द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज , लेखिका : अरूंधती रॉय

May be an image of flower and text


*पुस्तक : द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज ( कादंबरी लेखन काल 1969 ते 1997)*
मुळ इंग्रजी पुस्तकाच्या लेखिका : अरूंधती रॉय
लेखिका प्रशिक्षित वास्तू रचनाकार, पटकथा लेखिकाही आहेत*
प्रकाशन- 1997
मराठी अनुवाद : *अपर्णा वेलणकर*

मानवी प्रेमाचे कायदेकानून तयार केले गेले तेव्हापासून ....
*या कायद्यांनीच तर ठरवलं सगळं*
*प्रेम कुणावर करावं ?.....कसं करावं ?....*
*आणि किती?*
*हे सुद्धा*

द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज मधील हे वाक्य सर्वार्थाने मानवी संबंधांच्या मुळाशी असलेल्या प्रत्येक भावनेचे पृथ्थकरण करून स्वतंत्र, भिन्न अस्तिव असलेल्या प्रत्येक मानवाच्या *मौन* संवेदनांना व्यक्त करते!

*द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज* अरूंधती रॉय ह्यांची पहिलीच साहित्यकृती आहे! 14 ऑक्टोबर 1997 ला प्रकाशीत या कादंबरीला मानाचा आंतरराष्ट्रीय *बुकर पुरस्कार* लाभला आहे!
बुकर पुरस्काराच्या मानपत्रात या साहित्यकृतीचा सन्मान करताना *स्वत:च निर्माण केलेल्या उत्तुंग अपेक्षांना आणि कसोट्यांना उतरणारी अद्वितीय साहित्यकृती* अशा शब्दात या कादंबरीचा सन्मान करताना तिची उत्तुंगता लक्षात येते!

आंतरराष्ट्रीय लेखक समिक्षक यांच्याच शब्दात सांगायचे तर * यानंतर अशी कथा जणू पुन्हा सांगितली जाणार नाही.
हीच पहिली
....आणि एकमेव!

ही कथा घडते आहे केरळ मधील आयमेनेम गावात. निसर्गाने ओतप्रोत भरलेले भारलेल्या गावात एक ब्राम्हण कुटुंब पण त्यांनी धर्मांतर करून ख्रीश्नन धर्म स्वीकारला आहे! मुळातच एक उच्चभ्रू समाजातील कुटुंब !
या कुटुंबात राहेल आणि इस्था अशी दोन जुळी मुलं आहेत , आणि संपुर्ण कथानक या लहान जेमतेम सात वर्षाच्या मुलांच्या दृष्टीने, साक्षीने आपल्यासमोर येत राहते!
आणि म्हणूनच ते जास्तीत जास्त निष्पक्ष , तटस्थ आणि निष्पाप वाटते! ते कसे ते या कांदबरीतील एक एक पात्र यांच्याद्वारे आपल्याला जसजसे भेटत जाते तेव्हा आपसुक कळते!

अम्मू , ही इस्था आणि राहेलची आई, जीने स्वत:च्या मर्जीने बाबा नावाच्या एका चहाव्यापा-याशी लग्न करून आपल्या कुटूंबाचा रोश ओढवला होता, पण त्याच बाबाने तिचा विश्वासघात करून व्यापार वृद्धीसाठी तिला दुस-या व्यापा-यासोबत शय्यासोबत करण्याची जबरदस्ती केली, तेव्हा तिच्यातील बंडखोर स्री मात्र त्याला घटस्फोट देऊन आपल्या पापाजी आणि मामाजी या मातापित्याकडे परत येते
तेव्हा अर्थातच घरात एक घटस्फोटीत स्री त्यात दोन मुलांची आई असून तिनं असं पाऊल उचलणं म्हणजे समाज नियमांना तिनं डावललं आहे हा आरोप तिच्यावर होत राहतो!
अम्मू आपल्या विफल लग्नाचे फोटो पहात असतांना लेखिकेने ज्या शब्दात वर्णन केले आहे ते शब्दातीत आहे.. वर्णनात ती म्हणते
स्वत:च्या लग्नातले फोटोही अम्मूला परके अनोळखी दिसायला लागले होते, दागीन्यांच्या ओझ्यानं वाकलेली मुर्ख बावळट मुलगी, किती सजवलं होतं आपण स्वत:ला ....
*चुलीत जाळायच्या सरपणाला तेल पाजून चमकवण्याची ही व्यर्थ उठाठेव कशासाठी..?

अम्मुचं व्यक्तित्व आईपणाच्या ओझ्याखाली दबलेलं होतं खरं! ती तर मनमुक्त होती, तिला मुक्तीची स्वचछंदी ओढ होती, पण ही ओढ तिचं आताचं आईपण हे अस्तित्व उधळून टाकणारी होती पण तरिही समाज आणि रूढी परंपरांच्या खाली ते दबलेले , स्वत:च दाबलेलं अस्तित्व घेऊन ती आपल्या पापाजी ममाजी कडे आली होती !
पापाजी जे किटकशास्रज्ञ होते आणि जे पुरूष म्हणून स्वत:ला सिद्ध करतांना मामाजी आपल्या बायकोला मारहाण करीत , अपमानीत करीत! मामाजी जी स्वत:चा लोणचे आणि जैमचा व्यवसाय करून आत्मनिर्भर होती आणि सन्मानाने जगण्याची धडपड करीत होती तिचा तो आत्मसन्मान पापाजीमधील पुरूषाला मात्र अपमानाची जाणीव अधिक गडद करायचा आणि त्या कटू जाणीवेने ते तिला मारहाण करीत.
पापाजीं मेल्यानंतरही मामाजींचे त्यांच्यावर प्रेम नसतानाही शोक करणे म्हणजे एखाद्याच्या सवयीचे परिणाम , जसे की पितळेच्या फुलदाणीनं मारहाण करणं सतत अपमान करणं याचीही एक सवय मामाजीला एक सवय होऊन गेली होती. ...लेखिकेने केलेले हे वर्णन वाचल्यावर
*गुलामाला गुलामीची सवय झालेली असल्यावर मुक्त होणंही कसं जड जातं याची सल देऊन जाते!*

पण हे सारं पहाणा-या इस्था आणि राहेल यांच्या भावविश्वाला जे स्रीपुरूष संबंधाबाबत धक्के बसत होते त्याचा परिणाम त्यांच्या एकमेकांशी वागण्यातून बोलण्याच्या प्रतिक्रीयेतून बाहेर पडते होते! आणि इथेच पुरूष हा दमन करणारा असतो त्याला रोखले पाहिजे अशा भावनेने राहेल स्वत:ला घडवत गेली, आणि इस्था तिचा पहिला समवयस्क पुरूष होता!

याच कुटूंबातील बेबी कोचम्मा ही पापाजींची धाकटी बहिण जिचे एका मिशनरी पाद्री यांच्यावर एकतर्फी प्रेम होते जे विफल झाले, आणि क्यामुळे त्या दु:खात बेबी कोच्चम्मा आयुष्यभर अविवाहीत राहिली, पण आयुष्यातील हे रिकामपण ती दुस-यांच्या आनंदी, स्वच्छंदी आयुष्यात कडवटपणा पसरवून भरत राहिली...आणि त्याचे बळी अर्थात राहेल आणि इस्था आणि अम्मू होते!

