"मंगळसूत्र "

 "केव्हातरी या स्वप्नातुनी
पड़ेन  का मी बाहेरी
एकदाच , जाईन जेंव्हा मी
अखेरच्या त्या माहेरी
तेंव्हा ही पण असेल माझ्या
सूत्र प्रीतीचे हेच गळां ,
भाळावरती असेल तेंव्हा
अहवतेचा हाच टीळा| "

     कवितेच्या या ओळींमध्ये एका विवाहित स्त्रीची कपाळावरचं कुंकु आणि गळ्यातलं "मंगळसूत्र " या  अहवतेच्या या लेण्यांसह अंतीमच्या माहेरी जाण्याची इच्छा दिसते  ....!! आपल्या भारतीय संस्कृतीत   "कुंकु" आणि  " मंगळसूत्राला " एखाद्या स्त्रीच्या ठायी हे एवढे  महत्व आहे !

      स्त्रीच्या लग्नानंतरच्या तिच्या आभूषणांत "मंगळसूत्र " हे एक आभूषण वाढलेले असते  …एक "दागिना" एवढीच किंमत असते का "त्याला " त्या दागिन्यात कुणाच्यातरी हक्काची बायको हेच  फक्त अधोरेखित होते का  ....? खरच  गळ्यातील हे  काळे मणी  स्त्रीच्या अस्तिवाला संरक्षण देतात का असा विचार केला तर   हल्लीच्या समाजात वावरताना मला आज अश्या अनेक स्त्रीया दिसतात ज्या विवाहीत सधवा असूनही मंगळसूत्र घालीत नाहीत  …! का  …?  कदाचित ते त्यांच्या स्वतंत्र व्यक्तिमत्वाच्या आड़ येत असावे   .... किंवा "मुक्त स्त्रीमुक्तीच्या भूमिकेतून "मंगळसूत्राला " एक "दागिना "  या पलीकडे महत्व त्यांना द्यावेसे वाटत नसावे  .... !  किंवा अगदी  साधेसे  कारण मॉडर्न आउटफीट वर ते आउटडेटेड फॅशन केल्या सारखे वाटत असावे  ....! 

     आता एवढे विवेचन केल्यावर वाचणा-यांच्या भुवया कदाचित उंचावल्या जातील  म्हणजे मी "मंगळसूत्र " न घालना-या स्त्रियांना हिंदू संस्कृतिच्या मारक तर ठरवित नाही   …?

    पण खरं तर मला वेगळाच प्रश्न पडला आहे   …!  कारण मी आज अश्याही स्त्रीया पहाते आहे ज्या विधवा आहेत  …अगदी प्रौढ़ कुमारीका आहेत पण त्याही गळ्यात मंगळसूत्र  घालताना दिसतात .... !   का  …?  नव-या शिवाय , एका पुरुषा शिवाय परंपरावादी पुरुषी समाजात वावरताना  स्वरक्षण व्हावे या साठी   …? बरे  हे स्वरक्षण कुणापासून  आणि कसे  हा मोठा प्रश्नच आहे ! कारण हल्लीच्या काळात  मुक्तस्वातंत्र्याचे स्वैर वारे संपूर्ण समाजातच वाहत आहेत  ..... त्यामुळे हे "मंगळसूत्र " पुरुष काय आणि स्त्री काय दोघांचेही नित्तिमता आणि नैतिकता टिकवण्या साठी किती उपयोगी आहे हा अभ्यासाचा विषय व्हावा !
      खरे तर नवरा नसला म्हणून काय झाले   … त्याच्या मागे मी माझे सौभाग्यलेणे का त्यागुं  …? या भूमिकेतून   ज्या स्त्रीया मंगळसूत्र घालतात त्यांचे कौतुक करावे की "मुक्त स्त्रीमुक्तीच्या आणि पुरुषप्रधान संस्कृतीला छेद म्हणून  "मंगळसूत्राला " एक "दागिना "  या पलीकडे महत्व नाही या भूमिकेतून मंगळसूत्र घालणे नाकारतात त्यांचे कौतुक करावे? 
                                     

       थोडक्यात आजच्या  आधुनिक स्त्रीचे विचार आणि कृती  दोन्हींचा गोंधळ उडालेला दिसतोय ..! म्हणजे  " मंगळसूत्र" हे स्वरक्षण आहे , परंपरा संस्कृती  आहे , की  केवळ एक आभूषण आहे...? आजच्या समाजातील स्त्री पुरुष  विशेषतः स्त्रीया या "मंगळसूत्राला" नेमक्या कोणत्या भूमिकेतून पाहतात हे समजून घ्यायला आवडेल  ...!
 

                                                                                                     "समिधा" 
              

 


              

"संकलन " हे श्री . बा . जोशींचे पुस्तक

     "संकलन " हे श्री  . बा   . जोशींचे  पुस्तक वाचले   …!  यातील प्रत्येक निबंध वाचताना हे पुस्तकच आपल्या संग्रही असावे असे वाटले  . लेखक कलकत्त्यातील  राष्ट्रीय ग्रंथ संग्रहालयात ग्रंथपाल असल्यामुळे त्यांचे  अफाट वाचनाची कल्पना येते  …! या "संकलनात "  एकूण सतरा निबंध आहेत  . 

     "लिहून छापून नामानीराळे" या लेखाने  मी थक्कच झाले   .  नामांतर वाद आपल्याला नवा नाही  पण  तो किती  जूना आहे हे वाचून गंमतच वाटली   .! नाव बदलने हा प्रकार किती  रोचक आणि मनोरंजक असू शकतो याची प्रचिती हा  लेख वाचून आला   .  नाव बदलूं लिहिणारे देशी परदेशी लेखक त्यामुळे उडणारे गोंधळ सारे वाचताना मजा येते  .  

     "खोदावया हवे खोल" हा लेख म्हणजे माहितीचा खजिना  !  यात पुराविद्येचा परिचय मिळाला  .! या पुराविद्येतही  प्रागौतिहासिक  आणि साधारण पराविद्या असा स्थूल भेद करण्यात येतो   . तसेच संग्राहक आणि संशिधक यातही फरक  आहे  .  संशोधनाच्या चार पातळया -
१. भूपृष्ठ संशोधन  २. भूमिगत संशोधन  ३. जलगत संशोधन  आणि ४. आकाशगामी संशोधन  या सर्वाँबद्दल वाचने म्हणजे नव्या अद्भुत गोष्टीचा अनुभव घेणे  ! 

     "माणुस  रविंद्रनाथ "  या लेखात रवीन्द्रनाथ टागोरांचा संपूर्ण परिचय घडतो  .   त्यांच्या स्वभाव वैशिष्टयांपासून ते त्यांच्या आहार शास्त्रापर्यंत , त्यांच्या दैनंदिन व्यवहारापासून ते त्यांच्या लेखनापर्यंत     सा-याचा अत्यंत रोचक भाषेत वेध घेतला आहे  .! रवीन्द्रनाथ टागोरांना नविन नविन पदार्थ खाण्याची  आणि करण्याचीही आवड होती   .!  आणि त्यांचा पेहराव निसर्गातील प्रत्येक मोसमाचे स्वागत करणारे असे  । या लेखातुन  त्यांचे  आलौकिकत्व पटते  .  

     यातील "अहिल्या कर्मयोगी " हा लेखहीं असाच सुन्दर आणि रोचक आहे   !  पेशवकालिन एक स्त्री  .  ज्या स्त्रीला दैवाने अनेक समरप्रसंगातून जाण्याचे भाग्य् दिले   … त्या दैवालाच तिने जीवनांता पर्यन्त पुजले  !
राज्यकरभाराचा भार एखाद्या श्रेष्ठ , धुरंधर राजकारण्या सारखा पेलला  …! सासु गोपिकाबाइंच्या मार्गदर्शनाखाली त्यानी प्रजेची सेवा केली  ....!  त्यांची  अहिल्या कर्मयोगिनी ही ओळख मनोमन पटते  …! 

     थोडक्यात "संकलन " हे पुस्तक म्हणजे माहितीचा खजिना आहे  .!  अनेक अश्या माहिती आपल्याला नव्याने कळतात  !  अतिशय रंजक आणि तरीही उद्बोधक आणि संग्रहणीय माहिती या पुस्तकातून मिळते  !

