"आपल्यातला चंद्र....!"


प्रतिमेत याचा समावेश असू शकतो: एक किंवा अधिक लोक, संधिप्रकाश आणि महासागर


      आपलं मन ...अनेक त-हेच्या विचारांनी भरुन असतं...! सद्यपरिस्थीतीचा विचार केला की वाटते आज प्रत्येकजण आपल्या मनमस्तिश्काचा दरवाजा बंद करून बाहेरील विचार भिंतींवर वाटा शोधण्यासाठी डोके आपटीत आहेत.
आपल्या प्रत्येकाला सुख समाधान शांतीचा चंद्र हवा असतो आणि आपण सर्व तर पाण्यात पडलेल्या चंद्रबींबाकडे धावत आहोत आणि तो चंद्रबींब ज्या पाण्यात आहे त्या पाण्याच्या मोहात अडकून त्यामध्ये अविचाराने बुडत आहोत ....पण ते पाणी जेव्हा संपूर्ण वाहून जाईल तेव्हा तो चंद्रबींब तिथे असेल ...?अर्थातच नसेल...!आणि तेव्हा आपले लक्ष वर आकाशाकडे जाईल तिथे ख-या चंद्राचे दर्शन होईल .
 
      अगदी तसंच बाहेरील विचार आचारांमधील संक्रमणात स्वत:ला भिरकावून देण्यापुर्वी आपल्या आतल्या अंतरमनातील अनुभूतीला एकदा पहा!
 
      आपण जे , ज्यांना वाचतो ,पहातो , ऐकतो हे सारं काय आहे...?ही सारी बोटं आहेत....!ज्यांना धरून आपण त्यांनी दाखविलेल्या मार्गांनी चालत असतो आणि ती बोटं धरून चालतच रहातो..! आपण ती बोटं तर सोडत नाहीच उलट आपण त्या बोटांनाच पुजायला लागतो....त्यांचेच उत्सव करायला लागतो!
 
खरं तर त्या बोटांना मागे सोडून , त्या बोटांत बोटं न अडकवता आपल्या आंतरीक अनुभूतीच्या शक्तीला सोबत घेऊन जीवनानूभवाला पहायचे , ती आपल्याला खरा प्रकाश दाखवते , खरे ,ज्ञान देते...!
ज्या दिवशी मोहमयी पाण्यातला चंद्रबींब मिटून जाईल , अशाश्वत बोटांची साथ सुटून जाईल तेव्हाच अंतरातला अनुभव चंद्र आणि आंतरीक शक्तीची शाश्वत साथ सोबत असेल ! ही सोबत प्रत्येकाला लाभो हीच प्रार्थना!
 
© पुष्पांजली कर्वे

*अर्धीमुर्धी कहाणी....* एक विलक्षण जीवनप्रवास !

 प्रतिमेत याचा समावेश असू शकतो: 1 व्‍यक्ती, मजकूर आणि जवळून

..
आत्मचरित्र - आसामी लेखिका इंदिरा गोस्वामी - अर्धीमुर्धी कहाणी
मराठी अनुवाद - अर्चना मिरजकर 
 
 
*अर्धीमुर्धी कहाणी....* एक विलक्षण जीवनप्रवास !
 
       अर्धीमुर्धी कहाणी म्हणजे इंदिरा गोस्वामी या भारतीय ज्ञानपीठ विजेत्या आसामी लेखिका यांच्या जीवनाचा हा अर्धैमुर्धा परिचय आहे! त्यांचे आत्मचरित्र तीन भागात प्रकाशीत झाले आहे.
आधालेखा दस्तावेज या आसामी आत्मचरित्राचा हा मराठी अनुवाद केला आहे आणि हा अनुवाद मराठी लेखिका अर्चना मिरजकर यांनी केला आहे!
सुविद्य प्रकाशनाने प्रकाशीत केलेल्या या मराठी अनुवादीत पुस्तकाचे मुखपृष्ठ शिरीष यांनी तयार केले आहे. 24 जानेवारी 2003 मध्ये ह्या पुस्तकाची पहिली आवृती प्रकाशीत झाली आहे!
मला स्वत:ला साहित्यातील आत्मचरित्र हा साहित्य प्रकार विशेष आवडतो! कारण प्रभावी व्यक्तिंच्या व्यक्तीमत्वांचे आत्मचरित्र वाचून आपल्यातील न्युनता, कमतरता असल्यास त्यांच्याकडे अतिशय सकारात्मक दृष्टिकोनातून एका अनोख्या उर्जेचे प्रेरीत होऊन पहाता येते!
आपल्यातील सृजनात्मक , आयुष्याकडील प्रोत्साहनात्मक खरा शोध आपल्याही नकळत सुरू होतो....!
अर्धीमुर्धी कहाणी या आत्मचरित्रातील इंदिरा गोस्वामी यांच्या आयुष्यातील अनेक घटनाक्रमांनी चकीत व्हायला होते, त्यांच्या कोलमडलेल्या मनस्थितीला समजून घेताना आपणही स्वत:ला त्या परिस्थीतीत मांडून पहातो... आणि वाटतं आपण कदाचीत संपूर्ण संपलो असतो... पण तरिही त्यांच्या आयुष्यातील जिद्द पाहून पुन्हा उभं राहाता येतं यावर विश्वास ठेवायला लागतो! 
 
या आत्मचरित्राताच्या सुरूवातीच्या मनोगतात लेखिका इंदिरा गोस्वामी यांनी हेआत्मचरित्र लिहावे यासाठी पहिली प्रेरणा देणारे आसामी लेखक होने बार्गोहाईन यांचं त्यांना एक पत्र आलं त्यातील हा मजकूर उदृ्धत केलाय त्यामधूनच या आत्मचरित्रातील घटना खुप प्रभावी असाव्यात याचा अंदाज येतो!
"* एखादा सामान्य पुरूष किंवा स्री दु:ख आणि वेदनेपुढे हार मानेल आणि मृतवत आयुष्य जगेल - पण तुझं दैव तसं नाही - कारण तू जन्मजात कलावंत आहेस आणि तुझी सर्जनशीलता हाच तुझ्या चिंतेवर, दु:खावर आणि अंशत: मृत्यूवर उपाय आहे!  *"म्हणजे (कलावंताची ) सर्जनशीलता माणसाला चैतन्य देते याचं हे आत्मचरित्र एक उत्तम उदाहरण आहे! तसं पहाता आसामी साहित्य विश्वात या आत्मचरित्राचं अतिशय निरूत्सहाने स्वागत झाले. कारण एका तरूण मुलीने लेखिकेने मग तिचे आयुष्य कितीही खळबळजनक असो तरी आत्मचरित्र लिहावं यावर त्यांनी टिका केली. 1986 मध्ये आसोमबानो या नावाने या आत्मचरित्राचा पहिला भाग आसामी भाषेत प्रकाशीत झाला. विशेष म्हणजे या आत्मचरित्राला "अमृता प्रितम " या पंजाबी सिद्धहस्त सुप्रसिद्ध लेखिका यांची प्रस्तावना लाभणं म्हणजे एखाद्या ज्वलंत आयुष्यातील निखा-यांना हाताळताना त्या त्या निखा-यांची तीव्रता केवळ अमृता प्रितम यांच्याशिवाय कुणाला जाणवावी... असा हा योग जुळून आला आहे! 
 
        जीवन म्हणजे सौदा नाही... या प्रकरणानं आत्मचरित्राची सुरूवात होते! किशोरवयीन असताना आसामच्या एका प्रसिद्ध ज्योतिषाने लेखिकेच्या आईला सांगितलं होतं "या मुलीचे ग्रह इतके वाईट आहेत की तिचे दोन तुकडे करून तिला ब्रम्हपुत्रेत टाकून दिलंत तर बरं होईल...!
आपल्या आजोबांच्या जहागिरीवर हत्तींबरोबर खेळणा-या या आसामी सौंदर्यवतीचं शिक्षण आसामचे शिक्षणअधिकारी असलेल्या तिच्या वडीलांच्या देखरेखीखाली शिलॉमगच्या पाईन माऊंट आणि गुहावटीच्या शाळेत झालं! पण बालपणापासूनच जणू तिच्यावर मृत्यूची सावली होती..!
वडीलांच्या प्रतिष्ठेमुळेच व तिच्या अंगभूत आकर्षणमुळे तिला रोज स्थळे सांगून येत पण त्यांच्या अकाली निधनामुळे ती स्थळं येणं बंदच झाले! आईची चिंता पाहून तिच्याही मनात आत्महत्येचे विचार येऊ लागले, आणि तिने तो एक असफल प्रयत्न केलाही! एका प्रतिष्ठित घरातील सुंदर तरूण मुलीनं असं कृत्य करणं म्हणजे तीच्याकडून काहीतरी प्रमाद घडला असावा, लग्नाआधीच तिला दिवस गेले होते का? अशा शंका घेणं म्हणजे एखाद्या पवित्र कुमारिकेसाठी अग्निदिव्यापेक्षा भयंकर आपत्ती, समाजाच्या नरकरूपी ज्वाला! मग तिच्याच लक्षात आले जगायचं असेल तर प्रत्येक आपत्तीचा सामना करावाच लागेल! आणि तिने तो केला! याच मनस्थितीत तिनं चोरून लग्न केलं पण ते नांदायला न जाताच संपलं....! त्यावेळीही तिच्या मनस्थितीचा परिस्थितीचा तिनं केलेला सामना वर्णनातीत आहे! इथपर्यंतचा त्यांचा प्रवास वाचून सर्वच पुढचे सर्वच असंभव वाटत राहते! 