चाको हा अम्मूचा मोठा भाऊ जो ऑक्सफर्ड युनिव्हरसिटीतून शिकून , मार्गारेटबरोबर लग्न करून तिकडेच स्थायिक झालेला, पण तोही आता घटस्फोट घेऊन त्याच्या सोफी मोल या मुलीला बायकोकडे सोपवून आयमेनेम परतला होता! पण तो पुरूष आणि घराण्याचा एकुलता एक वारस म्हणून त्याचे घरातून मात्र स्वागत झाले, अम्मूसारखी त्याला परकेपणाची अपराधीपणाची वागणूक दिली गेली नाही, पण तो आल्याने पापाजींचे मामाजींवर हात उचलणे मात्र बंद झाले, एकदा चाकोने मामाजीला मारण्यावरून त्यांना चांगलेच खडसावले होते, पण त्याचा परिणाम पापाजींनी मामाजींसोबतचे उरलेसुरले सर्व संबंध तोडून टाकले, अगदी श्वासांच्या अंतापर्यंत ते तिच्याशी बोलले नाहीत!

अशा हे एकत्रीत संपुर्ण वाटणारे कुटुंब पण तरिही विखुरलेले विखंडीत कुटुंब ! यातील प्रत्येकजण स्वतंत्र, भिन्न व्यक्तित्वासह जगत असला तरी वेदनेच्या, दु:खाच्या एका नाळेनं परस्परांशी जोडलेले होते!
प्रत्येकाच्या वेदनेचा, दु:खाचा गाभा वेगळा असला तरी तरी ठसठसणारे भोग सारखेच होते!
सुरूवातीला कथानक सहज स्वीकारार्ह्य वाटत जाते, कथानकात तेच घडते जे सामाजीक नितीनियमांत, रूढीपरंपराच्या अधिन आहे पण कथानक पुढे अतिशय बिभत्स वळण घेते , जेव्हा कथानकात वेलूथा या पात्राचा प्रवेश होतो, *वेलूथा* एक दलित तरूण जो कम्युनीस्ट चळवळीतील तरूण आहे, जो दलित आहे पण तरीही त्याच्या संपुर्ण स्वभावात, व्यक्तित्वात ते दलितपण दिसत नाही,तो आत्मविश्वासेने सर्व छोट्यामोठ्या समस्यांचे समाधान शोधतो आणि त्याच्या प्रेमात दोन मुलांची आई इस्था आणि राहेलची आई अम्मू प्रेमात पडते, त्याच्या अगदी जवळ येते! हे मात्र समाजाच्या रूढी परंपरा नियमांना जबरदस्त धक्का देणारे होते, तो काळ 1969 ते 1997 चा काळ ! समाजमान्य प्रेमाच्या, मानवी नातेसंबंधाच्या परिघांना भेदून जाणारी ती घटना अम्मूच्या कुटुंबाला सामाजीकदृष्ट्या उध्वस्त करणारी होती, आणि दलिक वेलूथाचा समाज नियमांच्या स्थापनेसाठी , सांप्रदायिक भेद बरकरार ठेवण्यासाठी पोलिसांकरवी खोट्या आरोपांमध्ये अडकवून ठार मारण्यात आले!
चाकोची मुलगी सोफी मोल हिच्या आकस्मित मृत्युचे कारण इस्थाला ठरवून त्याला त्याच्या वडीलांकडे बाबाकडे परत पाठवण्यात येते , सात वर्षाची जुळी भावंड या मोठ्यांच्या उलथापालथीत कुठल्याकुठे फेकली गेली! त्यांच्या भावविश्वांचा नुसता चिखल झाला होता! इस्था अम्मू राहेलपासून दुर गेला, इकडे वेलूथा प्रकरणाने अम्मूला घराबाहेर काढले आणि राहेलला दुर हॉस्टेलमध्ये पाठवले तीन आयुष्य एकमेकांपासून कायमचे दुर झाले,

31 वर्षानंतर ...31 साव्या वर्षी अम्मूच्या मृत्यूनंतर जेव्हा राहेल आयमेनेममध्ये परतली तेव्हा ती फक्त इस्थाला भेटायला आली होती, तो इस्था जो परत वर्षानंतर 31आयनेममध्ये परतला होता!

31 वर्ष..हा काळाचे वर्णन लेखिका करते..!
*बघता बघता दोघांचं वय झालं
अम्मूएवढं.
त्याच वयात मृत्यूने गाठलं होतं अम्मूला...
एकतीस वर्ष .
ना धड म्हातारपण आलेलं,
ना धड तारूण्य उरलेलं,
मधलंच राहीतरी.
कदाचीत जगणं पूर्णाशानॉ उमलेलं...
कदाचीत मृत्यू झडप घालील...
काहीही... कधीही....
असं वय.

पण आयमेनेममध्ये परतेला इस्था आता मौन होता...!

लेखिकेने त्याच्या शांततेचं मौन होण्याचे वर्णन ज्या शब्दात केले आहे ते शब्द म्हणजे मौनाच्या हुंकारांना हुंदके फुटावेत असे आहेत!
*त्याचं हे मौन विचीत्र, अवघडलेले नव्हतं ...काही नं बोलता कशाकशात नाक खुपसण्याएवढं धुर्त नव्हतं...न बोलून धुमसता आरडाओरडा करणारं आक्रस्ताळंही नव्हतं ...कुणावर ठपका ठेवण्याचा हेतू नव्हता अगर कशाबद्दल मुक निषेधही नव्हता ! काहीच करू नये, कीहीच बोलू नये अशा शाररीक मानसिक निष्क्रीयेतून स्रवलेला एक प्रत्यक्ष अविष्कार...एवढाच होता इस्थाच्या मौनाचा अर्थ!
उन्हाळा रणरणू लागला की आटलेल्या तळ्यातले छोटेछोटे मासे आपलं अस्तित्व गुंडाळून निपचीत पडून राहतात , तसंच इस्थाचं मौन!

* जिभेच्या आसपास रेंगाळणा-या शब्दांच्या झुंडी त्याच्या शांततेने हुसकावून लावल्या, वाक्यांची वस्र फेडून इस्थाचं मन सोलून काढलं आणि "विचार" केले संपूर्ण नग्न ! इतके स्थिरचीत्त , की, शब्दांची मुळी काही गरजच उरू नये ! त्यानं भुतकाळ पुसून टाकला, लख्ख वर्तमानाची चूळ भरून चिळकांडी उडवावी झाल्यागेल्यावर, इतक्या सहजतेने ! त्याचं मौन सहज सवयीचं झालं!*

या कांदबरीचा शेवट दु:खांताचा कडेलोट असला तरी सुखांताची सुरूवात असावी असा आहे! अम्मू वेलूथाच्या मनोमिलनाचे सुखांत वर्णन म्हणजे कादंबरीला पुन्हा पुन्हा ह्रदयाशी कवटाळून या संपुर्ण जगण्याशी तादात्म्य पावण्याचा अद्भुत अनुभव!