 पुस्तकाचे  नांव :- "संकलन"
 लेखक  :- श्री  .  बा।  जोशी (लेखक कलकत्ता राष्ट्रिय ग्रंथालयाचे ग्रंथपाल होते  .  )


                                                                                                          समिधा 

वृत्तपत्रीय भविष्याकडे

     
             सकाळी वृत्तपत्र हातात पडल्यावर हेडिंग नंतर भविष्याकडेच मोर्चा वळतो  …!

     वृत्तपत्रीय भविष्य कथनातही बरी हुशारी बरतलेली असते  ....! म्हणजे भविष्य सांगताना अगदी ठामपणे काहीच दर्शविलेले नसते … ! उदा  . मौन पाळावे ,  समयोचित वागा  , वाद टाळा   … इ  . मग अश्या वेळी खरच भविष्य वाचना-यांची पंचाईतच होते  …!

      समयोजित वागा ,  वाद टाळा यामधून नेमके कधी , कसे , कोठे आणि कशा त-हेने वागावे , बोलावे कसे कळणार  …?? 

          स्व:तावरील विश्वास डळमळीत झाला की  माणूस "सुपरस्टीशियस " होऊ  लागतो  …! आणि मग तो या लाचारीमुळे एकतर कमालीचा धार्मिक बनतो किंवा रोजच्या वृत्तपत्रीय भविष्याकडे वळतो  …! 

                                                                                                  समिधा 

स्त्रियांना त्यांच्या आयुष्यातला पुरुष इतका महत्वाचा का वाटतो …?

     

                                                


       सुनंदा  पुष्कर यांच्या सारख्या शिकल्या सवरलेल्या , स्वावलंबी , शिक्षण , आर्थिक स्वावलंबन लाभलेल्या स्त्रीने जीने इथपर्यंतचा प्रवास अतिशय कनखरपणे केला   .... ती  स्त्री केवळ एका पुरुषासाठी आपले जीवन संपवू शकते  …?

         एकटे असून एकटे जगणे  शक्य होते  .... मात्र दुकटे असून एकटे जगणे खुपच कठीण  …! असा माणुस खचत जातो  ....! मग ही  शारारिक  बाब रहात नाही  …! ती मानसीक होते  … माणूस नैराश्याने वेढतो  आणि मग मनाने खचतो  तिथे मग स्त्री असो   वा पुरुष असो तो मग अश्या स्वत:ला  सपंविण्याच्या निर्णयाप्रत पोहचतो  …!!

          तरीही सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूच्या अनुषंगाने एक प्रश्न उपस्थित होतो की   शिकल्या सवरलेल्या , स्वावलंबी , शिक्षण , आर्थिक स्वावलंबन लाभलेल्या स्त्रियांना त्यांच्या आयुष्यातला पुरुष इतका  महत्वाचा  का  वाटतो  …?
         जेंव्हा याचा शोध घेते तेंव्हा मला समजलेली … उमजलेली काही कारणे आपली भारतीय समाज व्यवस्था याला जबाबदार आहे  ! कारण उच्च विद्या विभूषित  … स्वत:चे  एक विशिष्ट  स्थान प्राप्त केलेल्या स्त्रियांना कदाचित पुरुषी स्थैर्याची  गरज नसेल पण ज्या स्त्रियांचे विश्वच त्यांच्या पुरुषाच्या प्रेम, विश्वास  या भोवती वेढलेले आहे त्यांचे काय  …! ज्यांच्या जवळ शिक्षण, आर्थिक स्वावलंबन  सारे आहे  …! पण स्वत:च्या स्वतंत्र अस्तित्वाची जाणीव नाही  … आणि कधी  असली तरी अश्या पुरुषी समाजात एकटे राहण्याचा आत्मविश्वास नसतो  …अश्या स्त्रीया  घरगुती हिंसाचाराच्या शिकार होऊनही कधी सामाजाच्या भीतीने त्याच्या बरोबर रहात असतात   …!  पण  तरीही काही स्त्रीया अगदी सामान्य स्त्रीयाही नवरा गेल्या  नंतर केवढ्या हिमतीने मुलांना वाढवतात  …आणि स्वत:ही जगतात   !   म्हणजे नवरा जिवंत असताना त्याच्या अस्तित्वाला डावलून जगण्याचा  संस्कार म्हणा , भीति म्हणा , या मुळे त्यांची तयारी   नसते  ! आणि म्हणूनच ज्याच्यावर त्या खरे प्रेम करतात म्हणून  … किंवा स्वत:चा स्वार्थ म्हणुनही   (  कोणताही स्वार्थ …) स्त्रियांना त्यांच्या आयुष्यातला पुरुष  महत्वाचा  वाटतो  अगदी कुणाच्याही जीवापेक्षा   ....! 

   पण आजकाल ही परिस्थिति बदलत आहे   …! म्हणूनच कदाचित (मुलींकडूनही ) घटस्पोटांचे प्रमाण वाढत आहे  …!

                                                                                                          " समिधा "

माझ्या दैनंदिनीतील एक पान ....… एक विचार .... !!!

                                                                  


प्रत्येक दिवस सारखा नसतो   ....!! गेलेले दिवस, आजचे दिवस आणि येणारे दिवस असे साधे  विभाजन शक्यच नाही   ....! 

आतापर्यंत माझ्या गेलेल्या दिवसांत बरेच दिवसांना सोनेरी झळाळी आहे   .! काहींना दू:खाची किनार , तर काही मनस्ताप पश्चातापाच्या वर्खाने झाकोळलेले आहेत   ! प्रत्येक दिवसाचा स्व:ताचा एक रंग आहे  …!  भाव आहे  …! 

येणारा पत्येक दिवस असेच विविधरंगी असतीलच  … पण एखाद्या दिवसामध्ये एक विशिष्ट गती-चैतन्य  आणि विशिष्ट जीवंतपणा असतो तो प्रत्येक दिवसात नसतो  …!

माझ्या वाट्याला असे चैतन्यमय - गतिशील "दिवस" बरेच आलेत आणि "जो दिवस " असा असतो तो दिवस माझ्या प्रत्येक दिवसाला  ह्याच दिवसाचा जीवंतपणा लाभावा असे वाटल्यावाचून  रहात नाही  …!   

मला माझे जीवन - जीवनातील प्रत्येक दिवस कसा भरजरी पाहिजे,  पण माझी ही इच्छा    अतिशयोक्तीपूर्ण आहे   … पण तो इतका सामान्यही नसावा की ज्यामुळे येणा-या प्रत्येक दिवसातील चैतन्य नष्ट करेल  की काय अशी भीति निर्माण करेल   …  तर  येणा-या प्रत्येक दिवसाला आणि येणा-या प्रत्येक दिवसाने आपल्याला काही ना काही नवसृजनतेच्या रुपात द्यावे जेणेकरून आपली जगण्याची उमेद वाढेल  …! 

मुळातच मला केवळ सामान्य म्हणून जगायचेच  नाही  …  अर्थात असामान्य होण्याइतकी आपली कूवत आहे  की नाही हे समजण्या इतकी मी समंजस नक्कीच आहे   ....!  पण मी माझ्या पुरती एक स्वतंत्र अवकाश नक्कीच निर्माण करू शकेन असा मला  विश्वास आहे  … !!  मनातील प्रत्येक नवसृजनेतेची उर्मी मी दाबणार  नाही  … कारण तीच उर्मी माझ्या  जगण्याचा   … येणा-या प्रत्येक नव्या दिवसाचा एक नवा रंग आणि एक नवा भावनानुभव असणार आहे   .... जगण्याची नवी उमेद असणार आहे  …!  त्या माझ्या प्रकाशतल्या वाटा आहेत  !!

                                                                                           "   समिधा "


२६ जानेवारी … प्रजासत्ताक दिनाची एक सदिच्छा ... खरे अभिवादन......!