     तिचे पुन्हा लग्न जुळावे म्हणून आईने त्या बगळा देवीला बोकडाचा बळी द्यायला सांगितले, देवीला काळ्या बोकडाचा बळी देऊन त्याच्या रक्ताचा टिळा इंदिेरेच्या कपाळावर लावण्यास भटजीने सांगितले, तो गरम रक्ताचा टिळा त्यानंतर इंदिरेच्या कपाळावर त्याची उष्ण बोचरी जाणीव अनेक दिवस होत राहणं म्हणजे एका मृत्यूचा थंडपणा भोगण्यासारखे होते!त्यानंतर योग्य कालावधीनंतर एक दक्षिणी मधू नावाचा इंजिनीयर त्यांच्या आयुष्यात येतो... त्यांचे रितसर लग्न होते,त्याच्या सहवासातील आनंदात घालवलेल्या दिवसांच्या वर्णनात गुजरात आणि काश्मिरच्या अप्रतिम सौंदर्याबद्दल लिहलं आहे!मधू त्यांचे पती यांचा सहवास फक्त दोन वर्षे लाभला...!
त्याच्या मृत्यूच्या वेळचं त्यांच त्यांना भेटणं..." मधू गेले, मी किंचाळले, मला अनेक शतकांचा काळ उलटून गेल्यासारखं वाटलं....आयुष्याची मुळं उखडली गेली होती...! माझ्या पायखालची विश्वासाची जमीन अचानक सरकली होती...! 
 
       मधूच्या अस्थी त्यांनी कायम त्यांच्या जवळ ठेवल्या ...अस्थिंचा रंग बदलला नाही फक्त पेट्या बदलल्या!
हे वर्णन वाचताना नकळत डोळे पाणावतात!
त्यानंतर त्यांनी वृंदावनात जाऊन तिथे घालवलेल्या दिवसांचं यथार्थ वर्णन करताना त्यांनी तिथे राधेश्यामी म्हणून विधवा जख्ख वृद्ध स्रीयांना सोडून दिलेलं असं त्यांची जीवनपद्धतीचं वर्णन म्हणजे स्रियांना समाजापासून कसं दूर वृंदावनात श्रीकृष्ण भक्तीसाठी येत असत पण अत्यंत एकाकी आयुष्य जगत होत्या! हे वर्णन प्रत्यक्ष वाचल्याशिवाय या राधेश्यामींच्या आयुष्याचे ध्येय म्हणजे केवळ प्रियकर पिता सखा म्हणून श्रीकृष्णाला वाहिलेले आयुष्य होते! इथे राधेश्याीमच्या ठायी पौराणीक श्रीकृष्णाचे अस्तित्व होते... पण ऐतिहासिक पराक्रमी श्रीकृष्ण खरा होता असं लेखिका म्हणते तेव्हा ती किती वास्तववादी जीवनाचा स्वीकार करणारी होती याची झलक पाहायला मिळते?
याच राधेश्यामींच्या वृंदावनातील जगण्याचं दारूण दर्शन या आत्मचरित्रात त्या घडवतात तेव्हा जगणं इतकंही भयानक नसावं अशी आपलीही भावना होते!
पुढे आपल्याला त्यांचा विद्वतापुर्णतेमुळे त्यांनी केलेला रामायणाचा अभ्यास यात वाचायला मिळतो... !
रामायण ग्रंथातील सिता या व्यक्तीरेखेचा त्यांनी केलेला अभ्यास खचितच आपल्या विचारतील सर्व अध्यात्मिक परिमाणं बदलून टाकते . !
 
     आपली संकुचित विचारक्षमता आणि दृष्टीकोन व्यक्त करण्यासाठी आतापर्यंत वेगवेगळ्या व्यक्तींनी आणि समाजांनी या अद्वितीय व्यक्तिरेखेचा कसा सोयिस्करपणे उपयोग करून घेतला आहे ते लेखिका सहज लक्षात आणून देतात...!
यात त्यांनी फिरदौसी या पर्शियन कवीच्या ओळी सांगतात..
" उस के मरने पर होंठ वह बात कह नहीं सकते
उसका बताना तू होता हैं, जब वह जल जाती है
कहने को स्री है, लेकीन बडे बडे बहाद्दरोंसे बढकर है!
सिताजीके के शरीर को किसीने वस्रहीन नहीं देखा
जैसे आत्मा शरीर के अंदर रहती है,
परंतू आत्माको किसीने नही देखा! 
 
      प्रस्तावनेच्या शेवटी अमृता प्रितम यांनी एक कथा सांगितली आहे, ती कथा वाचल्यानंतर ही कथा ज्या लेखिकेने लिहीली आहे तिचा समाजव्यवस्थेवरील अभ्यास आणि जातीव्यवस्थेचा तिने केलेला सर्वांगीण विचार किती अद्भूत अद्वितीय आहे याचा प्रत्यय येतो....! त्या दिर्घकथेची लेखिका अर्थातच इंदिरा गोस्वामी आहेत! एका विधवा ब्राम्हण युवतीने अगदी गरज म्हणून एका बटीकेचे कर्म स्वीकारले तरी तिने तिच्या जातीपेक्षा हलक्या जातीच्या व्यक्तीने लग्नाची मागणी घातली असूनही तिनं त्याला नाकारलं....!
नकाराचं कारण सांगताना ती म्हणते *" शरीरविक्रय करावा लागला तरी अर्थार्जन करणं माझं कर्तव्य आहे. मी नीच जातीच्या पुरूषाची शय्यासोबत करू शकते पण त्याला पुत्र देण्यासाठी मी त्याच्याशी लग्न करू शकत नाही!*
जातीव्यवस्थेची इतकी प्रभावी आणी प्रखर परिस्थिती मांडणा-या ह्या सशक्त लेखिकेचे मामोनी रायसम गोस्वामी यांचे हे भानक्षुब्घ अनुभव व कारूण्य यांनी भरलेलं आणि भारलेलं आत्मचरित्र आहे!
अवघ्या सत्तावीस वर्षाच्या जीवनानुभवात जीवनाच्या अनेक पैलूंना आंतरीक संवेदनांनी स्पर्श करणारी अशी ही अर्धीमुर्धी कहाणी! ❤
🌹
© पुष्पांजली कर्वे ✍️
साहित्य प्रकार - आत्मचरित्र ( आसामी लेखिका इंदिरा गोस्वामी)
आत्मचरित्राचे नाव- अर्धीमुर्धी कहाणी
मराठी अनुवादीका- अर्चना मिरजकर
प्रकाशन संस्था- सुविद्य प्रकाशन
प्रकाशन साल - 2003
मुळ आसामी आसोमबानो आवृती प्रकाशन साल- 1986

abida parveen best ghaza dil ishq mein.wmv

भेट............!