अपार यातनांनी भरलेल्या बालपणातील गंमतीजमती जादुई दुनिया उभी करता करता अरूंधती रॉय यांनी भाषा आणि कल्पनाशक्तीचा अद्भुत विस्तार घडवला आहे , तोच अनुभव देणारा हा अपर्णा वेलणकर यांचा मराठी अनुभव साध्या अनलंकृत शैलितला थेट, तिक्ष्ण बोचरेपणा घायाळ करतो!
मुळात लेखिकेनेच भुतकाळ आणि वर्तमानाचे चक्र सतत फिरते ठेवून , विलक्षण प्रतिभासामर्थ्याने अतिशय गुंतागुतीचे गहन कथानक अरूंधती रॉय यांनी आपल्या कथनशैलीतून बांधले आहे!

अखेरीस द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज या कादंबरीविषयी एवढेच म्हणता येईल की ही कहाणी आहे

*एका स्रीने स्वत:ला मुक्त करण्याची,*

*एका दलिताने स्वत:ला मनुष्य म्हणून स्वीकारण्यासाठी केलेल्या आकांक्षेचा समाजनियमांनी केलेल्या दमनाची,*

*स्रि पुरूष भेदातून जन्म घेणारा सामाजीक द्वेष आणि अपमानाचा लेखाजोखा सांगणारी!*


*समाज नितीनियम रूढीपरंपरा यांच्या पारंपारिकतेत स्वत:च्या स्वभाव प्रकृतीच्या विरूद्ध असूनही स्री-पुरूष सहजभावनेने स्वीकारत असेले *जीवन पद्धतीची*

वाचकाच्या जाणीवांना संमोहन घालणारा अनुभव , "द गॉड ऑफ स्मॉल थिंग्जने" आपल्या विपुल शब्दसामर्थ्याने, अपरिहार्य शोकांतिकेचा अनाहत नाद अचूक गाठला आहे!
हा नाद अनुभवायचा असेल तर हा मराठी अनुवादही अतिशय सुंदर एक स्वतंत्र कलाकृती इतकाच झाला आहे याचा अनुभव वाचकांना यावा!

मराठी अनुवाद - अपर्णा वेलणकर
प्रकाशक - मेहता पब्लिशर्स
प्रथमावृत्ती- 2001
किंमत : 300/-

©® पुष्पांजली कर्वे

"आपल्यातला चंद्र....!"


प्रतिमेत याचा समावेश असू शकतो: एक किंवा अधिक लोक, संधिप्रकाश आणि महासागर


      आपलं मन ...अनेक त-हेच्या विचारांनी भरुन असतं...! सद्यपरिस्थीतीचा विचार केला की वाटते आज प्रत्येकजण आपल्या मनमस्तिश्काचा दरवाजा बंद करून बाहेरील विचार भिंतींवर वाटा शोधण्यासाठी डोके आपटीत आहेत.
आपल्या प्रत्येकाला सुख समाधान शांतीचा चंद्र हवा असतो आणि आपण सर्व तर पाण्यात पडलेल्या चंद्रबींबाकडे धावत आहोत आणि तो चंद्रबींब ज्या पाण्यात आहे त्या पाण्याच्या मोहात अडकून त्यामध्ये अविचाराने बुडत आहोत ....पण ते पाणी जेव्हा संपूर्ण वाहून जाईल तेव्हा तो चंद्रबींब तिथे असेल ...?अर्थातच नसेल...!आणि तेव्हा आपले लक्ष वर आकाशाकडे जाईल तिथे ख-या चंद्राचे दर्शन होईल .
 
      अगदी तसंच बाहेरील विचार आचारांमधील संक्रमणात स्वत:ला भिरकावून देण्यापुर्वी आपल्या आतल्या अंतरमनातील अनुभूतीला एकदा पहा!
 
      आपण जे , ज्यांना वाचतो ,पहातो , ऐकतो हे सारं काय आहे...?ही सारी बोटं आहेत....!ज्यांना धरून आपण त्यांनी दाखविलेल्या मार्गांनी चालत असतो आणि ती बोटं धरून चालतच रहातो..! आपण ती बोटं तर सोडत नाहीच उलट आपण त्या बोटांनाच पुजायला लागतो....त्यांचेच उत्सव करायला लागतो!
 
खरं तर त्या बोटांना मागे सोडून , त्या बोटांत बोटं न अडकवता आपल्या आंतरीक अनुभूतीच्या शक्तीला सोबत घेऊन जीवनानूभवाला पहायचे , ती आपल्याला खरा प्रकाश दाखवते , खरे ,ज्ञान देते...!
ज्या दिवशी मोहमयी पाण्यातला चंद्रबींब मिटून जाईल , अशाश्वत बोटांची साथ सुटून जाईल तेव्हाच अंतरातला अनुभव चंद्र आणि आंतरीक शक्तीची शाश्वत साथ सोबत असेल ! ही सोबत प्रत्येकाला लाभो हीच प्रार्थना!
 
© पुष्पांजली कर्वे

*अर्धीमुर्धी कहाणी....* एक विलक्षण जीवनप्रवास !

 प्रतिमेत याचा समावेश असू शकतो: 1 व्‍यक्ती, मजकूर आणि जवळून

..
आत्मचरित्र - आसामी लेखिका इंदिरा गोस्वामी - अर्धीमुर्धी कहाणी
मराठी अनुवाद - अर्चना मिरजकर 
 
 
*अर्धीमुर्धी कहाणी....* एक विलक्षण जीवनप्रवास !
 
       अर्धीमुर्धी कहाणी म्हणजे इंदिरा गोस्वामी या भारतीय ज्ञानपीठ विजेत्या आसामी लेखिका यांच्या जीवनाचा हा अर्धैमुर्धा परिचय आहे! त्यांचे आत्मचरित्र तीन भागात प्रकाशीत झाले आहे.
आधालेखा दस्तावेज या आसामी आत्मचरित्राचा हा मराठी अनुवाद केला आहे आणि हा अनुवाद मराठी लेखिका अर्चना मिरजकर यांनी केला आहे!
सुविद्य प्रकाशनाने प्रकाशीत केलेल्या या मराठी अनुवादीत पुस्तकाचे मुखपृष्ठ शिरीष यांनी तयार केले आहे. 24 जानेवारी 2003 मध्ये ह्या पुस्तकाची पहिली आवृती प्रकाशीत झाली आहे!
मला स्वत:ला साहित्यातील आत्मचरित्र हा साहित्य प्रकार विशेष आवडतो! कारण प्रभावी व्यक्तिंच्या व्यक्तीमत्वांचे आत्मचरित्र वाचून आपल्यातील न्युनता, कमतरता असल्यास त्यांच्याकडे अतिशय सकारात्मक दृष्टिकोनातून एका अनोख्या उर्जेचे प्रेरीत होऊन पहाता येते!
आपल्यातील सृजनात्मक , आयुष्याकडील प्रोत्साहनात्मक खरा शोध आपल्याही नकळत सुरू होतो....!
अर्धीमुर्धी कहाणी या आत्मचरित्रातील इंदिरा गोस्वामी यांच्या आयुष्यातील अनेक घटनाक्रमांनी चकीत व्हायला होते, त्यांच्या कोलमडलेल्या मनस्थितीला समजून घेताना आपणही स्वत:ला त्या परिस्थीतीत मांडून पहातो... आणि वाटतं आपण कदाचीत संपूर्ण संपलो असतो... पण तरिही त्यांच्या आयुष्यातील जिद्द पाहून पुन्हा उभं राहाता येतं यावर विश्वास ठेवायला लागतो! 
 