                                     

         २६ जानेवारी  … प्रजासत्ताक दिन जवळ येत आहे  …! शाळेत असतांना ह्या दिवसांचे मला कोण अभिमान आणि ओढ़ असायची   … कड़क इस्त्रीचे कपडे घालून ताठ मानेने झेंडा वंदन करण्यातील आनंद घेणे मला खुपच आवडायचे   ....  तो दिवस मी स्वातंत्र्य लढ्यातील सर्व हुतात्म्यांना अभिवादन करुन साजरा करीत असे  …!  आणि संध्याकाळी  मुस्लिम वस्तीत तिथल्या शाळांमध्येही  ध्वजारोहण केले आहे की नाही हे पाहण्यासाठी जात असे  … (बालबुद्धि  …… देशप्रेम,   देशाभिमान व्यक्त करणे  … इतरांचे पारखने  सारेच गमतीशीर होते  …! ) 

   पण पुढे कॉलेज मध्ये गेल्यावर २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन  , १५ ऑगस्ट  स्वातंत्र्य दिन हे  सुट्टीचे दिवस म्हणूनच अधिक साजरे होउ लागले  …! कॉलजे मध्ये हे दिवस फक्त N. C. C. कैम्प मध्ये साजरे करतात  … !याच दिवसात कुठल्यातरी राजकीय युवा सेनेचे हौशी कार्यकर्ते असतांना शाळांमध्ये जाऊन झेंडा वंदन करीत असे  …! पण पुढे ती संघटना बंद पडली आणि आमचे झेंडा वंदनही  !पण मी सुद्धा ह्या दिवसांचे महत्व कमी केले  होते हे मात्र माझ्यासाठी अक्षम्य आहे   ! 

        आजही भारतीय ह्या दिवशी पिकनिक अरेंज करतात  .... ! आजची सारी धर्मं आधारीत अघोरी प्रेमाची अतिश्योक्ति पाहिल्यावर  … त्याचे राष्ट्र उभारणीवरील , प्रगतिवरील परिणाम पाहता प्रत्येक भारतीयामध्ये अन्य कोणत्याही प्रेमापेक्षा राष्ट्रप्रेम अधिक प्रखर असणे गरजेचे आहे  असे वाटते   !  

       शाळांमध्ये जसे विद्यार्थी  प्राथर्ना  ,  राष्ट्रगीत  गातात   .... तसेच ते महाविद्यालयातही  आपल्या देशाचे राष्ट्रगीत गायलाच पाहिजे   .... ! पण  तसे ते राष्ट्रगीत गान सक्तीचे केले नसल्याने  शाळेतून महाविद्यालयात आल्यावर मात्र हे राष्टप्रेम कमी होत नसले तरी त्याची तीव्रता नक्कीच कमी होते  … ! भारताच्या  प्रत्येक भावी पिढीतील   राष्ट्रप्रेम  हे इतर कोणत्याही प्रेमा पेक्षा अधिक  प्रखर व्हायला पाहिजे   …!!! तरच २६ जानेवारी  .... १५ ऑगस्ट हे दिवस फक्त राष्ट्रप्रेम व्यक्त करण्याचे दिवस रहाणार नाहीत  …!तर सीमेवर लढणा-या सैनिकाप्रमाणे सतत हे राष्ट्रप्रेम  जागृत असावे  … सतर्क असावे  …! राष्ट्रपेक्षा काहीच महत्वाचे नाही  …!  प्रत्येकाचे  आपले धर्मं आचरण केवळ आणि केवळ राष्ट्रहीतासाठीच असावे  …! राष्ट्रपेक्षा कुणीही मोठा नसावा   ....!  राष्ट्र   ....  देश   … आहे  म्हणून आपण आहोत  ....!!! 

         आज भ्रष्टाचार मोठा झाला आहे   !  आज कटटर धर्मांधता  मोठी झाली आहे  …! दहशतवाद मोठा झाला आहे  .... आज पैसा मोठा झाला आहे  ....!! आणि आज माणुस , माणुसकी , पर्यावरण , सा-या सा-याचा हळुहळु -हास होत आहे  …!!!  राष्ट्रप्रेम प्रखर करा   … राष्ट्र वाचवा   आणि  हेच यावर उत्तर आहे  सीर सलामत तो पगड़ी पचास  राष्ट्र वाचला तर आपण वाचू  ....! आपले अस्तित्व राष्ट्रामुळे आहे  …! धर्म , संस्कार ,संस्कृति , परंपरा  ह्या राष्ट्रिय स्तभांचे स्तोम माजविण्या पेक्षा पर्यावरण-हास , भ्रष्टाचार,अत्याचार, दहशतवाद, बेकारी,गरीबी ,  परकियांची  घूसखोरी  या संघर्षासाठी साठी  मैदानात येण्याची गरज आहे  …! प्रत्येक राष्ट्रभक्ताने  आपापल्या परीने थोडासा खारीचा वाटा उचलावा  ....!!! हीच  सदिच्छा  ....! आणि हीच आपल्या  स्वातंत्र्य लढ्यातील सर्व हुतात्म्यांना खरे अभिवादन ठरेल  ....!!! 

                                                                   
                                                                                                                 
                                                                                                            समिधा 







आशेला नवे पंख फुटु दया ........!

     मनाला नवे पंख फुटले की माणूस स्वप्नांच्या अवकाशात स्वत:ला झोकून देतो आणि कल्पनातरंगाची अनेक वलये तो आपल्या भोवती वेढून घ्यायला लागला कि नकळत तो स्वत:पेक्षा या दिवास्वप्नामध्येच अधिक गुंतायला लागतो   .... !!स्वप्नं भंगली की  मन निराश होते   …। आणि ते मग सर्वांमध्ये असूनही अलिप्त राहायला लागते   … शरीर बोलत असते पण मन   .... मात्र कुठल्यातरी नकळत्या कोप-यात एकटेच विचार तंद्रित भरकटत दूर   .... जात असते   …! पुन्हा पुन्हा ते समोरच्या वास्तवात येण्याचा प्रयत्न करीत असला तरी निराशा तसे करू देत  नाही  .... !  अश्या निराश मनाला स्वत:भोवती गोळा  करण्यास  बरेच प्रयास पडतात  .... आणि असे मन थकून भागुन  परतले कि , समोरच्या वास्तवाशी त्याचे नाते तुटलेले असते वास्तवाचे मन तो पर्यन्त दूर गेलेले असते  …!

     कधी कधी  हे निराश मन  … दुस-या मनाचा आधार घेते  … त्यावेळी दुस-या मनाने  सांत्वन करणे  त्याला त्यावेळी हवेहवेसे वाटत असेल तरी सुद्धा त्याला ते मन  कितपत समाधान देईल हे परिस्थिति प्रकृतिवर अवलंबून असते   …। कदाचित हे दूसरे मनही  निराश मनासारखे समदुःखी असेल तर साथ सोबतीने  वाटचाल करण्यास त्याना आनंदच होत  असतो  … ! पण दोघांचा प्रवास नव्या आशावादाकडे होत नसतो  …!!

                                 


    म्हणूनच  मनासारखे आशेलाही नवे  पंख फुटू शकतात  ....! एकीकडून निराशा झाली पण दुसरा मार्ग खचितच मोकळा असतो  …!  फक्त तो आपण सतर्क व्यापक दृष्टीने शोधायचा असतो  …! कारण अनेक मार्ग आपल्या समोर असतात हे काहीअंशी  खरे असेल तरी आशेला नवे  पंख फुटल्यावर सर्वच मार्ग सुकर वाटतात   … आपलेच वाटतात   …! म्हणूनच आशेला नवे   पंख फुटु दया  .... ! त्या पंखानी आपण आकाशावरच स्वार  होण्यास सज्ज होणे  म्हणजे खरा आशावाद आहे  ....!

                                                                                               "समिधा "





धर्मांतर …!!!!!

    मला अतिशय आनंद होत आहे की , … "हिंदू धर्मा " विषयी आजच्या हिंदुस्थानी तरुण  पिढीचे विचार किती  प्रखर आहेत  …! तरुण पीढ़ी आपला  "हिन्दू धर्म म्हणजे नेमके काय ? याचा अतिशय अभ्यासपूर्ण आकलन करुन… आज आपला धर्म -ह्रास पावत आहे , हिंदूंचे धर्मांतर होत  आहे    … हे पाहून   … नुसती पेटून उठली  आहेत  ……! 