 pascal painting meeting romantic  girl and boy साठी इमेज परिणाम


 हेलो.........
 बोला.......
जेवलास.......
नाही.....अजून ...
लंच टाईम तर होऊन गेला नं.....
आमचं असंच असतं..... काही वेळेवर नसतं..... तू बोल..... जेवलीस....?
हो..... आमचं मात्र सारं वेळेवर असतं....
इकडे  सुमेधा हसली..... तिकडे सौमेशही हसला.............
तू म्हणाला होतास नां भेटशील तेव्हा काहीही माग, मी तुला देईन.....!
हो.... मग.... सांग नं काय पाहिजे .....?
बघ हं .... नक्की मागू ....? खरंच नं...?
एका तपानंतर, बारा वर्षांनी आपण भेटतोय ..... माग काय हवय तुला...?
मग.... उद्या येताना तू सर्व घेऊन ये....!
काय...?
मी तुला लिहीलेली सर्व पत्रं.....!
अरे..... ती नाहीत आता माझ्याजवळ!
म्हणजे काय झाली ती....?
आता ती नाहीत......!
तू ती  फेकून दिलीस  नं....!
तसं नाही.... घराचं दोनवेळा रिन्युव्हेशन झाले त्यामध्ये कुठेतरी  हरवली ती....! म्हणजे ती गंगार्पंण झाली नं माझी पत्रं.  मला वाटलं ..... जेव्हा आपण भेटू तेव्हा तू ती पत्र आणशील आणि मग प्रत्येक पत्र आणि त्यामागील आठवण रिफ्रेश केली असती आपण....
हं
तरी मी तुला सांगत होते मला ती पत्रं परत दे...... पण तेव्हा तू  म्हणालास तू नाहीस तर निदान ती पत्रं तरी असू देत माझ्याजवळ....!
हं.....
मी तरी जपून ठेवली असती ती  तुला एक एक पत्र लिहीताना जे जे म्हणून अनुभवलं ते ते तुला सांगायचं होतं!
हं....
तुला दिलेलं शेवटचं पत्र आठवतंय......? ते पत्र लिहीतांना कित्ती कित्ती रडले होते.  काही शब्दांच्या पुंजक्यांवर माझे अश्रू ओघळले होते.
हो ... ती अक्षरं पुसट झाली होती..... मी त्या अक्षरांना भरल्या डोळ्यांनी पहात राहिलो.... त्यांच्यावर ओठ टेकून त्यांना पित राहिलो.....
इकडे सुमेधा स्तब्ध झाली...... तिच्या डोळ्यात अमाप अश्रू दाटले होते....!
हेलो...... एेकतेस नां....... त्या आठवणी   माझ्या आत आत अजूनही फ्रेश आहेत....! अरे एवढा लाईव्ह तुझ्याशी बोलतोय ..... तुझ्याजवळ अाहे.... अजून काय पाहिजे तुला.........?
हं..... हे पण बरोबर आहे..... एवढया वर्षांत सर्व बदललं अगदी आपल्या अस्तित्वांसकट सर्व  .   फक्त बदलले नाहीत ते आपले मोबाईल नंबर ...!  पण व्हट्सऐप वर  भेटलो त्याला वर्ष झाले.  आणि मग आपण एकमेकांशी फक्त सेल वर बोलू लागलो ..... तेही दोन तीन आठवड्यातून एकदाच...... कधी  पाच मिनीट  तर कधी दहा मिनीट ....!
सुमेधा आतल्या आत खुप अस्वस्थ झाली होती.... पण तरी काही  अधिक बोलू शकली नाही.
तू एक काम कर तू आण तुझ्याकडे जे काय असेल ते......
मी...?  सुमेेधाने वैतागून विचारले.... मी काय आणू...? तू कधी काही दिलंयस का मला...?
का.... काहीच दिलं नाही ? सौमेशने आश्चर्याने विचारले.
घड्याळ गजरे,चौकलेट,बद्दल नाही म्हणत मी.... दोन ओळीचं पत्र तरी दिलंयस का कधी....?
एक सांगू ..... सौमेशने अतिव प्रेमानं विचारले.....
काय...... सुमेधानं कुतूहलाने विचारले..
आपलं हे नातं आहे नं तेव्हाही आणि आताही देवाणघेवाणीच्या  फार फार पलिकडले आहे. आपण एकमेकांसाठी आजही असणं हे आपल्या नात्याचं सर्वांग सुंदर देखणं रूप आहे.
सुमेधा क्षणभर स्तब्ध झाली.  काय बोलू यावर.... तुझं हे नेहमीचच आहे.... असं काही बोलतोस....आणि मग तुझ्यावरून जीव ओवाळून टाकावासा वाटतो.
मग.... भेटतोय ना उद्या आपण .....?  सौमेशने हसून विचारले......
हं.... सुमेधाही हसली.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
हेलो.........
बोला.......
जेवलास.......
नाही.....अजून ...
लंच टाईम तर होऊन गेला नं.....
तुला तर माहित आहे नं आमचं हे नेहमीचंच
सुमेधा क्षणभर शांत झाली......
हेलो........ कुठे हरवलीस.......
आपलं काल भेटायचं ठरलं होतं नं..... ?
हं
पण तू स्थळ, वेळ काहीच कळवलं नाहीस
अरे फार बीझी होतो , भेटायचं होतं पण ......ठरवून कैन्सल नको करायला म्हणून कामं आटपत राहिलो...
मग कामं आटपल्यावर तरी .....
अरे कामं संपलीच नाहीत........ मग तू नाराज होशील म्हणून कळवलेच नाही.
असा कसा रे तू......!
सौमेश हसतो..... मध्येच उसासा टाकतो
काय झालं.....?
काही नाही.... तुम्ही बोला....
किती विलक्षण आहे.....
काय
कालच म्हणालास नां मी तुझ्याजवळ लाईव्ह आहे, मग बाकी कशाची गरज नाही.
हं मग आहेच नं.....
सुमेधा उदास हसते....आपण बारा वर्षांनी एकमेकांच्या संपर्कात आलो त्यालाही वर्ष होत आले  पण या तीनशे पासष्ट दिवसांतून एक दिवस, एक तास, एक मिनीट एक सेकंदही  मला प्रत्यक्षात भेटला नाहीस.
 भेटू..... नक्की भेटू..... सौमेश भावूक होऊन म्हणाला. *(त्याला सुमेधाची तगमग कळत होती पण तो स्वत:ला समजावत होता, भावनेच्या भरात भेटून नको तो गुंता पुन्हा वाढणे वाढवणे योग्य नव्हते, त्याचाही संसार होता आणि सुमेधाचा सुखी संसार हा त्याचा आता आनंद होता.   त्यांच्या नात्याचं निर्मळ पावित्र्य राखणे दोघांची जबाबदारी होती. तो पुरूष होता पण सुमेधाच्या अस्तित्वाचा अभिमान राखणे ही त्याचीही जबाबदारी होती.... त्यालाही तिची प्रचंड ओढ होती आणि  तिलाही हे तो जाणून होता.....!)
आता कळलंय मला...... !  अगदी नक्की कळलंय मला !
काय.... सौमेशने आश्चर्याने विचारले.
एकदा का प्रेम आपल्या आत उतरले की , दुरावा.... विरहं.... या जाणीवांना शब्दश: काय , पण अक्षरश: काहीच अर्थ उरत नाही. आणि सौमेश तुला हे कधीच समजले आहे.
हं  .....
म्हणूनच तू असा शांत निश्चिंत आहेस . मलाच समजायला उशीर झाला.
सुमेधा..... सौमेशने  खुप आर्ततेने तिचे नांव घेतले..... आपण एकमेकांत जीतकं खोल अथांग उतरत जाऊ नं तितके अधिकाअधिक जवळ येऊ मग आपण शरीराने कितीही दुर असलो तरी ! मग ते हे  अंतर, वेळेचं असो नाही तर स्थळाचं असो....!
खरं आहे सौमेश.... आणि तेव्हा तू माझ्या समोर असशील आणि मी तुझ्या जवळ असेन. आणि याचा अनुभव घेतला मी.  तुला कालचा अनुभव सांगितला तर  खरं नाही वाटणार .
काय .... कुठला अनुभव?
काल मी सकाळपासून तुझ्या फोनची निरोपाची खुप खुप वाट पहात होते .
मग तु तरी फोन करायचास नां
मनात म्हटले भेटायचेच आहे  तर तूच फोन करून सांगशील आणि तसेच काही नसेल तर तुला फोन करून उगीच धर्मसंकटात का टाकू..... म्हणून खुप ईच्छा असुनही नाही केला.
मग...
संध्याकाळ झाली आणि समजून गेले .  आफीसमधून स्टेशनवर आले....आणि तुझ्याच विचारात गाडीची वाट पहात उभी होते
मग....
आणि तुझा गंध.... तू माझ्या अगदी जवळून अगदी जवळून गेल्याचा भास झाला. मी त्या क्षणभरात तुला अनुभवलं.... त्याक्षणी तू माझ्या जवळ होतास....!सुमेधाच्या आवाजात कंप होता. तिनं कसातरी आवंढा गिळला ,  तुला आठवतंय हा असाच अनुभव मी बारावर्षापुर्वी घेतला होता. आणि तुला मी सांगितले त्यावेळी तू माझी खुप तीव्रतेने आठवण काढत होतास असं मला सांगीतलं होतंस.....!
आणि कालही काही वेगळं नव्हतं गं.....!  सौमेशही भावनाविवश झाला होता.
मला  खात्री आहे...
कसली......
आपण नक्की एक दिवस भेटू.............खुप वर्षांच्या घड्या आता आपल्या भेटींवर पडल्या आहेत , भेटी तरी किती ? हसते, आता आठवावी तर सारी स्थळं, आणि रस्ते हुबेहुब नजरेसमोर आली तरी... त्या रस्त्यांची नावं बदललेली आणि स्थळाैंची कळाही गेलेली असेल..... तू पुन्हा भेटू नकोस असं मी कधीत म्हणणार नाही , पण भेटण्यापुर्वी त्या रस्त्यांची नावं आणि स्थळांची कळा बदलल्या तरी चालतील पण तुझ्या चेह-यावरच्या सुरकुत्यांच्या घड्या त्या वर्षांच्या घड्यांखाली लपवू नकोस .   राजा तुला सुर्यास्ताची शपथ एकमेकांना न भेटल्याशिवाय जायचं नाही सुरकूत्यांची कुंपणं ओलांडून ह्रद्याशी ह्रद्याची चाहूल घेऊन आपण नक्की भेटायचं.... आपण नक्की भेटायचं.....................!!