या आत्मचरित्राताच्या सुरूवातीच्या मनोगतात लेखिका इंदिरा गोस्वामी यांनी हेआत्मचरित्र लिहावे यासाठी पहिली प्रेरणा देणारे आसामी लेखक होने बार्गोहाईन यांचं त्यांना एक पत्र आलं त्यातील हा मजकूर उदृ्धत केलाय त्यामधूनच या आत्मचरित्रातील घटना खुप प्रभावी असाव्यात याचा अंदाज येतो!
"* एखादा सामान्य पुरूष किंवा स्री दु:ख आणि वेदनेपुढे हार मानेल आणि मृतवत आयुष्य जगेल - पण तुझं दैव तसं नाही - कारण तू जन्मजात कलावंत आहेस आणि तुझी सर्जनशीलता हाच तुझ्या चिंतेवर, दु:खावर आणि अंशत: मृत्यूवर उपाय आहे!  *"म्हणजे (कलावंताची ) सर्जनशीलता माणसाला चैतन्य देते याचं हे आत्मचरित्र एक उत्तम उदाहरण आहे! तसं पहाता आसामी साहित्य विश्वात या आत्मचरित्राचं अतिशय निरूत्सहाने स्वागत झाले. कारण एका तरूण मुलीने लेखिकेने मग तिचे आयुष्य कितीही खळबळजनक असो तरी आत्मचरित्र लिहावं यावर त्यांनी टिका केली. 1986 मध्ये आसोमबानो या नावाने या आत्मचरित्राचा पहिला भाग आसामी भाषेत प्रकाशीत झाला. विशेष म्हणजे या आत्मचरित्राला "अमृता प्रितम " या पंजाबी सिद्धहस्त सुप्रसिद्ध लेखिका यांची प्रस्तावना लाभणं म्हणजे एखाद्या ज्वलंत आयुष्यातील निखा-यांना हाताळताना त्या त्या निखा-यांची तीव्रता केवळ अमृता प्रितम यांच्याशिवाय कुणाला जाणवावी... असा हा योग जुळून आला आहे! 
 
        जीवन म्हणजे सौदा नाही... या प्रकरणानं आत्मचरित्राची सुरूवात होते! किशोरवयीन असताना आसामच्या एका प्रसिद्ध ज्योतिषाने लेखिकेच्या आईला सांगितलं होतं "या मुलीचे ग्रह इतके वाईट आहेत की तिचे दोन तुकडे करून तिला ब्रम्हपुत्रेत टाकून दिलंत तर बरं होईल...!
आपल्या आजोबांच्या जहागिरीवर हत्तींबरोबर खेळणा-या या आसामी सौंदर्यवतीचं शिक्षण आसामचे शिक्षणअधिकारी असलेल्या तिच्या वडीलांच्या देखरेखीखाली शिलॉमगच्या पाईन माऊंट आणि गुहावटीच्या शाळेत झालं! पण बालपणापासूनच जणू तिच्यावर मृत्यूची सावली होती..!
वडीलांच्या प्रतिष्ठेमुळेच व तिच्या अंगभूत आकर्षणमुळे तिला रोज स्थळे सांगून येत पण त्यांच्या अकाली निधनामुळे ती स्थळं येणं बंदच झाले! आईची चिंता पाहून तिच्याही मनात आत्महत्येचे विचार येऊ लागले, आणि तिने तो एक असफल प्रयत्न केलाही! एका प्रतिष्ठित घरातील सुंदर तरूण मुलीनं असं कृत्य करणं म्हणजे तीच्याकडून काहीतरी प्रमाद घडला असावा, लग्नाआधीच तिला दिवस गेले होते का? अशा शंका घेणं म्हणजे एखाद्या पवित्र कुमारिकेसाठी अग्निदिव्यापेक्षा भयंकर आपत्ती, समाजाच्या नरकरूपी ज्वाला! मग तिच्याच लक्षात आले जगायचं असेल तर प्रत्येक आपत्तीचा सामना करावाच लागेल! आणि तिने तो केला! याच मनस्थितीत तिनं चोरून लग्न केलं पण ते नांदायला न जाताच संपलं....! त्यावेळीही तिच्या मनस्थितीचा परिस्थितीचा तिनं केलेला सामना वर्णनातीत आहे! इथपर्यंतचा त्यांचा प्रवास वाचून सर्वच पुढचे सर्वच असंभव वाटत राहते! 

     तिचे पुन्हा लग्न जुळावे म्हणून आईने त्या बगळा देवीला बोकडाचा बळी द्यायला सांगितले, देवीला काळ्या बोकडाचा बळी देऊन त्याच्या रक्ताचा टिळा इंदिेरेच्या कपाळावर लावण्यास भटजीने सांगितले, तो गरम रक्ताचा टिळा त्यानंतर इंदिरेच्या कपाळावर त्याची उष्ण बोचरी जाणीव अनेक दिवस होत राहणं म्हणजे एका मृत्यूचा थंडपणा भोगण्यासारखे होते!त्यानंतर योग्य कालावधीनंतर एक दक्षिणी मधू नावाचा इंजिनीयर त्यांच्या आयुष्यात येतो... त्यांचे रितसर लग्न होते,त्याच्या सहवासातील आनंदात घालवलेल्या दिवसांच्या वर्णनात गुजरात आणि काश्मिरच्या अप्रतिम सौंदर्याबद्दल लिहलं आहे!मधू त्यांचे पती यांचा सहवास फक्त दोन वर्षे लाभला...!
त्याच्या मृत्यूच्या वेळचं त्यांच त्यांना भेटणं..." मधू गेले, मी किंचाळले, मला अनेक शतकांचा काळ उलटून गेल्यासारखं वाटलं....आयुष्याची मुळं उखडली गेली होती...! माझ्या पायखालची विश्वासाची जमीन अचानक सरकली होती...! 
 
       मधूच्या अस्थी त्यांनी कायम त्यांच्या जवळ ठेवल्या ...अस्थिंचा रंग बदलला नाही फक्त पेट्या बदलल्या!
हे वर्णन वाचताना नकळत डोळे पाणावतात!
त्यानंतर त्यांनी वृंदावनात जाऊन तिथे घालवलेल्या दिवसांचं यथार्थ वर्णन करताना त्यांनी तिथे राधेश्यामी म्हणून विधवा जख्ख वृद्ध स्रीयांना सोडून दिलेलं असं त्यांची जीवनपद्धतीचं वर्णन म्हणजे स्रियांना समाजापासून कसं दूर वृंदावनात श्रीकृष्ण भक्तीसाठी येत असत पण अत्यंत एकाकी आयुष्य जगत होत्या! हे वर्णन प्रत्यक्ष वाचल्याशिवाय या राधेश्यामींच्या आयुष्याचे ध्येय म्हणजे केवळ प्रियकर पिता सखा म्हणून श्रीकृष्णाला वाहिलेले आयुष्य होते! इथे राधेश्याीमच्या ठायी पौराणीक श्रीकृष्णाचे अस्तित्व होते... पण ऐतिहासिक पराक्रमी श्रीकृष्ण खरा होता असं लेखिका म्हणते तेव्हा ती किती वास्तववादी जीवनाचा स्वीकार करणारी होती याची झलक पाहायला मिळते?
याच राधेश्यामींच्या वृंदावनातील जगण्याचं दारूण दर्शन या आत्मचरित्रात त्या घडवतात तेव्हा जगणं इतकंही भयानक नसावं अशी आपलीही भावना होते!
पुढे आपल्याला त्यांचा विद्वतापुर्णतेमुळे त्यांनी केलेला रामायणाचा अभ्यास यात वाचायला मिळतो... !
रामायण ग्रंथातील सिता या व्यक्तीरेखेचा त्यांनी केलेला अभ्यास खचितच आपल्या विचारतील सर्व अध्यात्मिक परिमाणं बदलून टाकते . !
 