        मला माझ्या हिंदू  असण्याचा प्रचंड अभिमान आहे  ....! कारण  हिन्दू धर्म  हा याच्या त्याच्या विचारांची आदान प्रदान करून  निर्माण झालेला नाही  " हिंदू धर्म  ' स्वयंसिद्ध" , "स्वयंभू" आहे  . ! "हिन्दू धर्माचे प्राचीन नाव "वैदिक धर्म " आहे  . म्हणजेच वेदांवर आधारलेला धर्म ! वेद  हे सम्पूर्ण जगातील प्राचीनतम ग्रंथ  आहेत   ! वेद  म्हणजे हजारो मंत्रांचा संग्रह ! आणि ज्यांना  ते उत्स्फूर्तपणे स्फुरले,दिसले, शोध लावला  … त्यांचा साक्षात्कार करुन  घेतला आणि  ज्यांच्या मुखातून प्रकट झाले,त्यांना आपण  "ऋषी"  म्हणतो   !   

   मुळात "धर्म " म्हणजे जगण्याची , जगवण्याची एक निति, आचरण  …!  "हिन्दू धर्मात अध्यात्माला-धार्मिकतेला  ( कर्म कांड  नव्हे ) अनन्य साधारण महत्व आहे  …! आणि जिथे धार्मिकता येते , अध्यात्म येते तिथे सहिष्णुता , बंधुता , प्रेम, मानवता येते   …! आणि तोच खरा हिन्दू धर्म  आहे  .!  ज्याच्या ठायी  हे सारे आहे तोच खरा "हिंदू "    !  स्वामी विवेकानंद  यांनीही "राष्ट्रीय एकात्मता " साधायची असेल तर विखुरलेल्या अध्यात्मिक शक्तींचे एकीकरण करावे लागेल    … ! आपण सारे अध्यात्मिक वृत्तीचे झाल्याशिवाय भारताचे पुरुजजीवन होणार नाही  .!  एवढेच नव्हे तर  यावर सर्व जगाचे हित आहे  .!  असे सांगितले आहे   !

     आपल्या हिन्दुस्थान वर अनेक परकियांची आक्रमणे झाली  …! त्यामुळे अनेक संक्रमणे झाली   … आणि तरीही आपला हिन्दू धर्म अजूनही अभेद्य आहे  …! त्याने अनेक नव्या धर्माना   एक विचार दिला  .! जगातील सर्व धर्मांचा "पाया" हिन्दू धर्म आहे   …!  आणि म्हणूनच प्रत्येक धर्मात "ईश्वराची" व्याख्या , त्याच्या पर्यंत  पोहचन्याचा मार्ग एकच सांगितलेला  आहे   ! 

       आज अस्तित्वात असलेला प्रत्येक धर्म आप आपल्या चांगल्या वाइट पद्धतीने आपला धर्मं वाढविण्याचा प्रयत्न करीत आहे   …! पण  तो कसा आणि कशासाठी याचा शोध  कोणी घेतला आहे का   …?  "श्री कृष्णाने  धर्मयुद्ध घडवले   ....! पण  ते कोणा  विरुद्ध   ....?  ज्यांच्याशी धर्मयुद्ध करण्यासाठी श्रीकृष्णाने अर्जुनाला "गीते चे " दिव्य dnyaan, तत्वदन्यान्   दिले  …  ते कोण होते   .... ? कोणत्या धर्माचे होते   ....?  श्रीकृष्णाने नेमक्या कोणत्या धर्मासाठी धर्मयुद्ध केले  …?   त्या  महायुद्धात , धर्मयुद्धात जे लढले   … मारले गेले  … ! ते एकमेकांचे पिता, बंधू , सखा होते  …!  "गीते मधील वर्णन असे आहे "पृथ्वीतलावर एकूणच धर्माचा -हास होउ लागला   . नीति नियम सोडून आसुरी वृत्ति वाढली    . अत्याचार वाढला   । तेंव्हा श्री विष्णुना " श्रीकृष्णाच्या रुपात अवतार घ्यावा लागला   …! 

        आज जगातील वाढलेल्या  त्याच अत्याचारी , आसुरी, निर्दयी शक्तींचा, वॄत्तिंचा  नाश करायचा आहे  ....! न कि कुठल्याही धर्माच्या असुयेने ,मत्सराने दंगली, युद्ध करून   विशिष्ट पंथातील-धर्मातील निष्पाप माणसांचा, अबालवृद्धांचा नाश करायचा    …!  हिन्दू धर्माचा  …अर्थात "हिन्दू धर्मात अवघ्या मानव जातीच्या कल्याणासाठी कोणते विचार दिले आहे त्यांचा प्रसार करा  …! आपल्याला  विचारी हिन्दू हवेत   …अविचारी "जिहादी" नकोत    …! आपला हिन्दू धर्म डोळस असावा आंधळा नको  ! जबरदस्तीने , लोभाने , भीतीने , अनीतिने हिन्दू धर्मं  स्वीकारणारे  हिन्दू अनुयायी नकोत   …! आपल्याला अंत:करनाने  हिन्दू झालेले हिन्दू हवेत   ....! " स्वामी विवेकानंद " यांनी  जगभर आपल्या हिन्दू धर्माचा जो डोळस प्रचार केला   …! तसा प्रचार करणे   आजच्या तरुण पिढीचे परम कर्तव्य  आहे  …!  हिन्दू धर्म नेमका काय आहे याचे खरे स्वरुप काय आहे हे जगाला  सांगून पटवून दया  .!   शिवाजी महाराज परकियांशी  लढले तसे नीतिनियम तोडणा-या स्वकीयांनाही त्यांनी  सोडले नाही  …! श्रीराम यांनी   "रावणाशी   धर्मयुद्ध केले" पण  एका  स्त्रीच्या  आपल्या पत्नीच्या स्वाभिमानसाठी  ....! ते  रावणाच्या आसुरी शक्ति विरुद्ध लढले   …! रावणाचा सख्खा भाउ विभीषण श्रीरामा कडून लढला  !    … का  .......? 
           
              आज प्रत्येक खरा हिन्दू पेटून उठणारच   .... कारण  त्यांच्या धर्मात दिलेल्या नीतिनियमांचा। -हास होत आहे   …! हे त्याला पहावत  नाही  … पण  त्याचा -हास रोखायचा असेल तर  मुळात आपण परकियांचे अंधानुकरण करणे  थांबविले पाहिजे   …! आपली परंपरा , संस्कृति, संस्कार, ह्या आपल्या घरापासून जपल्या पाहिजेत  …!  दु स-यांना  सांगण्या आधी स्वत: त्यांचे आचरण करा  ....! आधी करा नंतर बोला  ....!  हिन्दू धर्मं प्रत्येकाच्या श्वासा श्वासात पाहिजे   … ! आपल्या भारतीयांची ती  ओळख आहे ! आणि ही आपली ओळख जगात कुठेही गेलात तरी सांगायला, दाखवायला लाजु नका  …! चला उठा हिन्दू धर्म वाचवा  …! हिन्दू धर्म वाढवा   ……! हे विचार खुप मवाळ वाटतील   …! पण जर आपल्या हिन्दुस्थानवर  कोणत्याही दुस-या जिहादी किंवा अन्य  शक्तिनी आक्रमण केले तर प्रत्येक हिन्दुस्तानी त्याच्यावर तुटून पडलाच पाहिजे  …! मग तिथे मला" गांधी निती " नको" स्वातंत्र्यवीर सावरकरांची हिन्दुस्तानी राष्ट्रनीति पाहिजे " …!!!

          
                                                                                                     " समिधा "







" साहित्य संमेलन एक विलक्षण अनुभव..........."!!!