@ समिधा





कवडसे......

    " कवडसे..."

     दि. 13/5/2018 वेळ संध्याकाळी सहाची आणि आम्हा पाच नवोदीत कवी कवयित्रींच्या परिक्षेचीही.....! कल्याण काव्यमंच प्रस्तुत" कवडसे" या बहारदार काव्यवाचनाच्या कार्यक्रमाची घोषणा झाल्यापासून आम्हा सर्वच सहभागी कवी मडळींची तयारी सुरू झाली होती.  

     कल्याण काव्यमंच ची स्थापनाच नवोदीत कवी कवयित्रींना त्यांच्या काव्यलेखनाला रसिकश्रोत्यांसमोर आणून त्यांना प्रोत्साहन देणे आहे.  कल्याण काव्य मंच ही जशी एक साहित्य साधनेची कार्यशाळा आहेत तशीच ती एक साहित्य चळवळही आहे.

     13 मे ची संध्याकाळ कल्याण काव्य मंच प्रस्तुत कवडसे  च्या निमीत्ताने आम्हा सहभागी सर्व कवीमंडळींसाठी अतिशय महत्वाची होती.  यात सहभागी माझ्यासह सर्वच कवी कवयित्री नवोदीत होतो, त्यामुळे प्रथमच कवडसे या कार्यक्रमामुळे रसिकप्रेक्षकांसमोर जे खास आमच्यासाठी आमच्या कवितांना एेकायला येणार होते त्यांना कवितेतून आनंद देणे ही आमची फार मोठी जबाबदारी होती. आणि जबाबदारी पेलण्याची उर्जा आम्हाला कल्याण काव्य मंच च्या  प्रत्येक सदस्याकडून मिळत होती. सुधा पालवे, अपर्णा ताई, निचीता झुंझारराव  , चित्ते सर, प्रशांत वैद्य सर यांच्या उपस्थितीने ती कार्यक्रमाच्या दिवशीही आमच्या सोबत होती. 

     कार्यक्रमाची सुरूवात श्री. सुधीर चित्ते सरांनी सुत्रसंचालन करून नेहमीच्याच उत्साही आणि आंतरीक आत्मविश्वास वाढवणा-या शब्दांनी केली..... आणि सुरूवातीलाच....
"शब्दानी प्रसन् व्हावं 
मनाचा कोपरा चिंब भिजावा
सुख आणि शांती नांदावी 
शब्दांनी शब्दांशी गोड
होऊन एकजुटीनं नांदावं....!"

असा शब्दांचा गोडवा रसिकांपर्यंत पोहचवणा-या सीमा झुंझारराव यांनी प्रथम काव्यवाचन करून रसिकांना आपल्या शब्दकाव्यातून आनंद दिला...! सुरूवातीला केवळ वाचक असणा-या पण वाचनातूनच फुललेले त्यांचे हे काव्य कौतुकास्पद आहे.

     व्यवसायाने डेन्टीस्ट अगदी तरूण ताज्या दमाचा कल्याण काव्य मंचचा तरूण चेहरा......
"प्रेमाचा अनेक व्याख्यांवरूनही प्रेमाचा 
अर्थ सांगणं भल्याभल्यांना नाही जमलं
प्रेम म्हणजे काय असतं हे मलाही 
ख-या अर्थाने प्रेम झाल्यावरच समजलं.....!"

सहज सोप्या सोज्वळ शब्दांतून क्ती मोठा अर्थ सांगणारा हा युवा कवी म्हणजे शुभम नाईक याने अतिशय सुंदर तरल ह्रद्यस्पर्शी कविता सादर करून उपस्थित सर्व कव्यरसिकांची दाद मिळवली.....!

     "अंकिता डोंगरे"  हा कल्याण काव्यमंचचा आणखी एक तरूण सुंदर चेहरा आणि तिच्या काव्यातील भावही तसाच सुंदर तरूण आणि परिपक्वतेकडे प्रवास करणारा , आशावादी आणि कणखर वाटला. तीची स्वप्न ही कविता अशीच कणखर वाटली.

"त्यांनी समजावून पाहिले मला
मी नाही एेकले.....
त्यांनी आवाज चढवला 
मी नाही एेकले......
त्यांनी थोडा घातला धाक
मी नाही घाबरले 
मग त्यांनी अश्रूंचा घेतला आधार 
मी नाही विरघळले.....
त्यांच्या कोणत्याही कृतीचा
मला फरक पडला नाही
हे पाहून शेवटी
त्यांनी माझ्या स्वप्नांना स्वीकारले!

अशा प्रगल्भतेकडे जाणा-या युवा कवयित्रीला रसिकांकडून भरभरून दाद मिळाली.

     नवकविंचे नवखेपण असूनही काव्यरसिकांनी दिलेली दाद म्हणजे कवी- कवितेला नवा उत्साह देणारी असते याची प्रचिती वेळोवेळी येत होती...!  आणि त्यामुळेच कल्याण काव्यमंचने नवोदितासाठी उपलब्ध करून दिलेले हे व्यासपीठ म्हणजे " काव्यपंढरीच" आहे.  आणि या काव्यपंढरीचे आम्ही सर्व सदस्य "वारकरी" आहोत तर "कविता"  आमची "विठूमाऊली"  कार्यक्रम दरम्यान हेच भक्ती कृतज्ञतेचे भाव मनात येत होते.  

     सीमा झुंझारराव, शुभम नाईक, अंकिता डोंगरे यांच्या काव्यवाचनानंतर  सुधाकर वसईकर यांनी त्यांच्या कविता अतिशय उत्कटतेने सादर केल्या.

     "केसात माळलेल्या 
      गज-याचा सुगंध मी 
     धुंदणारा भुंगा मीच तो 
    झिंगणारा भुंगा मीच तो "

या प्रेमकाव्यापासून ते "रंगभुमी" सारखी गंभीर अंतर्मुख करणारी कविता सादर करून उपस्थित सर्वच काव्यरसिकांची मने जिंकली.

     या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य असे की  पार्कातल्या कविता ही काव्यवाचनातील अतिशय सुंदर संकल्पना  यशस्वीपणे सादर करणारे , सुरेश पवार  हे राज्यस्तरीय नाट्यकर्मी  ,  अरूण गवळी  सारखे प्रगल्भ कवी  "कवडसे" या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते.  तसेच आयोजकांनी प्रत्येक काव्यरसिक श्रोत्यांची दखल घेत प्रत्येकाचे प्रेमाने स्वागत केले जात होते.    त्यामुळे कवडसे हा कल्याण काव्यमंचच्या अंगणातून ते उपस्थित प्रत्यक रसिकांच्या मनात जाणारी प्रकाशाचा स्रोत होता.

     कवडसे मध्ये माझेही काव्यवाचन होते !  एवढ्या सा-या श्रोत्यांसमोर एक दोन नव्हे तर वीस मिनीटे काव्यवाचन करणे हे इतरांसारखे मलाही दडपण आणणारे होते, कारण माझाही हा पहिलाच होता.  पण सर्वच सन्मानीय सदस्यांनी आम्हाला आत्मिविश्वास दिला म्हणूनच काव्यवाचन, सादरीकरणाचा आनंद घेऊ शकलो.