     आपली संकुचित विचारक्षमता आणि दृष्टीकोन व्यक्त करण्यासाठी आतापर्यंत वेगवेगळ्या व्यक्तींनी आणि समाजांनी या अद्वितीय व्यक्तिरेखेचा कसा सोयिस्करपणे उपयोग करून घेतला आहे ते लेखिका सहज लक्षात आणून देतात...!
यात त्यांनी फिरदौसी या पर्शियन कवीच्या ओळी सांगतात..
" उस के मरने पर होंठ वह बात कह नहीं सकते
उसका बताना तू होता हैं, जब वह जल जाती है
कहने को स्री है, लेकीन बडे बडे बहाद्दरोंसे बढकर है!
सिताजीके के शरीर को किसीने वस्रहीन नहीं देखा
जैसे आत्मा शरीर के अंदर रहती है,
परंतू आत्माको किसीने नही देखा! 
 
      प्रस्तावनेच्या शेवटी अमृता प्रितम यांनी एक कथा सांगितली आहे, ती कथा वाचल्यानंतर ही कथा ज्या लेखिकेने लिहीली आहे तिचा समाजव्यवस्थेवरील अभ्यास आणि जातीव्यवस्थेचा तिने केलेला सर्वांगीण विचार किती अद्भूत अद्वितीय आहे याचा प्रत्यय येतो....! त्या दिर्घकथेची लेखिका अर्थातच इंदिरा गोस्वामी आहेत! एका विधवा ब्राम्हण युवतीने अगदी गरज म्हणून एका बटीकेचे कर्म स्वीकारले तरी तिने तिच्या जातीपेक्षा हलक्या जातीच्या व्यक्तीने लग्नाची मागणी घातली असूनही तिनं त्याला नाकारलं....!
नकाराचं कारण सांगताना ती म्हणते *" शरीरविक्रय करावा लागला तरी अर्थार्जन करणं माझं कर्तव्य आहे. मी नीच जातीच्या पुरूषाची शय्यासोबत करू शकते पण त्याला पुत्र देण्यासाठी मी त्याच्याशी लग्न करू शकत नाही!*
जातीव्यवस्थेची इतकी प्रभावी आणी प्रखर परिस्थिती मांडणा-या ह्या सशक्त लेखिकेचे मामोनी रायसम गोस्वामी यांचे हे भानक्षुब्घ अनुभव व कारूण्य यांनी भरलेलं आणि भारलेलं आत्मचरित्र आहे!
अवघ्या सत्तावीस वर्षाच्या जीवनानुभवात जीवनाच्या अनेक पैलूंना आंतरीक संवेदनांनी स्पर्श करणारी अशी ही अर्धीमुर्धी कहाणी! ❤
🌹
© पुष्पांजली कर्वे ✍️
साहित्य प्रकार - आत्मचरित्र ( आसामी लेखिका इंदिरा गोस्वामी)
आत्मचरित्राचे नाव- अर्धीमुर्धी कहाणी
मराठी अनुवादीका- अर्चना मिरजकर
प्रकाशन संस्था- सुविद्य प्रकाशन
प्रकाशन साल - 2003
मुळ आसामी आसोमबानो आवृती प्रकाशन साल- 1986

abida parveen best ghaza dil ishq mein.wmv

भेट............!