     सासवड येथे ८७ वे साहित्यासमेलन  श्री  . फ. मु. शिंदे यांचे अध्यक्षतेखाली भरत आहे  … या पार्श्वभूमिवर मला १९९६ साली "आळंदी " येथे ६९ वे आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात जाण्याचे भाग्य  लाभले भाग्यच म्हणावे लागेल   .... कारण त्या नंतर झालेल्या प्रत्येक साहित्य समेलन म्हणजे साहित्य संमेलनचा खर्च , अनुदान  आणि त्यांचे राजकारण हेच गाजत  असते    …!!  या पार्श्वभूमीवर मी अनुभवलेले हे साहित्य समेलनाचे महत्व साहित्य पंढरी म्हणजे काय हे  अधिक अधोरेखित करणारे आहे …! या साहित्य पंढरीची मला एक साहित्याची वारकरी होण्याचे भाग्य लाभले  ... त्या साहित्य समेलनातील काही मनोहारी , काही रंजक, विनोदी काही विचार करायला लावणा-या अश्या अनुभवांचा आनंद माझ्या मित्र मैत्रिणींना देण्यासाठी हा प्रपंच   …!  आशा आहे तुम्हाला वाचून आनंद मिळेल   ....!!!
                                      

     १ फेब्रुवारी  ११९६ रोजी आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी आळंदीत जोरदार तयारी सुरु होती   …! संमेलनासाठी येणा-या साहित्य प्रेमींच्या स्वागतासाठी अलंकापुरी सज्ज झाली होती  …!! कवियत्री "शांता शेळके " अध्यक्ष असणा-या व "लता मंगेशकर " उद्घाटक असणारे हे  संमेलन "इंद्रायणीच्या " तीरावर १५ एकर जागेवर उभारण्यात आलेल्या "अलंकापुरित " चार दिवस होणार होते  . मुख्य मंडपास "संत dnyaandev  मंडप " तर कविसंमेलन मंडपास संत मुक्ताई मंडप नाव देण्यात आले होते ! ग्रंथ प्रदर्शनासाठी २५० स्टॉल उभारण्यात आले होते … ! मुख्य मंडपात एकावेळी ३० ते ३५ हजार रसीक बसु शकतील अशी व्यवस्था होती  मंडपात क्लोज सर्किट टीव्ही बसवण्यात आले होते   ....! अश्या या साहित्य संमेलनात परिसंवाद, काव्यसंमेलन, कीर्तनादि कार्यक्रमांची आमच्या सारख्या रसिकांसाठी पर्वणीच होती  .  

     अश्या या अलंकापुरीला मी माझ्या मैत्रिणीनी ३१ जानेवारीला  ला प्रयाण केले   …! या साहित्य पंढरीला जाण्यापूर्वी मी माझ्या गुरु , शिक्षिका यांची  भेट घेऊन  आशीर्वाद मार्गदर्शन घेतले…! माझ्या साठी हा अत्यंत भाग्याचा  दिवस होता   …! मी प्रथमच साहित्यातील माझ्या  देवांना प्रत्यक्ष पाहणार होते , ऐकणार होते  . 

    पुणे म्हणजे साहित्याचे (विशेषत: मराठीचे) साहित्यिकांचे माहेरघर  . अश्या या साहित्याच्या माहेरघरी  अगदी प्रथमच जाण्याची संधी या संमेलनाच्या निमित्ताने मिळाली   . साहित्य संमेलन १ फेब्रु , १९९६ ते ३ फेेेेब्रु पर्यंत होते   . आम्ही मैत्रिणीनी ३१ जानेवारीला पुण्याला  वस्ती केली , त्यापूर्वी प्रथम आळंदीला  जाऊन  रहाण्या-खाण्याची सोय  करून  आणि साहित्य संमेलन प्रतिनिधि म्हणून प्रवेशपत्र  मिळवून पुण्याला संध्याकाळी ७.३०  ला पोहचलो  …!

      पुण्याच्या वास्तव्यात आणि प्रवासात पुणेरी माणसांच्या अनेक वैशिष्टयांपैकी माझ्या निदर्शनास , अनुभवास आलेली काही वैशिष्ट्य अशी   …(इथे माझ्या पुणेकर मित्र-मैत्रिणींच्या भावना दुखावण्याचा अजिबात हेतु नाही   . दुखावल्यास क्षमस्व) )

       समुद्रात राहून /पाहुन ओलं न होता बाहर पड़ता येईल  …? कोरडे रहाता येईल  …? साहित्याच्या माहेरघरी आश्याही व्यक्ति भेटल्या ज्यांना साहित्य - साहित्यिक  याबाबत अजिबात उत्सुकता किंवा कुतूहल जाणवले नाही  .! या व्यक्ति म्हणजे (ज्यांच्या पुण्याच्या घरी आम्ही राहिलो होतो ते  माझ्या मैत्रिणीचे मामा  जे पुण्याच्या "न्यू इंग्लिश स्कूल" मध्ये सायन्स टीचर आहेत आणि तिचे दोन मामे भाऊ आनंद-मकरंद   .  या तिघानाही आम्ही मुंबईहून (पुण्याच्या वक्रदृष्टीने) ख़ास आळंदी च्या साहित्यसंमेलना साठी आलो आहोत हे पाहूनच गंमत    ....  वाटली !  त्यांच्या मते साहित्यिक गोष्टी म्हणजे सगळा काल्पनिक खेळ ! सायन्स वाल्यांना पूर्ण सिद्धांतिक वास्तव आवडते  . असा विचार जरी  करीत असले तरी तो त्यांचा किंवा त्यांच्या वैचारिकतेचा दोष नाही तर एकूणच विचार प्रवृतितिल एक कमतरता आहे एवढेच म्हणू शकते  . 

     पुण्याची माणसं ताटात किंवा ताटातील एकहि शीत खाली न पडू  देण्याची जितकी काळजी घेतात तितकीच काळजी ते समोरील व्यक्तीचा एकही  शब्द खाली न पडण्याची घेतात  .  थोडक्यात हाताला हात न भीड़वता अक्षराला अक्षर भिडवून अहिंसात्मक वादामारी करतात   …!!  'आम्ही शिवाजीनगर -(कॉर्पोरेशन) येथून आळंदी बस मध्ये चढलो  .  आमच्या जवळ खुप सामान , त्यामुळे सर्वांच्या आधी बसमध्ये सीट मिळवण्या साठी पळत  सुटलो   …पण सर्वांच्या शेवटी बस पर्यन्त पोहचलो  …! अर्थात बसमध्ये  सर्वात शेवटची सीट मिळाली   .!! 
    आमच्या अगदी  पुढच्याच सीटवर दोन  मांजरीं मध्ये उंदराने बसावे (पु   . ल  . चे  वाक्य  ) त्याप्रमाणे दोन अवजड स्त्रियांच्या मध्ये एक पुरुष बसला होता  .!    काही अंतराने कुठलेतरी बस स्थानक आले खिड़की जवळची स्त्री उतरली तीच संधि साधुन तो मधला पुरुष खिड़कीजवळ सटकला .... ! परंतु  …। त्यांच्याच सीटजवळ तितकीच वजनमापाची स्त्री सीटच्या आशेने उभी होती  … ती बसलेल्या स्त्रीला सरकायला सांगत होती  .... पण बसलेली स्त्री ढिम्म   ....!! " अहो बाई ! जरा सरकायताय का   …?  उभी स्त्री  .  "नाही बाई ! मला नाही सरकायचं   " बसलेली स्त्री  .  (मुंबईच्या लोकल डब्यात एखादी बाई सीट वरुन उठली कि शेजारचीचा सरकने हा हक्कच असतो, त्यासाठी भांडण, मारामा-या होतात ! इथ सगळे  वेगळे होते )  "मग मला आत तरी जाउ दया   .... " उभी स्त्री   . "मग जा की  .... " बसलेली स्त्री  .  त्या तेव्हढ़याश्या अरुंद जागेतुन  ते रुंद शरीर महत्प्रयासाने ओढत , ताणत  ती उभी स्त्री बसण्याचा प्रयत्न करीत असतानाच  … बसलेल्या स्त्रीच्या मांडीवर बसली ! (नशीब त्या  खिड़कीतल्या माणसाचे) अहो बाई ! रिकामी जागा दिसत नाही का  …? "दिस्तीय म्हणून तर  बस्तिय , तुम्ही सरकत नाही , रिकाम्या जागेवर बसु देत  नाही ! मग करायच काय  …? (शेजारचा मनुष्य भेदरून खिड़कीच्या कनपटीत  अधिकच घुसत होता  …!  हातातलं  सामान कसंतरी सीट खाली चेपित ती  स्त्री बसली पण तोंडाचा पट्टा चालूच  … "रिकाम्या जागेत बसावं  तरी मेलं यांची शिरजोरी ! एक  ना  दोन  .  या संपूर्ण प्रसंगात कुठे तरी वाद घालायला कारणीभूत ठरलेले एकतरी सयुक्तिक कारण "बसतं " का ?