     "तुझ्या श्वासांची ऊब 
       मला इथे जगवते
       अनं
      माझ्या आसवांची गाज
     तुला तिथे कळते

    काय फरक पडतो 
    तू तिथे 
    अनं 
    मी ईथे   

या कवितेने काव्यवाचनाला सुरूवात केली........ माझ्यासाठी हा एक प्रयोग होता आणि त्याचे माझ्यासाछी खुप होते.  या काव्यवाचनातून मला माझ्या कवितांची रसिक श्रोत्यांच्या मनाच्या ठायी किती झेप घेऊ शकते याची थोडी का होईना कल्पना येणार होती.... !  आणि "कवडसे" कार्यक्रमाने  काव्यरसिकांपर्यंत कवितेने पोहचणे म्हणजे काय याची खरी जाणीव करून दिली.    माझ्या आवडीच्या मिश्र भावनांच्या कविता सादर करतांना मला स्वत:ला सुद्धा खुप आनंद मिळाला.  

उगावावं म्हणते तुझ्यातून
म्हणजे तुझ्या वेदनेला
माझा सहनशीलतेचा देठ भिडेल
आणि तू मग सावलीतून फक्त शीतल
माया देशील ज्याची मला आता गरज आहे!
तुझ्या आतल्या पुरूषाला सांग ना
माझ्यातल्या अगणीत कवितांना तुझा
कोमल स्वर हवाय...!
देशील तू तुझ्यातल्या थोड्या अश्रुंना
माझ्या डोळ्यातल्या आसवांची साथ...!
फार नाही पण हसतांना तूला पहायचंय
तुडूंब भरलेल्या हंड्यातून उचंबळणा-या पाण्यासारखे
तुझ्या सुखाच्या कल्पना एकदा कैनव्हासवर उतरवून
त्यात रंग तूच भर
पण त्यामध्ये एखाददुसरी सुखाची नक्षी माझीही
सामील कर...!
तुझ्या जुन्या फोटोफ्रेममध्ये
अजुनही मला ब्लैकअँड व्हाईट
संदर्भ दिसतात....
काढू नकोस ते बाहेर ...
पण
तिथेच मलाही थोडे आत घे....
माझे सारे तूझ्यात सामावून जावे
असेच प्रयत्न करत आले
तरी मी अजुनही बाहेर आहे...
व्यवहार आणि विश्वास यात
तोलत ठेवून मला अजुनही तू
हिशोबात मांडतोस
पण ...
हिशोबात धरत नाहीस.....!!!!

 ही कविता सादर करतांना मला विशेष आनंद झाला. रसिकांनाही तो मिळाला असेल अशी अाशा करते.  कवडसे हा माझ्यासाठी सर्वच अर्थाने एक अविस्मरणीय अनुभव होता.   काव्यरसिकांपर्यंत आपली कविता पोहचवताना काय  व कसे  भान ठेवावे, काय टाळणे आवश्यक आहे  असे अनेक नवीन धडे मिळाले   कल्याण काव्य मंच ची यासाठी मी कायम ऋणी  असेन . 

     या निमीत्ताने   आमच्या मनातले काव्य'कवडसे' काव्यरसिकांच्या मनामनात प्रकाशाची एक तिरीप जरी सोडून गेले असतील  तरी आम्हाला खुप समाधान मिळेल....! पण ही तर आमची सुरूवात आहे.  अजून खुप अनुभव येणार आहेत.... आणि मला खात्री आहे " कल्याण काव्य मंचच्या" अभिमानास्पद विस्तारासोबत आम्हा सर्व काव्यवारक-यांचा प्रवासही दिमाखदार होणार आहे........!
शुभंम भवतू......!!



  




तुला कळतंय ना .......!!







प्रिय............
     तुझ्याशी खुप खुप बोलायचे असते म्हणून मोबाईल आॅन करते.  व्हैट्सएपवर येऊन उगीच स्क्रिन स्क्रोल करीत असतांना तुझ्या नावासमोर येऊन क्षणभर थबकते .... तुझ्या नावाला हलकेच स्पर्श करून अंतरंगात डोकावते आणि नेमका तेव्हा तुही तिथे थांबलेला दिसतोस........

     ह्रदयात धडधड होऊन तुला पहात रहाते ... तुझ्या आॅनलाईन सिग्नलला न्याहाळत ..... तुला हेलो .... करून बोलवावं का असा मनात विचार करत असतानाच तू क्षणात आॅफलाईन नजरेआड होतोस ........!  आॅफलाईनची ती रिकामी पोकळी पाहून हिरमुसली होऊन स्वत:ला निमुटपणे आत ओढून घेते.....!  तरारून फुलायला आलेले शब्द न शब्द फुरगंटून स्वत:ला मिटून घेतात,  डोळ्यांच्या काठावर आलेलं पाणी ..... तसंच तरळत रहातं..... आधाराशिवाय...! 

     असा कसा तू ....?  मला न पहाताच न भेटताच ..... न बोलताच कसा  निघून गेलास.....?   किती नाही म्हटलं तरी थोडासा राग..... थोडासा रूसवा..... थोडीशी बेफीकीरी मनात उमटतेच....!  एकमेकांविषयी अजिबात गैरसमज करून घ्यायचे नाहीत असं ठरवलेलं असतेच आपण .... आणि आतापर्यंत ते कटाक्षाने पाळतोही आपण ... तू नेहमीच ठाम ... निश्चिंत.....!  पण कधी  हे असं होतंच माझं.....!  ज्याची त्याची स्पेस, ज्याचं त्याचं आयुष्य आहे हा डंका कितीही  पिटला तरी मनात थोडीशी बैचनी येतेच ! आणि तुझ्या माझ्या प्रेमातला थोडासा रस उणावतो, उत्कटून, समरसून तुला भेटण्याची आस सपाट पातळीवर येते...!

     आपलं नक्की नातं तरी काय?  या भाबड्या आणि भावूक प्रश्नांपलिकडलं आपलं प्रेम आहे हे ठाऊक असूनही मनात एक छोटसं वादळ घोंगावून जातेच......!( यावर तू आता मिश्कील हसला असशील..)  तेच हसू काहीवेळानं माझ्या ओठांवरही येतं ... जेव्हा तुझे  ते आश्वासक.... निर्मळ..... शांत ..... समजुतदार डोळे आठवतात,  आठवतो  जवळ नसतानाचा तुझा-माझा  नि:शब्दात जपलेला विरह....!   आणि त्या विरहात आपण दोघांनी श्वास-नि:श्वासात गुंफलेले अतूट ऋनानुबंध दिसतात.....अनं तिथेच शांतपणे विरून जाते मनातले क्षणभरचे हे वादळ.... !

      आणि मी आश्वस्थ होते ...... पुन्हा नव्याने अधिकच तुझ्या प्रेमात पडते .....!!
तुला कळतंय ना .......!!


@ समिधा

    

स्री पुरूष मैत्री एक दिवास्वप्न !

  

 