 pascal painting meeting romantic  girl and boy साठी इमेज परिणाम


 हेलो.........
 बोला.......
जेवलास.......
नाही.....अजून ...
लंच टाईम तर होऊन गेला नं.....
आमचं असंच असतं..... काही वेळेवर नसतं..... तू बोल..... जेवलीस....?
हो..... आमचं मात्र सारं वेळेवर असतं....
इकडे  सुमेधा हसली..... तिकडे सौमेशही हसला.............
तू म्हणाला होतास नां भेटशील तेव्हा काहीही माग, मी तुला देईन.....!
हो.... मग.... सांग नं काय पाहिजे .....?
बघ हं .... नक्की मागू ....? खरंच नं...?
एका तपानंतर, बारा वर्षांनी आपण भेटतोय ..... माग काय हवय तुला...?
मग.... उद्या येताना तू सर्व घेऊन ये....!
काय...?
मी तुला लिहीलेली सर्व पत्रं.....!
अरे..... ती नाहीत आता माझ्याजवळ!
म्हणजे काय झाली ती....?
आता ती नाहीत......!
तू ती  फेकून दिलीस  नं....!
तसं नाही.... घराचं दोनवेळा रिन्युव्हेशन झाले त्यामध्ये कुठेतरी  हरवली ती....! म्हणजे ती गंगार्पंण झाली नं माझी पत्रं.  मला वाटलं ..... जेव्हा आपण भेटू तेव्हा तू ती पत्र आणशील आणि मग प्रत्येक पत्र आणि त्यामागील आठवण रिफ्रेश केली असती आपण....
हं
तरी मी तुला सांगत होते मला ती पत्रं परत दे...... पण तेव्हा तू  म्हणालास तू नाहीस तर निदान ती पत्रं तरी असू देत माझ्याजवळ....!
हं.....
मी तरी जपून ठेवली असती ती  तुला एक एक पत्र लिहीताना जे जे म्हणून अनुभवलं ते ते तुला सांगायचं होतं!
हं....
तुला दिलेलं शेवटचं पत्र आठवतंय......? ते पत्र लिहीतांना कित्ती कित्ती रडले होते.  काही शब्दांच्या पुंजक्यांवर माझे अश्रू ओघळले होते.
हो ... ती अक्षरं पुसट झाली होती..... मी त्या अक्षरांना भरल्या डोळ्यांनी पहात राहिलो.... त्यांच्यावर ओठ टेकून त्यांना पित राहिलो.....
इकडे सुमेधा स्तब्ध झाली...... तिच्या डोळ्यात अमाप अश्रू दाटले होते....!
हेलो...... एेकतेस नां....... त्या आठवणी   माझ्या आत आत अजूनही फ्रेश आहेत....! अरे एवढा लाईव्ह तुझ्याशी बोलतोय ..... तुझ्याजवळ अाहे.... अजून काय पाहिजे तुला.........?
हं..... हे पण बरोबर आहे..... एवढया वर्षांत सर्व बदललं अगदी आपल्या अस्तित्वांसकट सर्व  .   फक्त बदलले नाहीत ते आपले मोबाईल नंबर ...!  पण व्हट्सऐप वर  भेटलो त्याला वर्ष झाले.  आणि मग आपण एकमेकांशी फक्त सेल वर बोलू लागलो ..... तेही दोन तीन आठवड्यातून एकदाच...... कधी  पाच मिनीट  तर कधी दहा मिनीट ....!
सुमेधा आतल्या आत खुप अस्वस्थ झाली होती.... पण तरी काही  अधिक बोलू शकली नाही.
तू एक काम कर तू आण तुझ्याकडे जे काय असेल ते......
मी...?  सुमेेधाने वैतागून विचारले.... मी काय आणू...? तू कधी काही दिलंयस का मला...?
का.... काहीच दिलं नाही ? सौमेशने आश्चर्याने विचारले.
घड्याळ गजरे,चौकलेट,बद्दल नाही म्हणत मी.... दोन ओळीचं पत्र तरी दिलंयस का कधी....?
एक सांगू ..... सौमेशने अतिव प्रेमानं विचारले.....
काय...... सुमेधानं कुतूहलाने विचारले..
आपलं हे नातं आहे नं तेव्हाही आणि आताही देवाणघेवाणीच्या  फार फार पलिकडले आहे. आपण एकमेकांसाठी आजही असणं हे आपल्या नात्याचं सर्वांग सुंदर देखणं रूप आहे.
सुमेधा क्षणभर स्तब्ध झाली.  काय बोलू यावर.... तुझं हे नेहमीचच आहे.... असं काही बोलतोस....आणि मग तुझ्यावरून जीव ओवाळून टाकावासा वाटतो.
मग.... भेटतोय ना उद्या आपण .....?  सौमेशने हसून विचारले......
हं.... सुमेधाही हसली.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
हेलो.........
बोला.......
जेवलास.......
नाही.....अजून ...
लंच टाईम तर होऊन गेला नं.....
तुला तर माहित आहे नं आमचं हे नेहमीचंच
सुमेधा क्षणभर शांत झाली......
हेलो........ कुठे हरवलीस.......
आपलं काल भेटायचं ठरलं होतं नं..... ?
हं
पण तू स्थळ, वेळ काहीच कळवलं नाहीस
अरे फार बीझी होतो , भेटायचं होतं पण ......ठरवून कैन्सल नको करायला म्हणून कामं आटपत राहिलो...
मग कामं आटपल्यावर तरी .....
अरे कामं संपलीच नाहीत........ मग तू नाराज होशील म्हणून कळवलेच नाही.
असा कसा रे तू......!
सौमेश हसतो..... मध्येच उसासा टाकतो
काय झालं.....?
काही नाही.... तुम्ही बोला....
किती विलक्षण आहे.....
काय
कालच म्हणालास नां मी तुझ्याजवळ लाईव्ह आहे, मग बाकी कशाची गरज नाही.
हं मग आहेच नं.....
सुमेधा उदास हसते....आपण बारा वर्षांनी एकमेकांच्या संपर्कात आलो त्यालाही वर्ष होत आले  पण या तीनशे पासष्ट दिवसांतून एक दिवस, एक तास, एक मिनीट एक सेकंदही  मला प्रत्यक्षात भेटला नाहीस.
 भेटू..... नक्की भेटू..... सौमेश भावूक होऊन म्हणाला. *(त्याला सुमेधाची तगमग कळत होती पण तो स्वत:ला समजावत होता, भावनेच्या भरात भेटून नको तो गुंता पुन्हा वाढणे वाढवणे योग्य नव्हते, त्याचाही संसार होता आणि सुमेधाचा सुखी संसार हा त्याचा आता आनंद होता.   त्यांच्या नात्याचं निर्मळ पावित्र्य राखणे दोघांची जबाबदारी होती. तो पुरूष होता पण सुमेधाच्या अस्तित्वाचा अभिमान राखणे ही त्याचीही जबाबदारी होती.... त्यालाही तिची प्रचंड ओढ होती आणि  तिलाही हे तो जाणून होता.....!)
आता कळलंय मला...... !  अगदी नक्की कळलंय मला !
काय.... सौमेशने आश्चर्याने विचारले.
एकदा का प्रेम आपल्या आत उतरले की , दुरावा.... विरहं.... या जाणीवांना शब्दश: काय , पण अक्षरश: काहीच अर्थ उरत नाही. आणि सौमेश तुला हे कधीच समजले आहे.
हं  .....
म्हणूनच तू असा शांत निश्चिंत आहेस . मलाच समजायला उशीर झाला.
सुमेधा..... सौमेशने  खुप आर्ततेने तिचे नांव घेतले..... आपण एकमेकांत जीतकं खोल अथांग उतरत जाऊ नं तितके अधिकाअधिक जवळ येऊ मग आपण शरीराने कितीही दुर असलो तरी ! मग ते हे  अंतर, वेळेचं असो नाही तर स्थळाचं असो....!
खरं आहे सौमेश.... आणि तेव्हा तू माझ्या समोर असशील आणि मी तुझ्या जवळ असेन. आणि याचा अनुभव घेतला मी.  तुला कालचा अनुभव सांगितला तर  खरं नाही वाटणार .
काय .... कुठला अनुभव?
काल मी सकाळपासून तुझ्या फोनची निरोपाची खुप खुप वाट पहात होते .
मग तु तरी फोन करायचास नां
मनात म्हटले भेटायचेच आहे  तर तूच फोन करून सांगशील आणि तसेच काही नसेल तर तुला फोन करून उगीच धर्मसंकटात का टाकू..... म्हणून खुप ईच्छा असुनही नाही केला.
मग...
संध्याकाळ झाली आणि समजून गेले .  आफीसमधून स्टेशनवर आले....आणि तुझ्याच विचारात गाडीची वाट पहात उभी होते
मग....
आणि तुझा गंध.... तू माझ्या अगदी जवळून अगदी जवळून गेल्याचा भास झाला. मी त्या क्षणभरात तुला अनुभवलं.... त्याक्षणी तू माझ्या जवळ होतास....!सुमेधाच्या आवाजात कंप होता. तिनं कसातरी आवंढा गिळला ,  तुला आठवतंय हा असाच अनुभव मी बारावर्षापुर्वी घेतला होता. आणि तुला मी सांगितले त्यावेळी तू माझी खुप तीव्रतेने आठवण काढत होतास असं मला सांगीतलं होतंस.....!
आणि कालही काही वेगळं नव्हतं गं.....!  सौमेशही भावनाविवश झाला होता.
मला  खात्री आहे...
कसली......
आपण नक्की एक दिवस भेटू.............खुप वर्षांच्या घड्या आता आपल्या भेटींवर पडल्या आहेत , भेटी तरी किती ? हसते, आता आठवावी तर सारी स्थळं, आणि रस्ते हुबेहुब नजरेसमोर आली तरी... त्या रस्त्यांची नावं बदललेली आणि स्थळाैंची कळाही गेलेली असेल..... तू पुन्हा भेटू नकोस असं मी कधीत म्हणणार नाही , पण भेटण्यापुर्वी त्या रस्त्यांची नावं आणि स्थळांची कळा बदलल्या तरी चालतील पण तुझ्या चेह-यावरच्या सुरकुत्यांच्या घड्या त्या वर्षांच्या घड्यांखाली लपवू नकोस .   राजा तुला सुर्यास्ताची शपथ एकमेकांना न भेटल्याशिवाय जायचं नाही सुरकूत्यांची कुंपणं ओलांडून ह्रद्याशी ह्रद्याची चाहूल घेऊन आपण नक्की भेटायचं.... आपण नक्की भेटायचं.....................!!


