          आमच्या शेजारी एक वयोवृद्ध जोडपे रहाते  ! दोघेही पेंशनर  ...!  मूली लग्न होऊन  सासरी गेल्या आणि मुलगा सून  नोकरी निमित्त बाहेर  गावी  ...!  मूली जावई तरी अधूनमधून आईवडिलांना भेटायला विचापूस करायला येतात , राहतात पण मुलाने जणू त्यांचे श्राद्धच घातल्या सारखे नाव गांव टाकले आहे  ...!  ह्या आईवडिलांना आर्थिक गरज नाही पण एकुलता एक मुलगा पण  त्याच्या भावनिक आधाराची त्यांना गरज असतांना मात्र तो मुलगा कुठेच नाही  ...!  इकडून आईवडिलांनी फ़ोन केला तर उचलत सुद्धा नाही   ...! अश्यावेळी ह्या आईवडिलांच्या मनाची अवस्था काय होत असेल...?  आज आहेत तर उदया   नाहीत अश्या अवस्थेत डोळ्यामध्ये सतत मुलाला  पाहण्याची आस दाटुन असते  ....! त्यांच्याकडे पाहिले की डोळ्यांच्या जागी अश्रुंचा समुद्र दिसतो  .... भरतीला आलेला  ..... पण  ओसंडून वहायला  त्यांच्याकडे किनाराच नाही....!!


           मी  आजूबाजूला असेही  वयोवृद्ध पाहिलेत की मुंबईची घरे वन रूम किचन अथवा टू रूम किचन  मग त्या वाढत्या पीढ़ी मध्ये सर्वात वयो वृद्ध माणसांची अडचण होउ लागते  ...!  एक सम्पूर्ण रूम त्यानी अडवल्या सारखीच  ..... मग त्यांची रवानगी बिनदिक्कत चांगल्या सेवेच्या नावाखाली वृद्धाश्रमात केली जाते  .....!!


         असे  हे दुःख  आणि अशी ही माणसे पाहिली की वाटते हीच माणसे कधी काळी  डेरेदार वृक्ष होती   ...!   कष्टाने आपल्या लहान वेली फुलांना जपले मोठे केले सावली दिली   ...!  आज  त्यांना सावलीची आधाराची गरज पण ती  उघडयावर पडली होतीं   ....!! मृत्यु येत नाही म्हणून जगत राहायचे आणि हताश होता होता पुनः पुनः स्वतःला सावरायचे  हा जीवनाचा खेळ त्यांनाही नकोसा असतो   .....! आम्हाला हे आयुष्याचे दान नको  ... मृत्यु आला तर बरे असे  डोळ्यातले आधीच सुकलेले पाणी ओघळत कोरडे निश्वास सोडत नको देवराया अंत असा पाहू  .... असे विधात्याला विनवत असतात  ....!!  आणि हेच हात आपण त्यांना नमस्कार करायला वाकल्यावर   "शतायुषी"   हो  असा आशीर्वाद देताना   थरथरत  असतील का    ....?   त्यांचे मला ठावूक नाही पण असा आशीर्वाद मला कुणी दिला तर माझे मन मात्र  थरथरते   ....!!



                                                                                                                 *** समिधा 


        


         




प्रिय ......... काल रात्रभर जागीच होते....

 


प्रिय .........
काल रात्रभर जागीच होते....
तुला भेटून आल्यापासून काहीच
सुचत नव्हते....
आईनेही विचारले पण काहीच सांगता आले नाही....
किती कोवळी हळवी पहिली भेट पण ....मनावर मोरपीस फिरवत संपली....!!
देवळाच्या चौथ-यावर हातानं
रांगोळी काढत काढत किती अनं
काय बोलले ,ऐकलं काही आठवतंच नाही....!
तुझ्या विशाल अथांग डोळ्यात पहातांना मी त्यांत कधी हरवले
कळलंच नाही....!
ह्रदयाची धडधड आणि अंगाची
थरथर त्यामुळे मुखातून शब्दही
फुटत नव्हते...!!
आणि जेव्हा तू हातात हात घेतलास .....शरिरात अशी
वीज थरारली की अंगअंग तापून गेले
म्हणूनच कदाचीत कालपासून ताप भरलाय....!!
कुठेसे वाचले होते यालाच प्रेमज्वर म्हणतात म्हणे 😚
तुझ्या प्रेमाला होकार द्यावा की नाही तोच विचार करते आहे...!