       अहो ..... तुम्ही आरशात पहा जरा स्वत:ला !   बघा  तरी कसा अवतार झालाय ? पोटाचा घेर वाढलाय, चेहरा केवढा ओढल्यासारखा दिसतोय ! स्वत:कडे लक्ष द्या नं जरा.  किती काम आणि काम करीत रहाल?  कीती वेळा तुम्हाला हे सांगितलं पण तुम्ही  माझं कशाला एेकाल... तुम्हाला एखादी मैत्रीण असती तर बरे झाले असते .... निदान तिचे तरी एेकलं असतं.! असं मी माझ्या प्रिय नव-याला बोलते .... तेव्हा त्यांच्या चेह-यावर मिश्कील हसू तरळतं...! हे मी माझ्या पतीला एवढ्या सहज बोलू शकते तितक्या सहज मी त्याची मैत्रीण खरंच स्वीकारेन का?
     मी एक स्त्री  आहे  आजची आधुनिक पुरोगामी  विचारांची  … तरीही माझ्या विचारांना पारंपरिक संस्कारांची एक बैठक आहे ! पुरोगामी विचारांच्या तळाशी अभेद्य अश्या परंपरेची घट्ट वीण आहे तिची गाठ माझ्या दैनंदिन व्यवहारपासून ते एकूण  जीवन मूल्यांपर्यंत वेढली आहे !  अश्या ह्या समांतर रेषेतील जगण्यात मी माझे स्त्रीत्वाचा स्वाभिमान जपण्याचा प्रयत्न करते  …  तेंव्हा माझा स्वत:शीच मानसिक संघर्ष खुप होतो.
     मग हा संघर्ष होत असतांना आपल्या मनातील प्रत्येक विचाराला नैतीक अधिष्ठान असतेच असे नाही. कारण हा संघर्ष खरंतर  मन आणि बुद्धी यांच्यात होत असतो.  
     जेव्हा  हा  पुरोगामी आणि पारंपारीकतेचा संघर्ष स्री-पुरूष नातेसंबंध असा माझ्या आत होत असतो तेव्हाच्या विचारसंक्रमणात  आपण आपल्या काही नितीमुल्यांचा पुन्हा एकदा नव्याने आणि अधिक प्रगल्भतेने विचार करावा असे वाटते. तेव्हा वाटते आपले अस्तित्व ज्या परंपरा संस्कार यांच्या पायावर उभे आहे त्यांना पुन्हा एकदा स्री-पुरूष दोघांनीही नव्या दृष्टीकोनातून तपासले पाहिजे आणि काळाप्रमाणे त्यांचा स्विकार करून जगणे अधिक समृद्ध केले पाहिजे ! पण जगणे समृद्ध करणे म्हणजे नेमके काय? सहज, सोपे, सुटसुटीत जगता येणे  या जगण्याला मी समृद्ध मानते.  जिथे प्रत्येक विचारात सुस्पष्टता असते,  गृहितकांना स्पष्ट नकार असतो, आणि प्रत्येक विचारामागे कृतीमागे आयुष्याला अधिक अर्थपुर्ण करण्याची आस असते, एवढेच नाही तर त्या नात्यामुळे आपल्या जगण्याला उर्जीत चालना मिळणे अपेक्षीत असते.

     प्रत्येक नात्यामध्ये ज्याची त्याची स्वतंत्र जागा असावी.  पण ही जागा कोणत्याही नात्याच्या दृढतेला विश्वासाला धक्का देणारी नसावी.  नात्यांमधील आस्था , प्रेम हे कृत्रीम न रहाता ते अधिक सकस आणि सजीव व्हायला पाहिजे.   प्रत्येकाचे एक  स्वतंत्र भावविश्व असते. त्या भावविश्वात आपल्या भोवती , आपल्या सोबत असणा-या प्रत्येक व्यक्तिचा प्रवेश होत नाही ! एखादाच तिथे पोहचतो जो आपल्या आंतरिक संवेदनांना विचारांना समजू शकतो हे ज्याचे त्याचे स्वातंत्र्य  स्री-पुरूष दोघांनाही उदारतेने सन्मानाने स्वीकारता आले पाहिजे.

     जेव्हा स्री-पुरूष संबंध हा केवळ शारीरपातळीवरून जोखला जातो तेव्हा त्या नात्याला आपसुकच एक दुर्गंधी येते! खरं तर  या नात्याला अनेक कंगोरे आहेत.  जेव्हा एक प्रगल्भ स्री आणि एक प्रगल्भ पुरूष यांच्यात मैत्री होते ती परिस्थितीच्या अधीन असते तरिही वास्तवाचे भान ठेवणारी आणि एकमेकांच्या स्वतंत्र संसारांचा आदर राखून एकमेकांच्या  सानिध्यात संपर्कात येऊनही परस्परांच्या आत्मीक उन्नती आणि प्रगतीसाठी प्रयत्नशील असते.. ! अशी मैत्री कुणालाही दिवास्वप्नच वाटेल पण अगदी रविंद्रनाथ टागोर, बाबासाहेब आंबेडकर, स्वामी विवेकानंद, गाोपाळकृष्ण गोखले, सरोजीनी नायडू यांनी अनुभवलेली स्रीपुरूष मैत्रीचे सामर्थ्य याच नातेसंबंधांवर आधारीत असलेल्या  अरूणा ढेरे यांच्या प्रेमातून प्रेमाकडे हे पुस्तकातून वाचायला अनुभवायला मिळते .  अगदी अलिकडचे जी. ए. कुलकर्णी सुनिता देशपांडे, एमरोज अमृता प्रितम साहिर लुधयानवी   या महान विभुतींची उदाहरणे पाहिली की स्री पुरूष मैत्रीचा एक  सुंदर आयाम आपल्याला समजतो.
ही अशी मैत्री दोघांचाही सन्मान, आदर  वाढवणारी आणि समाजात अभिमानाने मिरवता येणारी पाहिजे .

     या संपुर्ण विचार संक्रमणात एकूणच  स्री - पुरूष नाते मग ते पती पत्नीचे असो वा अन्य कोणतेही  प्रत्येक नात्यात एक खरा सच्चेपणा पाहिजे  !  त्या नात्यामध्ये प्रेम, विश्वास तर हवाच पण प्रत्येक नात्याला त्याचे एक विशीष्ट स्थान असते ते स्थान अबाधीत ठेवून त्याचा योग्य तो सन्मान करणे  आवश्यक आहे.

      थोडक्यात एक अस्तित्व दुस-या अस्तित्वाशी जोडले जाते ते त्यामधील समसंवेदनांमुळेच त्या जितक्या
 ख-या स्वच्छ, निर्मळ तितकेच ते नाते पवित्र असे माझे प्रामाणिक मत आहे.  !