@ समिधा





कवडसे......

    " कवडसे..."

     दि. 13/5/2018 वेळ संध्याकाळी सहाची आणि आम्हा पाच नवोदीत कवी कवयित्रींच्या परिक्षेचीही.....! कल्याण काव्यमंच प्रस्तुत" कवडसे" या बहारदार काव्यवाचनाच्या कार्यक्रमाची घोषणा झाल्यापासून आम्हा सर्वच सहभागी कवी मडळींची तयारी सुरू झाली होती.  

     कल्याण काव्यमंच ची स्थापनाच नवोदीत कवी कवयित्रींना त्यांच्या काव्यलेखनाला रसिकश्रोत्यांसमोर आणून त्यांना प्रोत्साहन देणे आहे.  कल्याण काव्य मंच ही जशी एक साहित्य साधनेची कार्यशाळा आहेत तशीच ती एक साहित्य चळवळही आहे.

     13 मे ची संध्याकाळ कल्याण काव्य मंच प्रस्तुत कवडसे  च्या निमीत्ताने आम्हा सहभागी सर्व कवीमंडळींसाठी अतिशय महत्वाची होती.  यात सहभागी माझ्यासह सर्वच कवी कवयित्री नवोदीत होतो, त्यामुळे प्रथमच कवडसे या कार्यक्रमामुळे रसिकप्रेक्षकांसमोर जे खास आमच्यासाठी आमच्या कवितांना एेकायला येणार होते त्यांना कवितेतून आनंद देणे ही आमची फार मोठी जबाबदारी होती. आणि जबाबदारी पेलण्याची उर्जा आम्हाला कल्याण काव्य मंच च्या  प्रत्येक सदस्याकडून मिळत होती. सुधा पालवे, अपर्णा ताई, निचीता झुंझारराव  , चित्ते सर, प्रशांत वैद्य सर यांच्या उपस्थितीने ती कार्यक्रमाच्या दिवशीही आमच्या सोबत होती. 

     कार्यक्रमाची सुरूवात श्री. सुधीर चित्ते सरांनी सुत्रसंचालन करून नेहमीच्याच उत्साही आणि आंतरीक आत्मविश्वास वाढवणा-या शब्दांनी केली..... आणि सुरूवातीलाच....
"शब्दानी प्रसन् व्हावं 
मनाचा कोपरा चिंब भिजावा
सुख आणि शांती नांदावी 
शब्दांनी शब्दांशी गोड
होऊन एकजुटीनं नांदावं....!"

असा शब्दांचा गोडवा रसिकांपर्यंत पोहचवणा-या सीमा झुंझारराव यांनी प्रथम काव्यवाचन करून रसिकांना आपल्या शब्दकाव्यातून आनंद दिला...! सुरूवातीला केवळ वाचक असणा-या पण वाचनातूनच फुललेले त्यांचे हे काव्य कौतुकास्पद आहे.

     व्यवसायाने डेन्टीस्ट अगदी तरूण ताज्या दमाचा कल्याण काव्य मंचचा तरूण चेहरा......
"प्रेमाचा अनेक व्याख्यांवरूनही प्रेमाचा 
अर्थ सांगणं भल्याभल्यांना नाही जमलं
प्रेम म्हणजे काय असतं हे मलाही 
ख-या अर्थाने प्रेम झाल्यावरच समजलं.....!"

सहज सोप्या सोज्वळ शब्दांतून क्ती मोठा अर्थ सांगणारा हा युवा कवी म्हणजे शुभम नाईक याने अतिशय सुंदर तरल ह्रद्यस्पर्शी कविता सादर करून उपस्थित सर्व कव्यरसिकांची दाद मिळवली.....!

     "अंकिता डोंगरे"  हा कल्याण काव्यमंचचा आणखी एक तरूण सुंदर चेहरा आणि तिच्या काव्यातील भावही तसाच सुंदर तरूण आणि परिपक्वतेकडे प्रवास करणारा , आशावादी आणि कणखर वाटला. तीची स्वप्न ही कविता अशीच कणखर वाटली.

"त्यांनी समजावून पाहिले मला
मी नाही एेकले.....
त्यांनी आवाज चढवला 
मी नाही एेकले......
त्यांनी थोडा घातला धाक
मी नाही घाबरले 
मग त्यांनी अश्रूंचा घेतला आधार 
मी नाही विरघळले.....
त्यांच्या कोणत्याही कृतीचा
मला फरक पडला नाही
हे पाहून शेवटी
त्यांनी माझ्या स्वप्नांना स्वीकारले!

अशा प्रगल्भतेकडे जाणा-या युवा कवयित्रीला रसिकांकडून भरभरून दाद मिळाली.

     नवकविंचे नवखेपण असूनही काव्यरसिकांनी दिलेली दाद म्हणजे कवी- कवितेला नवा उत्साह देणारी असते याची प्रचिती वेळोवेळी येत होती...!  आणि त्यामुळेच कल्याण काव्यमंचने नवोदितासाठी उपलब्ध करून दिलेले हे व्यासपीठ म्हणजे " काव्यपंढरीच" आहे.  आणि या काव्यपंढरीचे आम्ही सर्व सदस्य "वारकरी" आहोत तर "कविता"  आमची "विठूमाऊली"  कार्यक्रम दरम्यान हेच भक्ती कृतज्ञतेचे भाव मनात येत होते.  

     सीमा झुंझारराव, शुभम नाईक, अंकिता डोंगरे यांच्या काव्यवाचनानंतर  सुधाकर वसईकर यांनी त्यांच्या कविता अतिशय उत्कटतेने सादर केल्या.

     "केसात माळलेल्या 
      गज-याचा सुगंध मी 
     धुंदणारा भुंगा मीच तो 
    झिंगणारा भुंगा मीच तो "

या प्रेमकाव्यापासून ते "रंगभुमी" सारखी गंभीर अंतर्मुख करणारी कविता सादर करून उपस्थित सर्वच काव्यरसिकांची मने जिंकली.

     या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य असे की  पार्कातल्या कविता ही काव्यवाचनातील अतिशय सुंदर संकल्पना  यशस्वीपणे सादर करणारे , सुरेश पवार  हे राज्यस्तरीय नाट्यकर्मी  ,  अरूण गवळी  सारखे प्रगल्भ कवी  "कवडसे" या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते.  तसेच आयोजकांनी प्रत्येक काव्यरसिक श्रोत्यांची दखल घेत प्रत्येकाचे प्रेमाने स्वागत केले जात होते.    त्यामुळे कवडसे हा कल्याण काव्यमंचच्या अंगणातून ते उपस्थित प्रत्यक रसिकांच्या मनात जाणारी प्रकाशाचा स्रोत होता.

     कवडसे मध्ये माझेही काव्यवाचन होते !  एवढ्या सा-या श्रोत्यांसमोर एक दोन नव्हे तर वीस मिनीटे काव्यवाचन करणे हे इतरांसारखे मलाही दडपण आणणारे होते, कारण माझाही हा पहिलाच होता.  पण सर्वच सन्मानीय सदस्यांनी आम्हाला आत्मिविश्वास दिला म्हणूनच काव्यवाचन, सादरीकरणाचा आनंद घेऊ शकलो.