      कुठल्याही प्रश्नाचे (अगदी तो प्रश्न सरळ साधा असला तरी) पुणेकरी माणूस त्याचे उत्तर सरळ  देईल याची काही खात्री नसते   .! आळंदीला आम्ही प्रथमच जात होतो आमच्या ओळखीच्या बांईनी आम्हाला दिलेला पत्ता शोधण्यास आम्ही बसमधूनच प्रारंभ केला आमच्या जवळच एक आळंदीकर वयस्कर गृहस्थ बसले होते   … त्यांच्या पासूनच सुरुवात केली   .   "काहो   … इथे आळंदीला मराठा धर्मशाळा कुठे आली" मी  . .... …? अहो  ! इथं ब-याच धर्मशाळा आहेत  . घर न्हाई एकवेळ सापडणार पण धर्मशाळा जागोजागी पेरल्यात ) ( आम्ही विशिष्ट नावासकट प्रश्न विचारला होता पण उत्तर सरळ नाहीच   …! "बरं पाण्याची टाकी कुठे आली  ? " आम्ही  . "आता तुम्हाला नेमकी कुठची टाकी पायजेल  ?" म्हणजे आगरी धर्मशालेजवळची की खालच्या मुंबईच्या जेवण डब्यावाल्यांच्या धर्म शालेजवळची  …?" (मघाशी विशिष्ट नावासह  धर्मशाळेचं नाव विचारले तरी उत्तर नाहीच  …! अश्या या पुणेरी वल्ली  .... !! पण  काहीही असो   चुकणा-याला शाल जोडितला मारुन कान पिळून शिकवणी घेण्याची जी रीत असते ती  वाखणलिच पाहिजे…! ही एक पुणेरी पाटी पहा  ....... !

                                               

    एकदाचे आम्ही आमच्या धर्मशाळेच्या मुक्कामी पोहचलो "मराठा धर्मशाळा " तिचे बांधकाम अपूर्ण अवस्थेत असलेली एक इमारत होती  . त्यातील एका खोलीत आमची रहायची व्यवस्था झाली  . आधीच पुणे ते आळंदी  प्रवास करून थकल्या भागलेल्या आम्ही आल्या आल्या जमिनीवर बैठक ठोकल्या   . पोटात भुकेचे कावळे आक्रोश करीत होते   .  शेवटी खोलीच्या मागच्या बाजूलाच पाण्याचे एकमेव नळ होता  . ( तिथे २४ तास पाणी होते  …! ) त्यावर हातपाय धुवून आम्ही पुण्याहून आणलेल्या नाष्ट्यावर  अक्षरशा तुटून पडलो  .   ताजेतवाने वाटू  लागले  आणि आम्ही इंद्रायणी तीरावर १५ एकर जागेवर उभारण्यात आलेल्या "अलंकापुरीकडे" प्रस्थान केले ! त्या रम्य संध्याकाळी रस्त्याने जाताना आमच्यात  अगदी एक वेगळेच चैतन्य संचारले होते  .   आम्ही त्या साहित्य नगरीतील "अलंकापुरीमध्ये उत्साहानेच  प्रवेश केला प्रवेश बैच लावून आम्ही प्रथम सारी  अलंकापुरी फिरुन  येण्याचे ठरविले  .

     प्रवेशद्वारावरच अनेक दिग्गज साहित्यकांचे तैलचित्र गुंफून जणू तोरण लावले होते  .  आम्ही मुख्य मंडपात आलो  … जिथे गानसम्रादनी " गानकोकिळा " लता मंगेशकर यांच्या हस्ते साहित्य संमेलनाचे उदघाटन होणार होते  . त्यास "संत dnyaandev मंडप "  नाव देण्यात आले होते  . तर कवी-कवितांच्या सोहळ्या साठी उभारण्यात आलेल्या मंडपास "संत मुक्ताई" नाव दिले  होते  .  आम्ही सार्वजणी मंत्रमुग्ध होऊन साहित्य नगरी फिरत असतानाच टाळ -मृदंगाचा आणि लेझिमचा आवाज कानी आला  .  प्रवेशद्वाराजवळ ग्रंथदिंडीने प्रवेश केला होता   .!  या दिंडित सहभागी होण्यासाठी नेवाश्याहुन  dnyaaneswharinchi , देहू तून तुकारामांच्या गाथेचि व सज्जनगडावरून दासबोधांच्या गाथेचि पालखी आणण्या  आली होती  . ! प्रत्यक्ष साहित्य समेलनापूर्वीची ही पूर्व संध्या म्हणजे उद्याच्या साहित्य पंढरीमधील साहित्य भाव भक्तीचा मेळा कसा रंगणार होता त्याची नांदी होती  … ! रात्र झाली होती  । आमच्या मुक्कामी आम्हाला जायची इच्छा नसतांना   … आम्हाला या भारलेल्या वतावरणातून जावे लागत होते  .! दिवसभराचा थकवा कुठल्या कुठे कधि पळाला आम्हाला कळलेच नाही  …! दुस-या दिवशी पहाटेच उठायचे होते   …! सकाळी ७ वाजता या अलंकापुरित परत यायचे आहे या आनंदातच आम्ही आमच्या मुक्कामी पोहचलो  …!

      पहाटे पाचला  आम्ही सा-या उठून साडे सहां पर्यंत तयार होऊन सकाळच्या त्या रम्य गुलाबी थंडीत चालतच "अलंकपुरीकडे " निघालो  … ! अर्थात प्रथम dnyaaneshwaranchyaa  समाधीचे दर्शन घेतले  … ! खुप पवित्र पवित्र वाटत होते  .! आणि ज्या सोहळ्याची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो तो देखणा सोहळा आम्ही याची देहि याची डोळा पहिला   …!!  साहित्य समेलनाच्या उद्घाटनाचा ५५० बाय ३०० फुट आकाराच्या "संत dnyaandev मंडप  या मुख्य मंडपात समोरील फुलानी सजवलेल्या व्यासपीठावर भव्य-दिव्य व्यक्तिमत्व बसली होती   .! त्यामध्ये संमेलनाच्या अध्यक्षा श्रीम  . शांताबाई शेळके , गानसम्रादनी श्रीम  . लताबाई मंगेशकर ,   मावळते साहित्य संमेलन अध्यक्ष श्री  . विद्याधर गोखले आदी मंडळींना मी तर  अगदी  विलक्षण नजरने अगदी भारावल्या सारखी बघत होते  .  आमच्या सारख्या साहित्य वेड्या रसिकांसाठी  ती आमची दैवत .......!!!!                          

                                    


     आतापर्यंत लतादीदींना गाताना एकले /पाहिले होते पण त्यावेळी प्रथमच काहीतरी वेगळं एकायला आणि पहायला मिळाले   .  त्यांचे भाषण म्हणजे "पसायदान" वाटले  .  लयबद्ध , शब्दप्रधान , सुरताल  आपोआप गुंफीत  जाते ती कविता   .... असा काव्यात्मकतेचा अनुभव प्रत्यक्ष पहायला  … ऐकायला  मिळाला  .  त्यानंतर साहीत्य संमेलनाच्या अध्यक्षा श्रीम शांता शेळके यांचे भाषण म्हणजे ओजस्वी वाणी  आणि तेजस्वी भाषाशैलीचा दुग्धशर्करा योग होता  .  या सर्व भारावलेल्या मनस्थितीतच आम्ही दुपारनंतर धर्मशाळेत आलो  .  थोड़ी विश्रांती घेऊन संध्याकाळच्या ख़ास कार्यक्रमासाठी आम्ही उत्सुक होतो   .... संध्याकाळी तयारी करुन  आम्ही इंद्रायणी तिरावरून साहित्यनगरीकडे निघालो होतो   …… ! मी कुतूहलाने इंद्रायणीला बघून घेतले   .... कारणही तसेच ख़ास होते   .... !!