@  समिधा
    

'" निळा मोर "🐦🐦

ग्रंथालीच्या ४३ व्या वाचक दिना निमीत्त राज्यस्तरीय अभिवाचन स्पर्धा आयोजीत केली होती . अभिवाचन नेमके काय असते याचा प्रत्यक्ष अनुभव मला कधीच नव्हता आणि मग एक नवीन अनुभव घ्यायचा
केवळ या एकाच कुतूहल , जिज्ञासेने या स्पर्धेत भाग घ्यायचे ठरविले...आणि हे माझ्यासारखे कुतूहल जीज्ञासा असणारे म्हणजे स्वाती , अपर्णा आणि सुधाकर जी आणि सुधीर चित्ते सर ! मग काय अभिवाचनाचा हा शिवधनुष्य सुधीर चित्ते सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही उचलण्याचा प्रयत्न केला....!
साहित्यीक जगतात सर्वसामान्यांचे आवडते लेखक व.पु. काळे यांचे वपुर्झा अभिवाचनासाठी निवडले ...! महिनाभरात रोज नाही पण आठवड्यातून एकदा सर्वजण एकत्र येऊन प्रक्टीस सुरू केली! स्पर्धेत जिंकण्याच्या इर्षेने उतरलो नव्हतो पण महिनाभरात आमच्यात ती इर्षा निर्माण तर झालीच....आमचे अभिवाचन गुरू चित्ते सरांनी तयारीच तशी करून घेतली होती...! आम्हाला सर्वांनाच एक आत्मविश्वास आला होता....!!
स्पर्धेचा दिवशी आपला ड्रेसकोड काय ठेवावा इथपासून चर्चा विमर्चा करून आम्ही बायकांनी आमचं आमचं पिवळ्या साड्या नेसायचे ठरविले ....(याचा आमच्यातील सुधाकर सरांना काहीच पत्ताच नव्हता)
स्पर्धेच्या दिवशी ग्रंथाली किर्ती कॉलेजच्या प्रांगणात उतरलो...आणि आम्ही तिघी पिवळ्या साड्यां मध्ये आणि सुधाकर सर डार्क निळा शर्ट घालून आले होते!
आम्हाला तिघींना पाहुन सुधाकर वसईकर म्हणाले :
काय यार तुम्ही तिघीपण छान मैचिंग पिवळ्या साड्या नेसून आलात, मला सांगीतलं असतं तर मी पण पिवळा झब्बा, शर्ट घालून असतो!
आम्ही तिघीपण हसलो ,
मी म्हटलं छान दिसता ...हो
निळा मोर जणू !
मग सगळेच हसलो!
आम्ही एकत्र फोटोसेशनला उभे राहिलो आणि सुधाकर सर स्वातीच्या म्हणण्याप्रमाणे अगदी
पिवळ्या चाफ्यांत निळा मोरा सारखेच वाटत होते!😂
अभिवाचन स्पर्धेला सुरूवात झाली , एक गृप येऊन कुणी लेख, अग्रलेख, कथा, कादंबरी, आत्मचरित्रावर वाचन करत होते! कुणाचे उत्तम तर कुणाचे ठीकठाक अभिवाचन होत होते आणि आमच्या गृपमध्येही उत्साह वाढत होता! आत्मविश्वास होताच!
त्यामध्ये सुधाकर सरांना जरा जास्तच होता! त्यांचा तो आत्मविश्वास बघून आमचाही वाढत होता....! अपर्णा थोडी नर्व्हस होती , पण त्याचे कारण वेगळे होते.. पण तरिही तीही उत्साहाने तयारीत होती!
स्वाती ताई आमच्या आधी वाचन करणा-यांचे काटेकोरपणे कान देऊन ऐकत होती...! मी मात्र फक्त हा माझ्यासाठी नवीन अशा साहित्यीक प्रकाराचा आस्वाद घेत होते !!!😃
तेवढ्यात आमच्या सृजनोत्सव गृपचे नांव पुकारण्यात आले ...आम्ही तयारीतच होतो....!!
स्टेजवर गेलो ....अतिशय छान आत्मविश्वासाने वाचन केले...! वाचन करतांना मी एकदाही वर मान करून समोर पाहिले नाही....
मला एकच भिती..... समोर श्रोत्यांशी कुणाशी नजर भिडायची आणि इकडे माझ्या ओळींची पडझड व्हायची...आणि माझी वाचनाची गाडी पटरी सोडून भलतीचकडे जायची🤔😆😆😆😆 म्हणून नकोच ते पहाणे :)
अभिवाचन करून खाली उतरलो आणि परिक्षकांनी आम्हाला आमची नावं विचारली .... आम्ही प्रत्येकाने आमची नावं आनंदानं सांगीतली.... सुधाकर सरांनी जरा जास्तच आनंदानं सांगितले....कारण त्यांनी त्या आनंदाच्या भरात परिक्षकांशी हात पण मिळवलेले मी पाहिलं !😉
आमचा नंबर येणार हे इथेच पक्के झाले...😃
.
.
.
.
.
.
.
.
.
असे आम्हाला वाटल्यावाचून राहिले नाही ! आम्ही चौघही अगदी निश्चिंत...!
तेवढ्यात सुधाकर सरांना फोन आला...!
हायकमांडचा फोन ...असं म्हणत ते हॉल बाहेर गेले ! आम्ही मात्र इतर उरलेल्या गृपचे अभिवाचन ऐकण्यासाठी थांबलो!
खरं आमच्यावेळेपर्यंत हॉल भरलेला होता...पण नंतर ज्यांचे ज्यांचे वाचन झाले ते बरचसे गृप उठून गेले
आम्ही मात्र उरलेल्यांचेही ऐकले पाहिजे या उदात्त हेतूने हॉलमध्ये थांबलो
तेवढ्यात हॉलच्या दाराच्या फटीतून सुधाकर सर आम्हाला बाहेर येण्याचा इशारा करीत होते ...पण आम्ही तिघी बसूनच राहिलो...असं मधूनच उठून जाणं जमलं नाही ...!
शेवटी स्पर्धा संपली आणि आम्ही तिघी बाहेर येऊन सुधाकर सरांना शोधू लागलो ...!सर काही दिसेना... आम्हाला वाटले हायकमांडचा फोन म्हणजे त्यांनी कल्याण ला प्रस्थान केलं असणार....! मोबाईल कॉल केला तर सर खाली मैदानात पोस्टर कविता पहात होते...! आम्ही खाली गेलो...
"आपण फायनल मध्ये जाणार... बाहेर आलो तर आपला परफॉमन्स चांगलाच झाल्याची हवा होती... मी सांगतो उद्या आपल्याला फायनल साठी यायचे आहे!"
सुधाकर सर अगदी खात्रीनं सांगत होते ....
आम्ही तिघी पण जाम खुश...!!
पण प्रॉब्लेम असा झालाय की मला घरून बायकोचा फोन आलाय...घरी थोडं काम काढलंय .... मला घरी लवकर जावं लागतंय....! स्पर्धेचा निकाल ऐकायला मी नसणार!
तुम्ही काहीच काळजी करू नका आपण दहा मध्ये आहोतच ...! :)
आणि ते जायला निघाले...आणि थांबले , आम्ही तिघी पण त्यांच्याकडेच पहात होतो...
अजून एक हा माझा निळा शर्ट (निळा मोर..😃) मला वाटतं खुप लकी ठरलाय आज.... मी तर आता असाच घरी जाणार आणि हा शर्ट काढून ठेवणार ... आणि उद्या फायनल ला हाच घालून येणार.....!
ईईईईईईईईईईईईई.....
काय पण ....
आम्ही तिघी पण एकदम ओरडलो....
माझं ऐका ..... तुमच्या पिवळ्या साड्या पण लकी आहेत , तुम्ही पण उद्या ह्याच नेसा....! उद्या आपण फायनल पण मारणार बघा!
आम्ही जीव तोडून हसायला लागलो....
शी ई ई ई ई ई ई आम्ही नाही नेसणार परत या साड्या ...तुम्हीच घालून या हा निळा शर्ट !
ठीक आहे .....चला मला फोन करा उद्या साठी .
मी निघतो...
आणि सुधाकर सर घरी कल्याण ला निघून गेले!
संध्याकाळी साडेचारला निकाल लागला.....
निकालापुर्वी परिक्षकांनी अभिवाचन कसे असावे , कसे नसावे मार्गदर्शन केले....ते ऐकत असताना अभिवाचन जसे असावे त्या सर्व अटी नियम आम्ही खुपच चांगल्या अंशी पुर्ण केल्या होत्या त्यामुळे आमचा दहा विजेत्यांमध्ये नंबर लागणार अशी आशा वाटायला लागली....
सुधाकर सर आठवले...
त्यांचा लकी निळा शर्ट (निळा मोर ) डोळ्यासमोर नाचू लागला ...!!
आणि निकाल जाहीर करायला सुरूवात झाली!
आम्ही अधीरतेने निकाल ऐकू लागलो .....
पहिला , दुसरा , तिसरा .....
एक एक गृपचे नांव घेत होते आणि आमची उत्कंठा वाढत होती......!
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
आम्ही निकाल ऐकून हॉलच्या बाहेर आलो....!
सुधाकर सरांना निकाल कोण सांगणार .... आम्ही तिघींनी एकमेकींकडे बोट दाखवले ....
शेवटी मी फोन लावला....
हैलो....सर
बोला पुष्पांजली जी .....
काय निकाल लागला....?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
सुधाकर सर ..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
निळा शर्ट धुवायला टाका !!😂😂😂😂😂😂😂😂
.
.
.
.
.
.
.
असं कसं झालं?
जाऊ द्या हो सर , आपल्याला एक नवीन चांगला अनुभव मिळाला!
हं .......
मग आता शर्ट धुवायला टाका....! टाकाल नां ?
मी मुद्दाम त्यांना चिडवत होते😃😃
नाही आता शर्ट उशाला घेऊन झोपतो😞😞😞
आणि आम्ही तिघी धो धो धो हसत होतो!😀😀😀😀😀

© समिधा
Image may contain: 4 people, people smiling, people standing and outdoor
Want to tag Swati Natu
Yes · No

"शब्दांनी शब्दांना साथ द्यावी.... "