     "तुझ्या श्वासांची ऊब 
       मला इथे जगवते
       अनं
      माझ्या आसवांची गाज
     तुला तिथे कळते

    काय फरक पडतो 
    तू तिथे 
    अनं 
    मी ईथे   

या कवितेने काव्यवाचनाला सुरूवात केली........ माझ्यासाठी हा एक प्रयोग होता आणि त्याचे माझ्यासाछी खुप होते.  या काव्यवाचनातून मला माझ्या कवितांची रसिक श्रोत्यांच्या मनाच्या ठायी किती झेप घेऊ शकते याची थोडी का होईना कल्पना येणार होती.... !  आणि "कवडसे" कार्यक्रमाने  काव्यरसिकांपर्यंत कवितेने पोहचणे म्हणजे काय याची खरी जाणीव करून दिली.    माझ्या आवडीच्या मिश्र भावनांच्या कविता सादर करतांना मला स्वत:ला सुद्धा खुप आनंद मिळाला.  

उगावावं म्हणते तुझ्यातून
म्हणजे तुझ्या वेदनेला
माझा सहनशीलतेचा देठ भिडेल
आणि तू मग सावलीतून फक्त शीतल
माया देशील ज्याची मला आता गरज आहे!
तुझ्या आतल्या पुरूषाला सांग ना
माझ्यातल्या अगणीत कवितांना तुझा
कोमल स्वर हवाय...!
देशील तू तुझ्यातल्या थोड्या अश्रुंना
माझ्या डोळ्यातल्या आसवांची साथ...!
फार नाही पण हसतांना तूला पहायचंय
तुडूंब भरलेल्या हंड्यातून उचंबळणा-या पाण्यासारखे
तुझ्या सुखाच्या कल्पना एकदा कैनव्हासवर उतरवून
त्यात रंग तूच भर
पण त्यामध्ये एखाददुसरी सुखाची नक्षी माझीही
सामील कर...!
तुझ्या जुन्या फोटोफ्रेममध्ये
अजुनही मला ब्लैकअँड व्हाईट
संदर्भ दिसतात....
काढू नकोस ते बाहेर ...
पण
तिथेच मलाही थोडे आत घे....
माझे सारे तूझ्यात सामावून जावे
असेच प्रयत्न करत आले
तरी मी अजुनही बाहेर आहे...
व्यवहार आणि विश्वास यात
तोलत ठेवून मला अजुनही तू
हिशोबात मांडतोस
पण ...
हिशोबात धरत नाहीस.....!!!!

 ही कविता सादर करतांना मला विशेष आनंद झाला. रसिकांनाही तो मिळाला असेल अशी अाशा करते.  कवडसे हा माझ्यासाठी सर्वच अर्थाने एक अविस्मरणीय अनुभव होता.   काव्यरसिकांपर्यंत आपली कविता पोहचवताना काय  व कसे  भान ठेवावे, काय टाळणे आवश्यक आहे  असे अनेक नवीन धडे मिळाले   कल्याण काव्य मंच ची यासाठी मी कायम ऋणी  असेन . 

     या निमीत्ताने   आमच्या मनातले काव्य'कवडसे' काव्यरसिकांच्या मनामनात प्रकाशाची एक तिरीप जरी सोडून गेले असतील  तरी आम्हाला खुप समाधान मिळेल....! पण ही तर आमची सुरूवात आहे.  अजून खुप अनुभव येणार आहेत.... आणि मला खात्री आहे " कल्याण काव्य मंचच्या" अभिमानास्पद विस्तारासोबत आम्हा सर्व काव्यवारक-यांचा प्रवासही दिमाखदार होणार आहे........!
शुभंम भवतू......!!



  




तुला कळतंय ना .......!!







प्रिय............
     तुझ्याशी खुप खुप बोलायचे असते म्हणून मोबाईल आॅन करते.  व्हैट्सएपवर येऊन उगीच स्क्रिन स्क्रोल करीत असतांना तुझ्या नावासमोर येऊन क्षणभर थबकते .... तुझ्या नावाला हलकेच स्पर्श करून अंतरंगात डोकावते आणि नेमका तेव्हा तुही तिथे थांबलेला दिसतोस........

     ह्रदयात धडधड होऊन तुला पहात रहाते ... तुझ्या आॅनलाईन सिग्नलला न्याहाळत ..... तुला हेलो .... करून बोलवावं का असा मनात विचार करत असतानाच तू क्षणात आॅफलाईन नजरेआड होतोस ........!  आॅफलाईनची ती रिकामी पोकळी पाहून हिरमुसली होऊन स्वत:ला निमुटपणे आत ओढून घेते.....!  तरारून फुलायला आलेले शब्द न शब्द फुरगंटून स्वत:ला मिटून घेतात,  डोळ्यांच्या काठावर आलेलं पाणी ..... तसंच तरळत रहातं..... आधाराशिवाय...! 

     असा कसा तू ....?  मला न पहाताच न भेटताच ..... न बोलताच कसा  निघून गेलास.....?   किती नाही म्हटलं तरी थोडासा राग..... थोडासा रूसवा..... थोडीशी बेफीकीरी मनात उमटतेच....!  एकमेकांविषयी अजिबात गैरसमज करून घ्यायचे नाहीत असं ठरवलेलं असतेच आपण .... आणि आतापर्यंत ते कटाक्षाने पाळतोही आपण ... तू नेहमीच ठाम ... निश्चिंत.....!  पण कधी  हे असं होतंच माझं.....!  ज्याची त्याची स्पेस, ज्याचं त्याचं आयुष्य आहे हा डंका कितीही  पिटला तरी मनात थोडीशी बैचनी येतेच ! आणि तुझ्या माझ्या प्रेमातला थोडासा रस उणावतो, उत्कटून, समरसून तुला भेटण्याची आस सपाट पातळीवर येते...!

     आपलं नक्की नातं तरी काय?  या भाबड्या आणि भावूक प्रश्नांपलिकडलं आपलं प्रेम आहे हे ठाऊक असूनही मनात एक छोटसं वादळ घोंगावून जातेच......!( यावर तू आता मिश्कील हसला असशील..)  तेच हसू काहीवेळानं माझ्या ओठांवरही येतं ... जेव्हा तुझे  ते आश्वासक.... निर्मळ..... शांत ..... समजुतदार डोळे आठवतात,  आठवतो  जवळ नसतानाचा तुझा-माझा  नि:शब्दात जपलेला विरह....!   आणि त्या विरहात आपण दोघांनी श्वास-नि:श्वासात गुंफलेले अतूट ऋनानुबंध दिसतात.....अनं तिथेच शांतपणे विरून जाते मनातले क्षणभरचे हे वादळ.... !

      आणि मी आश्वस्थ होते ...... पुन्हा नव्याने अधिकच तुझ्या प्रेमात पडते .....!!
तुला कळतंय ना .......!!


@ समिधा

    

लोकप्रिय ..........

एखाद्याचं आपल्यातून अवेळी जाणं ……!

       किती किती अवघड असते समजून घेणे  एखाद्याचे आपल्यातून अवेळी जाणं    ....!!  अगदी अनपेक्षित असते  आपल्या साठी   …!  काळाने गनिमिका...

हे तुम्हाला नक्की आवडेल......