प्रेम सोपे नसते .....हेच ऐकत आले आहे....पण मन मात्र नाही नाही म्हणता तुझ्याकडेच धाव घेतेय...!!
पण मला भिती वाटते...हा प्रेमसागर मी पार करू शकेन...?
प्रेमाचे नाते जुळायला प्रथम मनं एकत्र यावी लागतात .....मनाकडून मनाकडे जाणारी ओढ हीच खरी नात्याची गरज आहे......!!
शरीर हे माध्यम असते पण तेच जर नाते टिकवण्यासाठी साधन
म्हणून वापरले गेले तर तो केवळ बाजार असेल! लग्न हा समाज संमत शरीर सुखाचा मार्ग असला तरी त्या नात्यातही शरीरापेक्षा मनाचा विचारच आधी करावा मन हे सर्व सुखाचा सांगाती असतो मनातून फुललेले नाते कायम टिकते .....!!
प्रेमाला वासनेचा शाप असतो,पण जेव्हा त्या क्षणीक मोहाला लांघून जेव्हा तुम्ही फक्त प्रेम निवडता तेव्हा
ते खरं आत्म्याचं आत्म्याशी मिलन असतं...ते नातं शारीर नात्याला मागे टाकून आत्मीक नाते प्रस्थापीत
करते आणि नातं फुलत जातं अव्यक्तपणे अविरत आणि अनंतकाळासाठी.....!!
मग तिथे देह गळून पडतात अनं उरतात
फक्त आंतरीक संवेदना तीच मग
दोन जीवांना बांधून ठेवते...!
मग काय फरक पडतो
तू तिथे अनं मी इथे
अशी अवस्था होऊन जाते!!!
तू मला वेडी म्हणशील पण मी तर प्रेमाची अशीच मोहक सुगम कल्पना केली आहे ...!!
असं सात्वीक प्रेम अपुर्ण राहीले तरी त्याची गोडी मात्र निरंतर अवीट रहाते...!!
असं निर्मळ तरल प्रेम आयुष्याला
प्रत्येक वळणावर दिलासा देत रहातं...!
आयुष्यात आलेले खरं प्रेम हे अमृता सारखे असते ...जीवनात
कायम चैतन्य भरून ठेवते...!
मला त्याच चैतन्याचा ध्यास आहे!
प्रेमातून प्रेमाकडे जाणारा मार्ग म्हणजे सर्जनशीलता ...आणि जीवनात आनंदही सर्जनशिलताच निर्माण करते...! प्रेमानुभव घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीला एक आत्मीक
सुखाची अनुभूती अनुभवता येते
प्रेम हे शाश्वत आहे ....! प्रेम सर्व सुखशांतीसंयमाचा सांगाती आहे
प्रेम म्हणजे शक्ती
या सर्व अनुभूतींचा आनंद मला देशील ...??

कदाचीत उद्या माझे उत्तर नाही असेल पण तरीही माझे तुझ्यावरील प्रेम कमी होत नाही आणि हो असेल तर संपणारही नाही....! पण....
उत्तर काहीही असो प्रेमानुभवाची जाणीव संवेदना आपल्यात निर्माण होणे हे सुद्धा
एक स्वर्गीय सुख आहे ते मला मिळाले , निमीत्त तू आहेस हे खरे असले तरी त्या जाणीवेतून
मिळालेला निर्गूण निराकार आनंद माझा फक्त माझा आहे!!
तुझ्याबरोबरचे ते काही क्षण हिंदोळ्यावर झोके घेत
पुन्हा पुन्हा जगते आहे.....अखंड अविरत निरंतर !!😄😄😄

*** तूझीच ..... 😚


                                                           
                                                             "समिधा "

                                                 

" दि डायरी ऑफ अँन फ्रँक "

     