indian shopping mall साठी प्रतिमा परिणाम

रत्नाचा सकाळीच मोबाईलवर मीस्ड कॉल पाहिला आणि मनातल्या मनात मी समजून गेले , आज बाईसाहेबांच्या गळाला मी लागणार....! म्हणजे आज तिने मला सकाळीच फोन केलाय याचा अर्थ बाकी सख्यांनी तिची नकारांनी बोळवण केली असणार.😃
आणि माझा आज विंडो शॉपींगचा जाम मुड होताच!
जमले तर एखादी खरेदी करण्याचा शॉपींग मानसही होताच😃 त्याच मुड मध्ये रत्नाला फोन केला !
अंजू अगं वीकएन्ड झाला म्हणून काय एवढ्या उशीरा उठायचं ? सुट्टी म्हणजे काय आरामच करायचा का?
चल थोडी मज्जा करून येऊ सेंटरमॉल ला मस्त सेल लागलाय ...!
काय म्हणतेस? चल मग मला पण पाडव्याची ओवाळणी मिळालीय ...!
हं वाटलंच होतं मला म्हणून पहिला फोन तुलाच केला!
मग लेकीला नव-याला मस्का मारून थोडी प्रायव्हसी, स्पेसच्या गप्पा मारून निघाले ....!
रत्ना अनं मी जाम भटक भटकलो ...मोठ मोठी दुकानांची सुंदर सुबक सिरेमैकची मॉडेल आणि त्यांनी घातलेली उंची कपडे मनातल्या मनात स्वत:लापण भारी दिसतील असं इम्याजीन करून आमची मनाची गाडी तोपर्यंत पुढच्या काचांच्या पल्याडला पोहचलेली असायची...! एक दीड तास विंडो शॉपींग करून आम्ही आलिशान सेंटरमॉलमध्ये शिरलो...!
तिथे मला शॉपच्या काचांच्या आड ख-या खु-या सुंदर सुडौल मुली उंची कपडे घालून हसून मुरडत होत्या तसेच पुरूष ही उंची कपडे घालून तसेच रुबाबात हसत होते...! इथे तर सारे अजबच होते! जीवंत माणसे मॉडेल म्हणून काचांच्या कपाटांत उभे करून ग्राहकांना दुकांनामध्ये येण्यासाठी आकर्षीत करत
होते 😞😞😞! बापरे ....मनात म्हटलं माणूस व्यापारीकरणामुळे कुठे जाऊन पोहचलाय...?
ते मॉडेलचे चेहरे वरून हसरे पण आत आत खचलेल्या खाबांसारखे एकटेच कधीही धाय मोकलून कोसळतील असे वाटले ....एकटे ....चेह-यावर फक्त हसू....शब्दांना तिथे काही अर्थच नव्हता! काचांच्या आतून कितीही शब्दांना मोकळे केले असते तरी ते
काचेला थडकून आतच खाली पडून विरले असते!
ते एकटे तसे शब्दही एकटेच...!
अंजू इकडे बघ ...रत्ना ने हाक मारली , मी भानावर आले! ए आपण इकडून या गेट ने जाऊ या
मी : ओके डीयर!:)
तिथे दोन गेट होते ....! तिथून पुढे अजून काही पॉश दुकाने होती ! रत्ना पुढे मी तिच्या मागे ....
हैलो....! कुणीतरी मागून हैलो बोलले होते!
मी मागे वळून पाहिले ....! त्या गेटवर एक मुलगी उभी होती....तिनंच मला हैलो केलं होतं ! मी मागे आले , मीही तिला हसून हैलो केलं! केवढा आनंद झाला तिला ...😃😃 तिचा तो आनंद पाहून मला मात्र प्रश्नच पडला !
काय गं माझ्या एका हेलो ने तुला एवढा आनंद झाला?
हो मैम ...आज खुप खुप दिवसांनी माझ्या हैलोला कुणीतरी रिप्लाय दिलाय.....!
ती तसं बोलली आणि मनात चर्रर्रर्रर्र.....झालं !
मी: म्हणजे?
ती: मैम मी या मॉलच्या गेटवर जॉब करते!
मी: गेटवर ? शिक्षण कमी का?
ती: नाही मैम मी ग्रज्युऐट आहे!
मी: मनातून हबकलेच ...मग गेटवर?
ती: हं फक्त गेटमधून आलेल्या प्रत्येकाला
हसून हेलो करायचे ! पगार चांगला आहे.
सुट्टी पण मिळते महिन्यातून दोन दिवस!
मी: ......गप्पच
ती:. आज किती दिवस मी इथून येणा-या ला हेलो
करते पण प्रत्येकजण स्व:च्याच धुंदीत , कुणाचं
माझ्या हैलोकडे लक्ष तर दुरच पण गेलेच कधी
लक्ष तर रिप्लाय तर नाहीच! पण आज तुम्ही
मात्र मागे फिरून रिप्लाय दिलात..
मी: ..... गप्पच! ती आज धबधब्यासारखी बोलत
होती..आणि मी तिच्या फेसाळत्या बोलक्या आनंदाला
फक्त न्याहळत होते!
तेवढ्यात माझे दुस-या गेटकडे लक्ष गेले.....! तिथे
एक मुलगा असाच हिच्यासारखाच उभा होता! पण
तो जरा विचीत्रच वागत होता! त्याच्या एका हातात आरसा होता आणि त्या आरशात स्वत:चा चेहरा पाहून तोंड वेडवाकडं करून हैलो हैलो करत होता!
मी : हे काय करतोय वेड्यासारखा? एकटाच काय
असा हैलो हैलो करतोय?
त्या मुलाचा हैलो हैलो करतानाचा तो केवीलवाणा
चेहरा पाहून मन गलबललं!
ती: हं तो पण माझ्या सारखाच गेटवर जॉब करतोय!
आजकाल जॉब मिळणं कठीण ! तो तर एम बी ए
आहे! त्याच्या गेटवर मुळात येजा कमी, गेले दोन वर्ष तो तिथे हैलो हैलो करतोय पण रिप्लाय मिळतोच असं नाही ! आणि दोन आडवड्यापासून तो एकटाच हैलो हैलो करतोय...स्वत:ला रमवतोय!
मी : तो मन रमवतोय की एकटेपणाच्या अबोल्यात
गुरफटत खोल खोल बुडतोय... भासांच्या अंधारातून
तो रिप्लायचे शब्द शोधतोय....?
कित्ती कित्ती भयंकर आहे हे सारे....! माझेच शब्द माझ्या घशात अडकल्यासारखे ... आत आत एकदम घुसमट जाणवायला लागली.....! मनातल्या शब्दासकट माझा कोणीतरी गळा दाबतोय असं वाटलं ! शब्द अडकले होते ...
त्यांना व्यक्त व्हायचे होते ... पण ते एकटेच होते
त्यांना रिप्लाय नव्हता .....मग ते पुन्हा आत आत गुरफटून मौनात गेले ...!
:
:
:
:
:
:
:
:
:
:
:
:
तुम्ही विचार करीत असाल , असंलं कसलं सेंटरमॉल मला कुठे सापडलं? पण मित्र हो हे काल मला पडलेलं स्वप्नच आहे! स्वप्नातलं जग आपल्या वास्तवातल्या जगाची जाणीव करून देतं !
दोन जीवलग मैत्रीणी काय मित्र काय भेटल्यावर
ज्या आनंदानं उत्साहानं भेटतात , बोलतात तो जो शब्दा शब्दांचा संवाद असतो तो मनामनांचा मोकळ्या आकाशातला एक निश्चिंत विहार असतो! ज्यानं जुन्याच आठवांतून जुन्याच शब्दसोहळ्यातून नवा आनंद आणि नवी उर्जा मिळते!
हो याच नव्या उर्जे साठी आम्ही सर्वजणी सख्या कॉलेज सोडून वीस बावीस वर्ष झाली त्यानंतर भेटलो प्रथमच भेटलो ते माझ्या " माझे तुला नि:शब्द शब्द" या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनसेहळ्याच्या निमीत्ताने! तेव्हा केवळ एकमेकींना भेटलो पण दि.२७/१०/०१७ ला पुन्हा भेटलो ते मात्र फक्त बोलण्यासाठी .... प्रत्येकीला बोलायचं होतं! ज्योती तर म्हणाली भेटून मोकळ होणं महत्वाचं !
खरंच आहे खुप खुप साचलेलं असतं ... ते जीवाभावाच्या सानीध्यात मोकळं करावसं वाटतं!
मोकळ केलं की कसं मन पिसासारखं हलक होतं !
शब्दाला शब्द मिळाला की संवादाची माळ तयार होते! शब्दांना रिप्लाय मिळाला की आपल्या शब्दांना ही एकटं वाटत नाही .... संवाद बहरतो तो शब्दांना सोबत मिळते तेव्हाच! तोच बहर आम्हा सर्व सख्यांनी कित्ती कित्ती वर्षांनी अनुभवला! आम्ही पुन्हा पुन्हा भेटू मोकळं होण्यासाठी ! या दिवशीचं हे सारं सारं एका मनाच्या गाठोड्यात बांधून. जीनं तीनं आपआपला आनंदाचा वाटा घेऊन घरी गेल्या अगदी पिसासारख्या हलक्या होऊन! पुन्हा भेटायच्या ओढीनं!
तर मित्र मैत्रीणींनो बोलत रहा , शब्दांनी शब्दांना जोडत रहा... मग तुम्हीही एकटे नाहीत आणि शब्दही!
                               💝🌷💝🌷💝🌷💝🌷💝


©    समिधा

लोकप्रिय ..........

एखाद्याचं आपल्यातून अवेळी जाणं ……!

       किती किती अवघड असते समजून घेणे  एखाद्याचे आपल्यातून अवेळी जाणं    ....!!  अगदी अनपेक्षित असते  आपल्या साठी   …!  काळाने गनिमिका...

हे तुम्हाला नक्की आवडेल......