     साहित्यनगरीत आम्ही प्रथम गेलो ते पुस्तकपंढरीला भेट दयायला १० बाय १२ फुट आकाराचे सुमारे २५० पुस्तकांचे स्टॉल उभारण्यात आले होते  .  तिथे प्रवेश  केला  ....  आणि मला अलिबाबाच्या गुहत शिरल्या सारखे भान हरवून आधाशा सारखी पुस्तकांच्या जत्रेत स्वत:ला झोकून दिले  .  अनेकविध पुस्तकांमध्ये मी एवढी हरवून गेले कि होते कि प्रतिभा आणि वीणा या माझ्या मैत्रिणी  माझ्यापासून कधी  दूर गेल्या मला कळलेच नाही  …!!! रात्रीचे जवळ जवळ आठ वाजले असतील पुस्तक खरेदी करुनही माझी त्या पुस्तक जत्रेतुन बाहेर पडण्याची अजिबात इच्छा नव्हती   … तेव्हढयात पाठीमागुन प्रतिभा आणि वीणाने पाठीत जोरात धपाटे टेकले    ………  मी भानावर आल्यासारखी  त्यांच्याकडे आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत राहिले  . त्या बिचा-या  दोघी मला शोधून शोधून दमल्या होत्या  शेवटी कंटाळून धर्मशाळेकड़े परतत असताना  अचानक त्यांना मी मंडपात सी सी टीव्ही  बसवण्यात आले होते त्यामध्ये मी या पुस्तकांच्या स्टॉलवर दिसले म्हणून बरे  ……!!


     मुख्य मंडपाच्या बाहेर आम्ही आलो  आणि अचानक मला इंद्रायणी  तिराची आठवण झाली   .... आणि जवळ जवळ ओरडतच इंद्रायणी तिराकडे धावत सुटले  .... कारण इंद्रयाणीकडे जायला आम्हाला आधीच खुप उशीर झाला होता  .... !! दँयानेश्वर  माऊलींनी नऊ हजार तेहतीस ऒव्यांनी ड्यानेश्वरीची रचना केली  . त्या अनुषंगाने संमेलनाच्या पहिल्या दिवशी सायंकाळी सूर्यास्त नंतर इंद्रायणी नदीत नऊ हजार तेहतीस dnyaandip सोडण्यात येणार होते  ……!!  आम्ही गर्दीतून वाट काढत तेथे पोहचलो  .... आणि समोरचे दृश्य बघून हरखून गेलो  .... !!

     रात्रीच्या अंधारात हजारो दीप मिनमिनत्या प्रकाशात पाण्यात हेलकावे घेतानाचे दृश्य अतिशय विलोभनीय दिसत होते  ....!! इंद्रायणीच्या काळ्याशार पाण्यावर  दीपकळ्या जणू उमलल्या होत्या।  त्याचे वर्णन शब्दातीत आहे   ……!!!
                                        

     दुस-या दिवशी आम्ही संत dnyaneshwar माऊली उत्तमेश्वर पिंपरीकर यांचे कीर्तन आयोजीत करण्यात आले होते  .   त्यावेळी १२ जण  एकाच वेळी पखवाजावर त्यांना साथ देत होते आणि सुमारे दोन हजार टाळकरी त्या तालावर कीर्तनात् रंग भरत होते  .  तो नाद्ब्रंम्हाचा एकत्रित गजर ऐकून अवघी आळंदी दुमदुमुन गेली   ....  आणि तो मुख्य मंडप अवघ्या पंढरीमध्ये रूपांतरित झाला   …!!

     दुस-या दिवशी आम्ही "dnyaneshware रचिला पाया " या परिसंवादाला हजेरी लावली  … तेथे  राम शेवाळकर , यु . म. पठाण , आणि शिवाजीराव भोसले   .... या दिग्गजांचे विचार आणि ते व्यक्त करण्याची शैली   आम्हाला बरेच काही देऊन गेली   ....!!!  तेथेच तेथेच आम्हाला श्री   . माधव गडकरी , शिरीष पै  आणि वीणा देव , सुधीर रसाळ भेटले अर्थात आम्ही आमच्या ऑटोग्राफ  डाय-या त्यांच्या पुढ्यात सरसावल्या   .... त्यांच्या  स्वाक्ष-या  अजूनही मी एखाद्या मोरपिसा सारख्या जपून ठेवल्या आहेत   .
                                                         
     मी माझ्या घरी संध्याकाळी फोन करत होते , त्याप्रमाणे रात्री फोन केला  .... काल फोनवर माझ्या बाबांनी मला अर्जंट घरी परत बोलविले होते  .... कारण मला  गव्हर्नमेंट नोकरीचा इंटरव्यू  कॉल आला होता  … मुलाखतीचा दिवस नेमका ४ फेब्रुवारी होता , म्हणजे मला  साहित्य संमेलनाचा शेवटचा तीस-या दिवसाचे कार्यक्रमांचा आनंद घेता येणार नव्हता  …!  मी बाबांना खुप समजावण्याचा प्रयत्न केला  की  मी कंटाळले आहे इंटरव्यू देऊन  .... ,  मला  नाही यायचे  ....! मला वाटले बाबांचा आग्रह कमी झाला असेल  आणि मला उद्या परत जावे लागणार नाही  … ! पण  …  बाबांनी उद्या तू घरी परत ये असे फर्मानच सोडले   … मग माझाही नाइलाज झाला  .  उद्याचा साहित्य संमेलनाच्या शेवटचा दिवस  दुपार पर्यंतचे जमतील तेवढे सर्व कार्यक्रमाना हजेरी लावण्याचे मात्र ठरविले होते  …! त्याप्रमाणे नवोदित कवींचे काव्यसंमेलन , पुन्हा        एकदा पुस्तक स्टॉलला भेटी हे कार्यक्रम आटपुन् घेतले  ....!  खरंतर संध्याकाळचे सर्वात सुंदर आणि आवडते कार्यक्रम होते   …! "पंडित भीमसेन जोशी " यांचे "अभंगवाणी"  आणि हृदयनाथ मंगेशकर यांचे "अमृताचा घनु "  या कार्यक्रमातील या दिग्गजांच्या स्वर्गीय आवाजातील गायनाचा आनंद याला मात्र मी मुकणार होते  …!!

     पण  तरीही मी दोन दिवसात जो आनंद उपभोगला तेहि नसे थोड़के  …!

                                      " स्वर्गसुखाचे भोगासी
                                       तीर्थाची तुलना काय होई
                                       तीर्थ म्हणजे आनंदभु ठायी ठायी"   ....!!!

असेच काहीसे भाव घेऊन मी एकटीच परतले  …!! तरीही आळंदी  साहित्य संमेलनातील माझा एकूण अनुभव काय  …? तर अनेक लहान मोठ्या , असामान्य - सामान्य - अतिसामान्यांच्या सहवासातील एक अलिप्त - एकांगी सहवास  …!! ज्या अपेक्षित क्षणांच्या आशेने गेले होते  "त्या" क्षणांपेक्षा अधिकतर अनपेक्षित क्षणांची ओंजळ भरून  आणली   …!  परिसंवादात - वाद-विवाद दिसले, सुसंवादात फक्त एकांगी संवाद दिसला , सहभागापेक्षा उपभोग दिसला , आनंद-खुशीपेक्षा हौशी दिसल्या  … या साहित्य सोहळ्यात अश्या या ब-याच मोकळ्या जागा दिसल्या   …!

    मी स्वत: मात्र काव्यसंमेलनातील सुन्दर - सुबोध कवितांचा आनंद घेतला   .  परंतू निमंत्रितांच्या कवितांपेक्षा नवोदितांच्या कविता मला अधिक भावल्या   ! परंतु त्यातही सुकाळाच्या नवोदित कवींच्या भाऊगर्दीत बरे झाले  आपण नाही असे वाटल्याशिवाय राहिले नाही ! .  पण साहित्यसंमेलनाचा  एकूणच अनुभव मनाला समाधान देणारा नसला तरी एका नवीन अनुभवाची माझ्या जीवनात भर पडली आहे याचेच मला खुपच समाधान वाटले   ....!!

     "मित्र-मैत्रिणींनो त्याहून विलक्षण चमत्कार म्हणजे ज्या मुलाखतीसाठी मी माझा साहित्यिक आनंद अर्धवट सोडून परतले होते    .... त्या मुलाखतीत मला जवळ जवळ सर्वच प्रश्न आळंदी येथे भरलेल्या साहित्य संमेलनावरच  विचारले गेले   .... हां विलक्षण योगायोग होता  की माऊलीची कृपा  .... माहीत नाही पण मला govt नोकरी मिळाली  …!!!!!


                                                                                        " समिधा"


   
                                   




" माझे बाईपण "...................