     दि डायरी ऑफ अँन फ्रँक" हे पुस्तक हातात आले आणि पुस्तकाच्या प्रस्तावनेवरूनच हे पुस्तक अतिशय सुंदर वाचनीय ठरणार याबाबत खात्रीचे पटली!हे पुस्तक जसजसे वाचत जावे तसतसे ते आपल्या भाव भावनांचा ताबा घ्यायला सुरूवात करते!! कित्येक ठिकाणी तर आपल्याच जीवनातील परिचीत रंग अनुभवाला येतात!१९४२ मध्ये दुस-या महायुद्धात जर्मनानी ज्यु लोकांचा जो अनन्वीत छळ मांडला होता त्या छळाला टाळण्यासाठी अँन व तिचे आई वडील व बहीण मार्गारेट एका डच कुटूंबाच्या मदतीने अज्ञातवासात रहात होते . या अज्ञातवासात त्यांच्याबरोबर श्री व सौ व्हेडँन व त्यांचा मुलगा पिटर हे कुटूंब व डसेल हा दंतवैद्य होता . 

      १९४२ जुलै ते १ऑगस्ट १९४४ पर्यतचा त्यांचा अज्ञातवासातील जीवनपट अँन ने ह्या तिच्या डायरीतून दिसतो. केवळ १४-१५ वर्षाची अँन पण ह्या तीन वर्षांत अँनच्या मनस्थीतीत होणारी स्थित्यंतरे वाचतांना जीवनाबद्दलची आसक्ती माणसाला जगायला शिकवते याचा प्रत्यय येत रहातो . प्रत्येक क्षणाला जर्मन गेस्टोपांच्या धाडीची टांगती तलवार घेऊन या माणसांचे जगणे म्हणजे मृत्यू जवळ होता पण तो दिसत नव्हता ... पण त्याची जाणीव सतत होती..यात दिलासा हाच सर्व आपली माणसे जवळ होती!

      या डायरीत अँनच्या मनातील वैचारीक आंदोलनाचे हेलकावे आपल्याही मनात नकळत येत रहातात..."किटी" नांव तीने आपल्या डायरीला दिले होते , किटीला ती आपल्या मनातलं सर्व सांगायची.या अज्ञातवासात कुटूंबातील ठरावीक चेह-याशिवाय तिला कुणी पहाताच येत नव्हते , अँन एक स्वप्नाळू निसर्गवेडी मुलगी पण बाहेरचा साधा प्रकाश ही दिला अनुभवता येत नव्हता . या तीन वर्षांत अँनमध्ये होत गेलेले बदल म्हणजे एक हट्टी मुली पासून एका समजुतदार, भावूक मुलगी हा तिच्या स्वभावातील बदल वाचण्यासारखा आहे ! आधी कुणाशीच पटवून न घेणारी पण नंतर मात्र बाहेरील ज्युंचे छळवणूकीचे दु:ख ऐकले की तिला आपण आपण खुप सुखी आहोत असं वाटण्याऐवजी जास्त दु:ख होई!

      याच दरम्यानच्या काळात पिटर सोबत तिचे जुळलेले नाजूक भावबंध अतिशय संयतपणे यात तिने मांडले आहेत , हे वाचणे खरंच खुप छान अनुभव आहे! 

     अँनचे कुटूंब पकडले जाते.... आणि त्यानंतरची त्यांचा छळछावणीतील अनुभव वाचल्यावर अँनचा असा अंत होणे आपल्याही डोळ्यांत पाणी आणते. तरीही एकदा हे पुस्तक वाचलेच पाहिजे, माणूस आणि त्याची स्वप्न या दरम्यान नियती/ परिस्थिती असते आणि तेव्हा होणारा संघर्ष म्हणजे जीवन! मग कुणाची त्यात आहुती पडते तर कुणी राखेतुनही पुन्हा नव्याने उभारी घेते!!! याचा अनुभव देणारे हे पुस्तक आहे....... !!

                                      

                                                                             "समिधा"
(त.टिप या पुस्तकाची मराठी आवृत्तीही उपलब्ध आहे) 

लोकप्रिय ..........

एखाद्याचं आपल्यातून अवेळी जाणं ……!

       किती किती अवघड असते समजून घेणे  एखाद्याचे आपल्यातून अवेळी जाणं    ....!!  अगदी अनपेक्षित असते  आपल्या साठी   …!  काळाने गनिमिका...

हे तुम्हाला नक्की आवडेल......