कवयित्री पदमा गोळे यांची एक कविता वाचनात आली....! "आजच्या इतकी आईपणाची भीती वाटली नव्हती. अगतिकतेची खंत कधीच दाटली नव्हती" ....!  कवितेतील या काही ओळी वाचताना आजही  स्री आणि तिची भीती यांचा संदर्भ बदललेला नाही ....! दिल्लीतील आणि त्यानंतर सातत्याने स्रीयांवरील अत्याचारांच्या घटना आपण वाचतोच आहोत.  ज्या स्रीयांवर  हे अमानुष अत्याचार झालेत त्यांच्या दुख:वेदनांशी आपण कल्पनेतही भिडू शकत नाही....! आपला सामाज स्रीयांबाबत एव्हढा असंदेनशील कसा राहू शकतो?
अनादी -अनंत काळापासून कधी द्रौपदीच्या रुपात विटंबना तर कधी सीतेच्या  रुपात स्री पवित्र्याच्या सत्वपरीक्षेचे आव्हान अश्या    विकृत समाजपुरुषाच्या   मानसिकतेचे स्वरूप पहायला मिळते ....! आणि आजही हि विकृत समाजपुरुषाची  मानसिकता बदलेली नाही ..!
स्री पुरुष विषमता हा एक व्यापक विषमतेच्या वास्तवा मधला सर्वव्यापी घटक आहे. यापलीकडे विषमता पेरणारे घटक आहेतच धर्म , जात शिक्षण पैसा असे अनेकविध घटक आहेत. आणि प्रत्येक घटकातहि आपल्या परीने आहे रे नाही रे , थोडे वरचे  आणि थोडे खालचे स्तर आहेत या प्रत्येक स्तरावर स्रीयाना संघर्ष करावाच लागतो....! स्री  दुर्बल आहे...! असे फक्त समाजपुरुष ओरडतो ...! आजची स्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून पुरुषी मक्तेदारी असलेल्याही प्रत्येक क्षेत्रात  कार्यरत आहे...!  परंतु तरीही स्रियांचा त्यांच्या मतांचा , त्यांच्या विचारांचा एकूणच त्यांच्या अस्तित्वाचा किती विचार केला जातो....? 
आजच्या २१ व्या शतकातही स्रीयांपुढे  स्रीभ्रून हत्या ,हुंडाबळी, लैंगिक शोषण, घरात- बाहेर मानसिक,शाररीक अत्याचार या आणि अश्या अनेक समस्या उभ्या आहेत...! ग्रामीण भागातील स्री तर आपल्या हक्कांबाबत अनभिज्ञ आहे . कर्त्या पुरुषाच्या बरोबरीने ती कष्ट करते पण तरीही तिला आर्थिक स्वातंत्र्य नाही...! निर्णय स्वातंत्र्य नाही...! तिला तिच्या मुलभूत गरजापासून वंचित ठेवले जाते..!

हि परिस्थिती बदलणे गरजेचे आहे....! या साठी सनातन भारतीय संस्कृतीचे पालक सांगतील मग स्रियांनी ७ च्या आत घरात यावे...! पूर्ण  कपडे घालावेत..! फक्त चूल आणि मुल सांभाळावे......! तर हे सर्व थोतांड आहे.....! बलात्कार करताना ती लहान मुलगी आहे कि म्हातारी स्री  आहे  हे बघितले  जाते का ...? तिचे वय ...तिचे कपडे या नगण्य गोष्टी आहेत..!  तिचे फक्त बाईपण बघितले  जाते ...! तेंव्हा  कुठे जाते तुमचे संस्कृती..? 
 मुळात संपूर्ण समाज्पुरुशाची विकृत मानसिकताच बदलली पाहिजे. स्रीला माणूस म्हणून वागवा ..! बरोबरीने तिचा सन्मान करा ...! कारण स्री -पुरुष हे समाजाची केवळ दोन चाके नाहीत , तर निसर्गाची दोन सूत्र आहेत ज्यावर समस्त मनुष्यजातीचे अस्तित्व अवलंबून आहे...!  आणि याचे भान समाजपुरुषाला येणे आवश्यक आहे...! विकृत समाजापेक्षा सुसंस्कृत समाज निर्माण होणे गरजेचे आहे. प्रत्येकवेळी पाश्च्चात्य संस्कृतीच्या नावाने जे अंधानुकरण चालले आहे या
बाबत ओरड होते.. हे काहींअंशी खरे असले तरी आपली भारतीय संस्कृतीचे डोळस भान ठेवून पुरुषी मानसिकता आणि त्याहूनही विकृत मानसिकता बदलली पाहिजे....! 

माझं  बाईपण बघा ...
पण 
मी जोजविते विश्वाला ....
माझं आईपणही बघा ....!!!! 


                                               "समिधा" 

" गुंतता ह्रदय हे " ......!!

    
                                     


      काही माणसांना आपण आपल्या आयुष्यात खुप महत्व देतो   . त्यावेळी आपण हे असे का करतो   ….? ही माणसे आपण आपली मानतो , कारण आपल्याला स्वत:ला कुठेतरी हे जाणवत असते , कधी कधी त्याचा प्रत्ययही घडलेला असतो की आपल्या आयुष्यात त्याना जेवढे महत्व आहे तेवढेच मलाही त्या व्यक्तिच्या आयुष्यात महत्व आहे   . मग आपल्यातील हे आपलेपण त्या व्यक्तीला अनेक त-हानि पटवून देतो  अगदी प्रामाणिकपणे  .  सुरवातीला आपली ह्या प्रमानिकतेबाबत त्या व्यक्तिकडूनही तितकाच आणि तसाच प्रतिसाद मिळावा ही अपेक्षा नसतेच ….! पण ही अवस्था फार काळ नाही टिकत   …!

     कारण ह्या आपलेपणाचा हळुहळु आपल्या नकळत एक मानसिक गुंता होंत  जातो  . हळुहळु आपण आपलेपण त्या व्यक्तीवर ठसविण्याच्या प्रयत्नात लादण्याचा प्रयत्न होंत जातो  .  सुरवातीला त्या व्यक्तिकडूनही आपल्याला प्रतिसाद मिळतो अगदी तेव्हढ़य़ाच उर्मितुन आणि ऒढीतुन पण जसे "अति परिचयात अवदन्या"  अश्या तर्हेने या अति आपुलकीने , ओढाळ  मनाला कुठेतरी शह बसतो आणि ती  ओढ हळुहळु खूंटत जाते   ! हे खूंटणे त्यावेळी एकाचवेळी दोघांच्याही किंवा एकावेळी एकाच्याच लक्षात येते त्यावेळी त्यांच्यातील आपलेपण कुठेतरी थरथरते आणि मग ते तुटक तुटक होते व् नंतर कदाचित ते कायमचे लोप पावते  …!!

    असे घडण्याची दोन  कारणे असू शकतात एक म्हणजे हे आपलेपण  नेमक्या त्या क्षणी पालवी धरते ज्याक्षणी कोरड्या मनाला कुठूनतरी ओलावा लाभतो  ….!  पण पुढे हीच पालवी म्रुगजळाने  आभासाने फुललेली असते असे लक्षात येते  ….!

     आणि दुसरे म्हणजे ज्यावेळि प्रेम-जिव्हाळा , आपुलकी आपला हक्क सांगू लागते त्यावेळी जबाबदारिचा  विसर पडलेला असतो  .   त्याचवेळी दोनही व्यक्तिमधील अहं सदैव जागा असेल तर तो या आपुलकिच्या हक्काने आधिक जोपासला जातो  आणि त्यामुळे तो अहं अधिक दाट , गडद , गहिरा , ठळक  होउन ज्या आपुलकीने त्याना जवळ आणलेले असते त्याचाच  नाश करत  जाते  …!! आणि गैरसमजाना अधिक पेव फूटते  ….!  असा हा गुंता /तेढा  वाढत गेला की मग नात्याचा आपोआपच अंत होतो   ….!  


                                                                                               " समिधा "












                                                                                                                        



     


लोकप्रिय ..........

एखाद्याचं आपल्यातून अवेळी जाणं ……!

       किती किती अवघड असते समजून घेणे  एखाद्याचे आपल्यातून अवेळी जाणं    ....!!  अगदी अनपेक्षित असते  आपल्या साठी   …!  काळाने गनिमिका...

हे तुम्हाला नक्की आवडेल......